Thursday, December 21, 2017

रे कपिला...!

रे कपिला...!

पोळीचा रोल! लहानपणापासून घरात बघितलेली एक कामचलाऊ गोष्ट .. एकदम सोप्पी आणि पटकन बनणारी. आमच्या घरात तर मी, भाऊ आणि वडील अशा ३-३ सदैव भुकेले असणाऱ्या पोटांसाठी आई सारखं सारखं करणार तरी काय? मग उत्तर एकच  असायचं ......पोळीचा रोल! एकदम डायनॅमिक प्रकार.. काहीही घ्यायचं आणि पोळीमध्ये कोंबायच आणि मस्त रोल करून खायचा.. उरलेली भाजी, तूप-गूळ आणि कधीकधी तर नुसता टोमॅटो सॉस लावून रोल करून खाल्ला आहे आम्ही! शाळेत नववी-दहावीमध्ये  शिंग फुटल्यावर वडा पाव, मिसळ वगैरे चाखायला लागल्यावर मात्र पोळीचा रोल बाजूला सारला गेला... 

बट इट केम बॅक इन स्टाईल ..कॉलेजमध्ये गेल्यावर बऱ्याच गोष्टी नवीन कळतात आणि काही काही गोष्टी 'नव्याने' कळतात ...पोळीच्या रोलचं तसंच झालं ... मला तो दिसला पण एका वेगळ्याच स्वरूपात.. एका २५ डिसेंबरला...तो  माझ्या समोर आला ... अनेक वर्षांनी ...... आणि ते सुद्धा एकदम नव्या स्वरूपात...गंध आणि सौन्दर्यामध्ये कमालीचा फरक करून! 
त्याकाळी ख्रिसमसला कॅम्प एरियामध्ये जाऊन कुठल्याहि वयाचे, रंगाचे किंवा आकाराचे सॅनटा क्लोज  बघायला जायची लै फॅशन असायची... फॅशन कसली बोडक्याची .... खा* असायची! अमेय, सुभेदार, मित्या असे आम्ही पोरंपण कॅम्प मध्ये जायला निघालो ... पण रुबी हॉलजवळ अतिशय ट्राफिक लागलं. रस्ते गर्दीने फुलले वगैरे नव्हते, ट्रॅफिकनी 'लागली' होती रस्त्यांची. आम्हा तरुणाईचा पेशन्स तसा कमीच, लगेच संपला.. सॅन्टा बिनटा जाऊ दे ...आपण आपल्या वैशालीत जाऊ म्हणत परत फिरण्यासाठी गाडी एका ठिकाणी वळवली... थोडं पुढे गेल्यावर एका चौकात डावीकडे फुटपाथवर भयंकर गर्दी दिसली ...खूप! रस्त्यापर्यंत एक प्रकारचा चविष्ट वास यायला लागला... आम्ही एकमेकांकडे बघितलं , एकमेकांच्या नजराच इतक्या बोलक्या होत्या कि एकही शब्द न बोलता गाडी साईडला पार्क केली... अनेक मोठ्या गर्दीतून पुढे जायचा प्रयत्न केला....एक पांढऱ्या रंगाची टपरी आणि त्यावरचा बोर्ड दिसला ... कपिला काठी कबाब!!! एवढे सारे 'क'?? एकता कपूरच्या भाच्याची वगैरे टपरी आहे कि काय, असे फालतू विनोदसुद्धा करून झाले....

    खूप मोठ्या लाईनमधून पुढे सरकता सरकता मी फायनली कपिलाच्या काउंटरवर पोचलो. वास तर कडक येत होता पण काठी कबाब म्हणजे काय हे घंटा काही माहित नव्हतं ...पण असं नवखं असल्याचं आपल्याला दाखवायला आवडत नाही.... सो एक्सपर्ट असल्यासारख  "डबल - चिकन द्या" अशी ऑर्डर दिली ....काउंटर उभा राहून माझी नजर त्या आतल्या कढईपर्यंत काही पोहोचत नव्ह्ती पण तिचं झाकण उघडल्यावर त्यातून डोकावणाऱ्या खमंग आणि मसालेदार वासामुळे नाक मात्र कढई भावतीच रेंगाळत होतं... डोळे समोरच्या तव्यावर आणि नाक शेजारच्या कढई मध्ये गुंतत ठेवून मी त्या कारागिरांची कलाकृती बघत बसलो... 

कारागीरच ते...  एका मोठ्या तव्यावर भरपूर बटर, तेलवगैरे लावून  मैद्याची रोटी ठेवली, ती अर्धी भाजली गेल्यावर त्यावर २ अंडी फोडून टाकली '....२ मिनिटात एग फ्राय रोटी दिसायला लागली , एकदम खरपूस अशी....  मग कढई उघडून त्यातलं चिकन बाहेर काढलं. लालसर रंगाचे कबाब , एकदम परफेक्ट साईझचे ..छोटे छोटे पिसेस...ग्रेव्ही नावापुरती चिकनला प्रेमाच्या ओलाव्यात ठेवणारी...  ते चिकन घेऊन त्यानी एगरोटीवर अलगदपणे सोडलं...  डोळे बघतच राहिले, पोटातली भूक सपकन वाढली. मला वाटलं झालं आता ते आपल्याला लगेच मिळणार, एखाद्या गोष्टीची हाव सुटावी पण किती! मी पाय उंच करून बघत होतो... पण कारागीर लोक्स सुरूच होते... गोल आकारात कापलेला पंधरा शुभ्र कांदा रोलवर टाकला.. लिंबु  पिळलं आणि हिरव्या रंगाची पुदिन्याची  चटणी मस्त पैकी त्यावरवाहली! पिवळसर रोटी , त्यावर एग फ्राय , लालसर चिकन आणि हिरवी चटणी....झकास... कैतरीनापेक्षा जास्त हॉट दिसत होतं ते....  ह्या सगळ्या टीमचा त्यांनी रोल केला.. जणू काही 'जा जिले अपनी जिंदगी' म्हणत पेपर नॅपकिनमधून डोकावणारा तो काठी कबाब माझ्या पुढ्यात ठेवला...


लहानपणी आपल्या शेजारी  राहणारी कुलकर्ण्यांची पोरगी, जिला आपण गोड फ्रॉक आणि दोन वेण्यांमध्ये बघितलेलं असतं ती कॉलेजमध्ये अचानक शॉर्ट स्कर्ट आणि मस्त मेकअपमध्ये 'हॉट बनून आपल्या समोर येते.. आपण फक्त 'ऑ' करून तिला बघत राहतो.. आणि एक्साक्टली सेम तसं मला झालं... पूर्वीचा पोळीचा तो रोल , काठी कबाबच्या रूपात माझ्या हातामध्ये होता...!!!! कितीही वास घेऊन मन तृप्तच होत नव्हतं पण आता जिभेची टूर्न होती... हे सगळं कॉम्बिनेशनच खतरनाक लागत होत... आणि पहिला घास घेतल्या घेतल्याच दुसऱ्या रोलची ऑर्डर दिली गेली.  



कपिला आपलं एकदम फेव्हरेटच झालं तेव्हापासून... आता तर १५ एक वर्षाची लॉन्ग टर्म रिलेशनशिप झालीये... नंतर नंतर महिन्यातून एक डेट कपिलाबरोबर नक्कीच असायची ... २ काटी कबाब खायचे आणि मन प्रसन्न करून जायचं हे एक समीकरण बनलं होतं... आमचे मित्र मितेश आणि मैत्रीण शिबानी हे कपिलाचे रोल न घेता  फक्त चिकन कबाब घेऊन कोपऱ्यात बसत आणि एखाद्या झाडाखाली बसून जांभळं खाण्यासारखे ते चिकन कबाब खात, पण आपल्याला मात्र रोटी, अंडी आणि चिकन ह्यांची साग्रसंगीत महायुती एन्जॉय करायला नेहमी आवडायची.... ही नंतर एवढी आवडायला लागली कि कपिला समोरच माझ्या ऑफिसची दुसरी ब्रँच होती.... केवळ लंच ब्रेक मध्ये कपिलाला भेटता यावं  म्हणून मी त्या ब्रँचला ट्रान्स्फर मागितली होती... बॉसनी "जरा मोठा माणसासारखा वाग आता" एवढाच सल्ला दिला... मग मी खूप सेंटी होऊन त्याला "तुम क्या जानो प्यार क्या होता है" हे सणसणीत उत्तर दिलं ....पण मनातल्या मनात...!
पण हे माझं कपिला प्रेम बायकोनी मात्र एकदम लगेच ओळखलं. लग्न झाल्यावर..विशेषतः अरेंज मॅरेज झाल्यावर आपण 'आपल्या' लोकांची ओळख करून देताना भरभरून बोलत असतो. रश्मी तसंच तिच्या नातेवाइकांबद्दल खूप खूप बोलत होती. माझी टर्न आल्यावर मी मात्र कपिला काठी काबाबबद्दल  खूप काही बोलत होतो ... माझं हे पाहिलं प्रेम तिच्या पोटापर्यंत पोचलं होतं .... आणि हे मला कळलं जेव्हा मी पहिल्यांदाच सासरी चाललो होतो.. पुणे स्टेशनला गेल्यावर 'सासरी' जायचंय ह्या कल्पनेनीच पोटात गोळा आला होता....रश्मीने ते बरोबर ओळखलं होतं.... आणि ट्रेन मध्ये बसल्यावर पार्सल करून आणलेला 'एक चिकन डबल' माझ्यासमोर ठेवला... पोटातल्या गोळ्याचं भुकेमध्ये परिवर्तन झालं .... कपिलाच्या त्या वासाने स्ट्रेस बस्टरचा 'रोल' एकदम परफेक्ट प्ले केला ...कपिला आणि माझ्या प्रेमाच्या प्रवासातला हा नवीन टप्पा सुरु झाला होता ....आणि मी एका हातात बायकोचा हात , दुसऱ्या हातात चिकन रोल आणि चेहऱ्यावर स्माईल घेऊन सासरी निघालो....

- स्वागत पाटणकर 

Thursday, November 23, 2017

कन्फेशन

कन्फेशन 



आपल्याला सगळं कळतं किंबहुना आपल्यालाच सगळं कळतं ... आयुष्याच्या ह्या फेजमध्ये अर्थातच कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट असेल. मी नुकताच पुरुषोत्तम करंदकमध्ये भाग घ्यायला लागलो होतो; त्यामुळेच अभिनयातलं आपल्याला जरा कळायला लागलंय ह्या भावनेत पूर्णपणे बुडून गेलो होतो. त्यातच सुदर्शनला जाऊन प्रायोगिक नाटकं बघायची सवय लागली (किंवा लावून घेतली... किंवा सवय लागलीये असं इम्प्रेशन तयार केलं) आणि त्यामुळेच अभिनय, नाटक, सिनेमा, अभिनेता, अभिनेत्री वगैरे वर आपण काहीही बोलू शकतो हा (फाजील) आत्मविश्वास तयार झाला. एकतर मी जन्माचा पुणेकर त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर मत ठोकून द्यायचं ही आमची जन्मापासूनची सवय.... पण ह्या फाजील आत्मविश्वासाने ठोकलेली मतं ही अचूक आहेत असा एक गोड गैरसमज मी करून घेतला होता... अर्थातच तो 'गैर'समज आहे हे समजायला ८एक वर्ष गेली...

सन २०१०.. जानेवारी महिना.. त्या महिन्यात नटरंग, शिक्षणाच्या आईचा घो, हरिश्चंद्राची फॅक्टरी वगैरे एक से एक मराठी सिनेमा रिलीज झाले होते. बाप महिना होता तो आपल्या इंडस्ट्रीसाठी.... नटरंग फर्स्ट डे फर्स्ट शो टाकला होता... सिनेमा सुरु झाल्या झाल्या पहिल्या अर्ध्यातासात लोकांनी शिट्या , आवाज, दंगा करत थिएटर डोक्यावर घेतलं होतं... वाजले कि बारा गाणं सुरु होतं.. सिनेमा संपला... आम्ही सिनेमा ग्रुप सिनेमानंतर नेहमीप्रमाणे चर्चा (रिव्यू) करायला बसलो...  लोकं सिनेमा , रवीजाधव, अतुल ह्याबरोबर एक नाव सारखा सारखं घेत होते... अमृता खानवेलकर! खूप कौतुक चाललं होतं तिचं... काय झालं मला काही कळलं नाही पण मी मेजर विरोध दर्शवला... "फक्त १ आयटम सॉंग तर करून गेलीये.. डान्स बरा करते पण अभिनयाचं काय... साधं मराठी पण नीट बोलता येत नाही तिला... इंग्लिश मीडियममधली असेल .. " मी रपारप - एका मागोमाग कमेंट्स करत होतो.. खरं तर 'का' असं बोलतोय हे माहित नव्हतं.. समोरच्याशी मतभेद करायचा हे एकमेव कारण असावं... पण मी सगळं बोलून गेलं होतो... लोकांना ते पटलं नव्हतं पण माझ्या बोलण्याला जास्त कोणी विरोधही केला नव्हता... अमृतानी डेब्यू करून २-३ वर्ष झाली असतील पण अवॉर्ड्स प्रोग्रॅममध्ये वगैरे  तिच्या मराठी उच्चारांबद्दल विनोद करत असत समहाऊ त्यामुळे तिची इमेज तशी झाली होती आणि म्हणूनच लोकांनी मला फारसं विरोध केला नाही... ती रिव्यू चर्चा जिंकल्याचा मला आनंद होत होता पण तो वरवरचा होता.... उगाचच एखाद्याबद्दल टीकात्मक बोलून गेलोय हे आतून टोचत होतं... 

आणि मग नकळत मी अमृताचे करियर फॉलो करायला लागलो होतो....  फॅनवगैरे नाही अजिबातच नव्हतो... कारण माहित नाही पण ती कुठलं प्रोजेक्ट करतीये, कसं करतीये ह्यावर लक्ष ठेवून बसणं ही एक सवयच होऊन गेली होती! गैर,फुंक, अर्जुन, सतरंगी रे   वगैरेंमधून ती वर्षातून २-३ सिनेमा ह्या हिशोबानी आपल्यासमोर येतच होती... हिंदीमध्येही दिसत होती ... पण माझ्यातल्या तिच्या टीकाकार मनाला ती भावून गेली शाळामधल्या छोट्याश्या भूमिकेत... अतिशय छोटा होता तो रोल पण तो तिचा स्क्रीन प्रेझेन्स मला सपकन आवडून गेला होता... का कोणास ठाऊक पण ही मुलगी एक ऑल राउंडर आहे असं वाटलं... मग आलेल्या बाजीमुळे ही मुलगी अभिनयाचं पूर्ण पॅकेज आहे हे पटून गेलं... पण  आपल्याच पूर्वीच्या मताचा विरोधाभास कशाला म्हणून कधी ४-चोघात तिचं कौतुक केलं नाही.

आणि माझ्या मनातलं कन्फ्युजन खोडून टाकलं ते २०१५नी....  नच बलिये ७ तर जिंकलंच तिने पण कट्यारमध्ल्या झरीनाने माझं मन जिंकून टाकलं... अभिनय होताच सुंदर ... पण तिच्या अस्खलित अशा हिंदी आणि मराठी शब्द उच्चारांनी माझ्यातल्या टीकाकाराला खणखणीत वाजवली होती... उचारांमागची तिची मेहनत दिसत होतीच.... तिचे कष्ट, तिच्या मेहनतीला महत्वपूर्ण जोड होती तिच्या चिकाटीची.... अशी चिकाटी - अशी जिद्द जी  २००४ साली इंडियाज बेस्ट सिनेस्टार कि खोज मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तब्बल ११ वर्षांनीसुद्धा त्याच जिद्दीने ती नच बलियेमध्ये उतरली! अंडर-डॉग्स म्हणून तिच्याकडे बघितलं जात होतं ....आणि ती डायरेकट विजेती होऊनच बाहेर आली.. तिचे कष्ट तिची गुणवत्ता तिची मेहनत पूर्णपणे रिझल्ट दाखवत होती... मराठी अभिनेत्री देशभर आवडती झाली होती... आणि अर्थातच माझीसुद्धा! इंडस्ट्री ला मिळालेला हा ग्लॅमरस चेहरा!! यशाची पायरी चढताना शिडी लागल्यासारखी ती आता अजून उंच उंच पोचायला लागलीये... २ मॅड सारख्या कार्यक्रमात ती जज म्हणूनसमोर आली आणि ती भूमिका सुद्धा तिनी परफेक्ट निभावली.. अनिल कपूरच्या २४ मध्ये दिसली... आपली पुण्याची मराठी मुलगी खूप पुढे जातीये हे बघताना लै कौतुक वाटत होतं... त्यातच करण जोहरचा सिनेमा ती करतीये ही बातमी मिळाली... क्युट,हॉट, कडक डान्स आणि अप्रतिम अभिनय हे सगळं पॅकेज असणारी ही मेहनती गुणी मुलगी ...तिच्या नशिबात तिनी हे सगळं मिळवलं.. स्व-कष्टानी मिळवलं! तिचं हे यश असंच वाढत राहो ही इच्छा!

कट्यार,नच बलिये, २४ वगैरे मधूनअमृता सारखी भेटत होतीच... पण कदाचित ते कमी पडत होतं....तुमच्या मनात किती ही इगो असला तरी दुसऱ्याच्या आयुष्यात डुंकून बघायला लै आवडतं.. आणि म्हणूनच तिला सोशल मीडियावर फॉलो करायला लागलो होतो...
गेल्या २-३ वर्षात तिच्या पोस्टची आवर्जून वाट बघता बघता मला तिच्यातल्या वेगळ्याच बाजूची ओळख झाली... ती एक उत्तम , मेहनती कलाकार आहेच पण त्याबरोबरच एक गोड मैत्रीण, गुणी मुलगी आणि  निर्मळ मनाची माणूस आहे! सोशल मीडियाच्या जमान्यात ..प्रत्यक्ष भेट न होता माणसाची एक ओळख होऊन जाते... लहान मुलांबरोबर वाढदिवस साजरा करणारी मॅच्युअर्ड अमृता किंवा ऑस्ट्रेलियामधल्या व्हिडिओत बागडणारी तिच्यातली लहान अमृता ... नवरात्रीमध्ये घरातल्या देवीला मिस करणारी अशी ही इमोशनल भावून मनाची अमृता ....अशा अनेक गोष्टींमधून ती आपलीच एक मैत्रीण बनून गेली.... आपल्याला अभिमान वाटावा अशी एक आपली गोड मैत्रीण!! अमृताच्या गुणवत्तेला ओळखायला मला उशीरच झाला.... पण ही गुणी मराठी मुलगी अभिनय क्षेत्रात पुढची अनेक वर्ष असंच राज्य करेल हे मला तिच्या वाढदिवसानिमित्त जगाला ओरडून सांगावंसं वाटलं .... तिला ओळखायला मी चुकलो हे कन्फेस करावंसं वाटलं.... म्हणून हा सगळा खटाटोप! 

अमृता .... हॅपी बर्थडे .......यू रॉक!!!!! 

-स्वागत पाटणकर 

फसवं ऊन



फसवं ऊन

बाहेर साधारण मायनस ४ वगैरे टेम्परेचर असतं... थंडी हवेत एकदम मिसळून गेलेली असते... दुपारी ४ वाजताच अंधार पडायला पडतो त्यामुळे अंधारासारखाच गारवासुद्धा एकदम गडद होऊन जातो... आपण कुडकुडत घरात बसतो.. हीटर लावतो...हातात वाईन असते तर दुसऱ्या हातात एखादं पुस्तक... खिडकीजवळच्या आराम खुर्चीत बसतो ... ती गार खिडकी आपल्याला काही स्वस्थ बसवून देत देत नाही.. मग एक ब्लॅन्केट अंगावर ओढून पुन्हा वाईन आणि पुस्तकाकडे मोर्चा वळवतो.... ब्लॅन्केटमुळे बाहेरून आणि वाईनमुळे आतपर्यंत पोचलेली ती आर्टिफिशियल ऊब डोळ्यांना झोपायला सांगते....सोबतीला असतात त्या गार भिंती.... गार गाद्या... गार आपण... गुलाबी टू बोचरी हा थंडीचा प्रवास सुरु होतो ... कुडकुडत आपण झोपी जातो...  
सकाळ सकाळ पडद्याच्या गॅपमधून भिंतीवर पडलेली एक ऑरेंज लाईन दिसते... किलकिल्या डोळ्यांना समजतच नाही.... अंगावरून ब्लॅन्केट आणि डोळ्यांवरून झोप काढल्यावर साक्षात्कार होतो.... अर्रे सूर्यदेवता आज  चक्क भेटायला आल्या आहेत...मन प्रसन्न होतं ... मनातल्यामनात बागडायला लागतं... आपण उठून जोरात पडदे बाजूला करतो....सकाळच्या त्या फ्रेश किरणांचे घरात स्वागत करतो... हातात कॉफी घेऊन पुन्हा त्याच खिडकीजवळच्या त्याच आराम खुर्चीत बसतो... कालच्या रात्रीची खिन्नता त्या सन बाथ मध्ये एकदम धुतल्यासारखी होते.. समोरच्या झाडावरचे पक्षीसुद्धा खुश दिसतात..त्यांचा किलबिलाट सुरु असतो... सूर्यदेवताची तो विझिट सगळ्यांनाच आवडलेली असते... आज तो अतिशय लांबचा डोंगरसुद्धा स्पष्टपणे दिसत असतो ....सनी डे अँड क्लीयर स्काय ....
बॉइल्ड एग्ज खाऊन तावातावानी जॅकेट कानटोप्या शूज वगैरे घालून बाहेर जायला तयार होतो... दार उघडून बाहेर गेल्यावर पहिले २ सेकंद खूप छान वाटतं .... त्या नंतर मात्र लगेच अतिउत्साह संचारलेल्या शरीरातली हवा एका शॉट मध्ये फुस्स होऊन जाते.... सकाळच्या १०च्या उन्हात उभं राहून सुद्धा आपल्याला हवेतल्या गारव्यानी पूर्णपणे वेढलेलं असतं.... आपल्या नजरेला दिसणाऱ्या त्या उन्हानं आपल्याला फसवलेलं असतं... दिसतं तसं नसतं ह्या प्रिन्सिपलला फॉलो करणारं ते 'फसवं ऊन'...कानटोप्या , जॅकेट वगैरे सगळी शस्त्र असून सुद्धा आपण त्या अनपेक्षित थंड हल्ल्यासमोर पराभूत होऊन जातो.. सपशेल पराभूत....एवढं ऊन असून थंडी मात्र जिवघेणी बोचरी .... मनाला पटतच नाही...पराभव पचवण्याचा प्रयत्न करत घरी परतण्याचा निर्णय घेतो... घरात घुसल्या घुसल्या उबदार वाटतं... पण मन दुखावलेलं असतं ते पराभवामुळे नाही .... तर समोर दिसणाऱ्या त्या पिवळ्या धमक 'फसव्या उन्हामुळे'.... कोणाकडून तरी फसवलं गेलंय ही भावना टोचत असते.... पुन्हा त्याच खिडकीत बसतो... हातात कॉफी आणि लांबचा डोंगर बघत बघत.... इकडचा हा सूर्य मग परका होतो... नजरेसमोर येत असते आपल्या घरच्या उन्हाची मजा.. शिवाजी पार्क वरच्या दवबिंदूंनी ओलसर झालेल्या क्रिकेटच्या पीचला मायेची ऊब देऊन पांघरून घालणारं दादरचं ते कोवळं ऊन हवंहवंसं वाटतं.... हे काहीच नाही.. पुण्याच्या कर्वे रोड वर दुपारी १२ वाजता ट्राफिक जॅम असताना अंगावर चटके देऊन हल्ले करणाऱ्या कडक उन्हाची सुद्धा खूप आठवण येते....समोरचा तो डोंगर बघत ... दुःखाचा डोंगर कोसळल्याचा आवेशात आपण त्याच खिडकीत बसून राहतो.... आपल्या उन्हाची आठवण काढत काढत.... आणि नकळत समोरचा डोंगर पुन्हा नाहीसा व्हायला लागतो.. अस्पष्ट दिसायला लागतो... वाटतं डोळ्यातल्या पाण्यामुळे असं होतंय पण ते तसं नसतं... पुन्हा ४ वाजलेले असतात... सूर्य देवता ऑफिस लवकर संपवून निघून जाते... अंधार पडतो... डोंगर काय.... समोरचं ते झाड पण दिसेनासं होतं.. पक्ष्यांची किलबिल बंद होते.... खिडक्या गार पडायला लागतात .. हातात वाईनचा ग्लास येतो.... पुन्हा निपचित पडलेल्या त्या अंधाराकडे बघत बघत  पहिला घोट घेतो... आणि थोडा जास्त विचार केल्यावर ते फसवं का असेना पण मन प्रसन्न करायला आलेल्या त्या उन्हाचा प्रेझेन्स एन्जॉय न करता त्या 'ऍबसेन्ट' असलेल्या कडक उन्हाच्या दुःखात दिवस वाया घालवतो...   आपलीच चूक आपल्याला उमगते ....जे मिळालंय त्याचा आनंद न घेता जे नाहीये त्या गोष्टीचं दुःख .- तक्रार करण्याची प्रवूत्ती दिसून येते .... आणि हे बदलायची गरज सूचित करते.... फसव्या उन्हाचा असा एक दिवस येतो आणि कोवळ्या मनावर कडक शिकवून देऊन जातो!
-- स्वागत पाटणकर 


Thursday, November 9, 2017

गाजर का हलवा ,आलू के पराठे - मराठीतले

गाजर का हलवा ,आलू के पराठे - मराठीतले          

       आई लोकांच्या घरची कामंवगैरे करून अतिशय कष्ट घेत पोराचं पोट भरतीये पण पोरगं बाहेर चोऱ्या करत बसलंय किंवा मुलगा खूप दिवसांनी घरी येतोय आणि घराबाहेर हेलिकॉप्टरमधून उतरल्या उतरल्या असा आईच्या डोळ्यात अचानक गंगेला पूर आल्यासारखं पाणी वाहायला लागलंय.... हे असं काही फिल्मीवगैरे न करता एकदम सहज सॊप्या पद्धतीनी मनावर उतरणारी आई-मुलाचं निर्मळ, प्रेमळ, सुंदर असं नातं पडद्यावर सहजतेने  दाखवणारी 'आई-मुलाची' एक जोडी २०१७नी आपल्या मराठी इंडस्ट्रीला दिली.. कुठलाही अतिरंजितपणा न करता आई-मुलाचं ते ओलं नातं दाखवणारी एक जोडी... अमेय वाघ आणि चिन्मयी सुमीत!

काही महिन्यांपूर्वी आलेल्या मुरांबामध्ये, चिन्मयी आणि अमेय हे आई-मुलाच्या भूमिकेत दिसले. दोघेही एकदम कसलेले कलाकार, अभिनय अंगात भिनलेला त्यामुळे 'मुरांबामधला आलोक आणि त्याच्या आई'च्या नात्यामध्ये कुठलाही कुत्रिम फॅक्टर नव्हता. नैसर्गिक... एकदम जिवंत अभिनय..खरं सांगायचं तर कुठेही ते 'अभिनय' करतायेत असं जाणवलंच नाही... आलोकची चिडचिड आणि आईची काळजी हे एकदम आपल्या घरातलाच सीन आपण पडद्यावर बघतोय कि काय इतकं खरं! चिन्मयीनी केलेली आई आणि अमेयनी साकारलेला मुलगा ही ऑनस्क्रिम केमिस्ट्री लैच आवडून गेली.... आणि कदाचित त्यामुळेच सध्या धुमाकूळ घालणाऱ्या फास्टर फेणे मध्ये ही जोडी छोटंसं का होईना पण पुन्हा गोड दर्शन देऊन गेली आणि मराठी इंडस्ट्रीला नवीन हिरो व नवीन हिरोला तेवढीच तगडी आई मिळालीये असं वाटून गेलं!

   अमेय वाघ म्हणजे सळसळत्या उत्साहाचा एक उत्तम नमूना...तो आपल्या पुण्याचा आणि त्यातच माझ्याच कॉलेजचा. त्यामुळे त्याचा कॉलेज अभिनेता ते फेणे हा त्याचा प्रवास एकदम जवळून बघायला मिळाला... आणि त्यामुळेच त्याच्याबद्दल बोलताना कधीही कोकणस्थीपणा आडवा येत नाही.. भरभरून कौतुक केलं जातं  आणि अर्थातच तो तेवढा कौतुकास्पद आहेच. त्याच्या करियरमधल्या दोन मोठ्या शिड्या त्यानी आलोक आणि बनेश फेणेच्या रूपात पार केल्या आहेत.  मध्यमवर्गीय संस्कार असलेला, एवढं यश एकदम मिळूनसुद्धा  जमिनीवरच पाय असणारा असा हा अमेय.....

आणि.....

अमेयसारख्या अतिशय गुणी अशा कलाकाराला मोठं होताना बघून जितका आनंद आम्हा बीएमसीसीकराना होतो , जेवढं प्रेम आम्ही त्याला देतोय तेवढंच प्रेम - आशीर्वाद हे अमेयसारख्या नवीन कलाकारांना देणारी, दुसऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारी अभिनेत्री म्हणजे चिन्मयी सुमीत! हिचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं तर लगेच उत्तर येईल 'मायाळू'!  सोशल मीडियामुळे विचारांची देवाण घेवाण फार सोप्पी झालीये आणि त्यामुळेच प्रत्यक्ष न भेटलेली चिन्मयी ही ओळखीची झाली... आणि कुठल्याही गोष्टीवर नेहमी पॉझिटिव्हपणे व्यक्त होणारी चिन्मयी ही कळायला लागली!स्वार्थी हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाकणारी, सह-कलाकारांना आपली फॅमिलीच बनवणारी , भयंकर जीव लावणारी अशी ही चिन्मयी सुमीत...

माणसाचं मन चांगलं असलं ना कि आपोआप त्याच्या हातून चांगली कामं होत जातात.. चिन्मयी आणि अमेय हे दोघेही त्याच कॅटेगरीमधले! हाच चांगुलपणा त्यांच्या अभिनयात उतरला असावा आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये एक जिवंतपणा येत असावा. कदाचित ह्यामुळेच बनेश फेणेसारख्या व्रात्य असलेल्या मुलांच्या आईला ह्या 'टोण्याची काळजी करू का कौतुक' हे चिन्मयीनी बोललेले शब्द स्वतःचेच वाटतात  ... किंवा मुरांबामध्ये आलोक जेव्हा आईला वेडा-वाकडा... वाट्टेल तसं बोलतो तेव्हा प्रेक्षागृहातील आईच्या मनात आधी राग आणि दुसऱ्या सेकंदाला डोळ्यात पाणी आलेलं असतं ... आणि नेमके तेच भाव पडद्यावर चिन्मयीच्या डोळ्यात असतात! अभिनय जिवंत वाटायला अशा ड्रॅमॅटिक सीन्सची गरजच नसते... साध्या नॉर्मल सीनमधलं पण साधेपण टिकवणं फार महत्वाचं असतं.. आणि तेच बरोबर जमतं ह्या दोघांना....  उदाहरण म्हणजे मुरांबामध्ये... एका सीनमध्ये आई म्हणजेच चिन्मयी डोसे हवेत का असं अमेयला विचारते तेव्हा पटकन असं वाटतं कि आपणही त्यांच्या किचनमध्ये जावं आणि आईच्या हातचे डोसे खाऊन यावं! इतका तो सहज अभिनय आपल्यासमोर सादर केला जातो...रीमाताईंच्या नंतर एक तगडी आई मिळालीये चिन्मयीच्या रूपात...


ह्या दोघांना एकत्र स्क्रीनवर आणणाऱ्याला खूप मोठं धन्यवाद!


आपल्या हिंदी इंडस्ट्रीमधल्या आई एक्सपर्ट असते ती २ गोष्टींमध्ये- गाजर का हलवा - आलू के पराठे....
मुलगा घराबाहेर कुठेही निघाला की ती हे एवढंच मुलाला प्रेमानी देत असते. मला तर चिन्मयी - अमेयची जोडी  ही 'गाजर का हलवा - आलू के पराठे' सारखीच वाटते... म्हणजे ... अभिनय क्षेत्रात किसून किसून ...सॉरी कसून-कसून मोठी झालेली, गाजरहलवा सारखीच लाल गालांची ...  गोडवा मुरलेली  ...अशी चिन्मयी आणि आलू के पराठ्यासारखा सगळ्यांना आवडणारा अमेय .... बटरचा तुकडा विरघळून जावा तसंच मुलींचं मन विरघळवून जातं असा  हॉट फेणे उर्फ अमेय!

लक्ष्या - अशोक सराफ, स्वप्नील-मुक्ता अशा अनेक हिट मराठी जोड्या .... तसंच  बॉलिवूडचा टायगर आणि रीमा ह्यांच्या एवढीच आपला 'वाघोबा आणि चिन्मयीची' माय - लेकाची ही जोडी सुपरडुपर हिट होवो आणि आम्हाला सारखी सारखी भेटत राहो हीच प्राथर्ना!!

- स्वागत पाटणकर

Friday, October 27, 2017

गच्ची! - नॉट जस्ट अ टिझर रिव्यू!

गच्ची! - नॉट जस्ट अ टिझर रिव्यू!

काल  एक मूवी टिझर पाहिलं...सिनेमाचं नाव गच्ची! गच्ची?? कोणी कधी ह्या नावानं सिनेमावगैरे काढेल असं वाटलं नव्हतं....  पण हा तरुण-नवा कोरा दिग्दर्शक नचिकेत सामंत, 'गच्ची' हे असं वेगळं....पण आपल्या जवळचं असणारं नाव देऊन  पहिली राउंड आलरेडी जिंकलाय! पिक्चरची उत्सुकता मेजर वाढते हो आशा टायटल नी!

टिझर बघायला इथे क्लिक करा

साधारण ६० सेकंदाचं हे टिझर.... पण त्या ६० सेकंदात चाळ लाईफ, मध्यमवर्गीय प्रॉब्लेम्स  म्हणजेच कर्ज  आणि ते फेडायचं टेन्शन... इथपासून ते... डायरेक्ट गच्चीवरून उडी मारायला निघालेली 'उच्च' वर्गातली (वाटणारी) मुलगी ...आपल्या निर्णयावर ठाम न रहाणारी ... एक अर्क मुलगी... अशा काही गोष्टींचा अंदाज हे टिझर आपल्याला देतं. नायक नायिकेची पहिलीच भेट झालेली जागा म्हणजे गच्ची आणि सम्पूर्ण स्टोरी ह्या गच्ची भोवती राहणार असं वाटून जातं. तरुण मुलांना टेन्शनमुळे होणारा डायबेटीस आणि त्या गोष्टीचा सतत विचार करणारे ते .. अगदी सकाळच्या 'महत्वाच्या कामात' सुद्धा मध्यमवर्गीय मुलं कर्जाचाच टेन्शन घेणारे... अशा सीन्समधून आजच्या तरुणाच्या ,आजच्या प्रॉब्लेम बद्दल बोलणारा हा पिक्चर इंटरेस्टिंग असेल असं वाटतंच पण हे सगळं गमतीदारपणे आपल्यासमोर मांडलं जाईल लगेच समजतं ते - हिशोबाच्या कागदावर कर्ज देणाऱ्या  जगतापची काढलेली स्मायली, चहावाल्याचा कावळा आणि गच्चीवर झालेले अभय - प्रिया मध्ये खुसखुशीत संवाद.ह्या मधून ! नवाकोरा नचिकेत सामंत  वेगळी गोष्ट खास त्याच्या वेगळ्या स्टाईलने सादर करणार असं एकूणच दिसतंय.त्याबद्दल त्याच अभिनंदन!




आता जरा वळूयात कलाकारांकडे. सध्या इंडियन क्रिकेट टीम आणि मराठी फिल्म इंडस्ट्री हे एकदम सेम फेज मधून जात आहेत... इंडियन टीमला कसं एका मागोमाग एक से एक म्हणजे पांड्या, कुलदीप, राहुल असे  यंग आणि  टॅलेंटेड हिरोज मिळत आहेत.... अगदी तसंच आपल्या मराठी इंडस्ट्रीच... अलोक , अमेय , निपुण आणि आता हा त्यांच्याच लाईनमधला , एकदम ऑलराऊंडर आणि गुणी कलाकार अभय महाजन! अभय आपल्या पुण्याचा आणि माझ्याच बीएमसीसी कॉलेजचा.. त्यामुळे अर्थातच त्याच्याबद्दल एकदम सॉफ्ट कॉर्नर. पण हे सगळं कौतुक हे त्या सॉफ्ट कॉर्नरमुळे नाही पण त्यांनी प्रूव्ह केलेल्या टॅलेन्टमुळे. ' रंग पतंगा ,सीआरडी ' हे पिक्चर आणि 'दळण , बिनकामाचे संवाद ' सारखी तगडी नाटकं ... अशा उच्च दर्जाच्या  नेट प्रॅक्टिस मधून तयार झालेला धडाकेबाज बॅट्समन म्हणजे अभय महाजन ..आणि आता त्याला वेल डिझर्व्हड लीड रोल मिळालाय..  आनंदाची गोष्ट म्हणजे साहेब एकदम तंतोतंत शोभलेत त्या रोलमध्ये! 'तो गोंधळलेला, टेन्शन घेतलेला , डायबेटीस आणि डायबेटिसचाच विचार करणारा.... ' असा तो नायक आणि त्या रोलमध्ये एकदम समरस होऊन गेलेला  महाजन बघून खूप भारी वाटत! महाजनच्या आवाजात प्रेक्षकांना लगेच आपलंस करून घ्यायची एक शक्ती आहे. त्याचाच तो खुबीने वापर करत त्याच भोळेपण तो ६० सेकंदात टीझरमधून दर्शवतो...  "अशी कोणाची ..... हॉबी असते का" "डायबेटीस आहे, जखमा बऱ्या होत नाहीत' एकदम भोळा पण निर्मल विनोद निर्माण करणारा असा हे 'हिरो' त्यानी रेखाटलंय... एकदम भरत नाट्य मंदिरवर तो ज्या प्रकारे फटकेबाजी करायचा अगदी त्याच पद्धतीत तो बिग स्क्रीनवर वावरतोय हे बघून खूप भारी वाटून गेलं.. त्याचं भोळेपण पोरींना वेडं करणार हे नक्की!

ह्या अशा भोळ्या माणसासमोर आहे  प्रिया बापट ... गच्चीवरून उडी मारायला निघालेली प्रिया बापट! मला प्रियाबद्दल लिहायला फारसं आवडतच नाही .... लिहायला घेतलं कि किती आणि काय काय लिहू असं होतं ... शाई संपेपर्यंत लिहिलं जातं ..\आज तर ती वझनदारमधल्या गोलूपोलु नंतर आज खूप दिवसांनी दिसली .. तेसुद्धा डायरेक्ट गच्चीच्या कठड्यावर उभी! पिंक ड्रेसमध्ये पुन्हा एकदा फ्रेश स्माईल आणि 'हॉबी आहे माझी' ह्या एकाच डायलॉगमधून अशक्य साठवलेला क्युटनेस घेऊन ती आपल्यासमोर वाहते!  आपण फक्त तिच्याकडे बघतच राहायचं! एक्सप्रेशन एवढे गोड ....  डायबेटिक नायकाची शुगर लेव्हल वाढत असेल ती हिच्यामुळेच .. एवढी आमची बापट गोड़! ह्या टीझरमध्ये ती  हार्डली १० सेकंड दर्शन देते...पिंकड्रेसमध्ये आपल्याला वेडं करते .... तुरुतुरु पळते  आणि २२डिसेंबरची वाट बघायला लावते!!!

गच्ची! रोजच्या जगण्यात आपण गच्चीच्या जवळ असतो... चपाछपी खेळणाऱ्या लहान मुलांपासून ते कॉलेजमध्ये लफडी करणाऱ्यांपर्यंत.... गाण्यांपासून शिव्यांमध्ये  गच्ची असते .... मन लावून अभ्यास करणाऱ्यापासून ते टवाळक्या करत पतंग उडवणाऱ्यांपर्यंत, सिगरेट ओढणार्यांपासून ते उडी मारणाऱ्यांपर्यंत.....  सकाळ सकाळ योगासनं  करणाऱ्या आजोबांपासून ते पापड वाळत घालणाऱ्या आजींपर्यंत अशा किती तरी वेगवेगळ्या प्रकारे गच्ची आपल्या जवळची झालेली असते आणि आपण तिच्या...अगदी कळत-नकळतपणे!  युवा दिग्दर्शक नचिकेत, अभिनेता अभय आणि प्रिया ह्या सर्वांचं युथफूल , नवीन एक मस्त असं  फ्रेश कॉम्बिनेशन घेऊन आलेली लँडमार्क फिल्मस् ची गच्ची अजून अजून उंच बांधली जाणार आणि त्यात अवॉर्डरूपी अनेक बाहुल्या येणार ह्याची खात्रीच वाटून गेलीये!

आपण यंदा ख्रिसमसला सॅन्टाला घेऊन जाणार गच्चीवर!! कारण आपली हॉबी अशीच असते! ---     स्वागत पाटणकर

Tuesday, October 24, 2017

त्या दोघी... ट्रीट फॉर फॅन्स!

त्या दोघी... ट्रीट फॉर फॅन्स!
     

      एका टेबलवर दोघीजणी समोरासमोर बसल्यात... त्यातली एक भारीतलं घड्याळ घातलेली, इंग्लिश पुस्तक वाचत 'मग' मधून कॉफी पिणारी ... तर दुसरी हिरव्या बांगड्या घालून, टिपिकल कप-बशीतून चहा पीत पीत लोकरीचा गोळा घेऊन वीणकाम करणारी.... दोन व्यक्ती पण एकदम भिन्न प्रवूत्ती... सचिन गुरवनी नेहमीप्रमाणेच कल्पकतेने तयार केलेलं .... कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्कंठा वाढवणारं हे पोस्टर आज  इंस्टाग्राम वर पाहिल...चित्रपटाचं नाव - आम्ही दोघी! इंटरेस्टिंग पिक्चर वाटतोय असं मनात म्हणेपर्यंत ...स्क्रोल डाऊन करता करता नजर पुन्हा त्याच पोस्टरवर गेली  आणि ती तिकडेच थांबली.... डोळे मोठे झाले आणि जोरात कंठ फुटला...  त्या दोघी मधल्या दोघी म्हणजे -मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट! आर यु किडींग मी??? मुक्ता आणि प्रिया एकत्र... कसला बाप प्रकार आहे हा आयुष्यातला...जेवढा आनंद आमीर आणि शाहरुखला एकत्र बघायला झाला असता त्यापेक्षा जास्त खुश झालो आपण ... आम्ही दोघीचं पोस्टर बघून!दिग्दर्शक,कास्टिंग हेड, प्रोड्युसर जे कोणी हे 'कास्टिंग' केलंय त्यांना शंभर पैकी शंभर मार्क्स मी देऊन टाकले!


        "मला ही खूप आवडते" किंवा "ती कसली क्युट आहे" वगैरे असं बायकोसमोरसुद्धा आत्मविश्वासानी कोणाबद्दल बोलता येत असेल तर त्या म्हणजे मुक्ता आणि प्रिया... 
तसं बघायला गेलं तर ह्या दोघी एकत्रच माझ्या आयुष्यात आल्या... म्हणजे त्या माझ्या आयुष्यात आल्या पण मी काही त्यांच्यापर्यंत पोचलो नाही.. असो मुद्दा असा की साधारण १२-१३ वर्षांपूर्वी, जेव्हा मी बीकॉम ह्या गोंडस नावाखाली आयुष्यात काहीही करत नव्हतो तेव्हाच मुक्ता आणि प्रिया दोघी इंडस्ट्रीमध्ये सेट होत होत्या. आभाळमाया,फायनल ड्राफ्ट, देहभान वगैरे क्वालिटी प्रॉडक्टसमधून मुक्ता समोर येत होती , तिची छाप पाडून जात होती .... तर २००३च्या आसपास डायरेक्ट राजू हिरानींच्या मुन्नाभाई सिरीजमध्ये प्रिया थोडी का होईना पण दिसली होती, आवडून गेली होती. आणि तेव्हाच वाटून गेलं होतं ही मुलगी पुढे जाणार...  

त्या दोन-तीन वर्षात आमच्यात हे 'इंट्रो' सेशन झाल्यावर खरी मैत्री झाली ती मात्र २००८-०९ च्या दरम्यान... स्त्री कलाकार सुद्धा प्रेक्षकांना खदखदून हसायला लावू शकतो ते ही काहीही पाचकळ चाळे न करता... हे ताकदीने दाखवून दिलं मुक्ताने - एक डाव धोबीपछाडमधून. तोपर्यंत बऱ्यापैकी सिरीयस किंवा मॅच्युअर्ड व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मुक्ताकडून ती 'सुलक्षणा' बघायला मिळणं म्हणजे एकचेहऱ्यावर खूप मोठं स्माईल आणणारं सरप्राईज होतं. सशक्त अभिनय म्हणजे फक्त प्रेक्षकांना सिरीयस करून त्याच्या डोळ्यात पाणी आणणं नव्हे... पण आपला तोच चेहरा घेऊन अभिनयाचं कौशल्य दाखवत लोकांना हसवणं देखील फार अवघड काम. मुक्ताने ते लीलया पेललं होतं ते सुद्धा विनोदाचे बादशाह अशोक सराफ समोर असताना! तेव्हाच आपली आणि तिची घट्ट मैत्री झाली... ! त्यानंतर मात्र तिनी पिक्चरला बोलवायचं आणि आम्ही पहिल्याच दिवशी जायचं हा अलिखित नियम होऊन गेला... 
नंतर नंतर तर ही इंडस्ट्रीची विराट कोहलीच होऊन गेलीय... टेस्ट, वन डे किंवा टी २० कुठल्या फॉरमॅटमध्ये कोहली फॉर्मात असतो अगदी तसच आमच्या मुक्ताचं ... भलतीच ऑलराऊंडर... टीव्ही , नाटक आणि सिनेमा सगळीकडे हिची जोरदार बॅटिंग आणि चौफेर फटकेबाजी!  जोगवा , आघात , मुंबई पुणे मुंबई, लग्न पाहावे करून , बदाम राणी गुलाम चोर ,डबल सीट , अलीकडेच आलेला गणवेश आणि हृदयांतर हे असे विविध प्लॅटफॉर्मवरचे सिनेमे, महाराष्ट्राच्या तरुण मुलांनासुद्धा डेली सोप बघायला लावणारी एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि कब्बडी -कब्बडी , छापा काटा , कोडमंत्र अशी तगडी नाटकं घेऊन ती नेहमीच भेटायला येते आणि सवयीप्रमाणे निशब्द करून जाते! 
मुक्ताची घरी ओळख करून द्यायची गरजच नाही लागली.... बघतो तर काय घरात आई,बायको अशा सगळ्यांची लाडकी अशी ही मुक्ता. एकदा, कोथरूडमध्ये पी एन जी दुकानाबाहेर आई आणि बायकोला मुक्ता बर्वे दिसल्यावर त्यांनी बिनधास्त हाक मारली; मुक्तापण ग्रेटच लगेच थांबून ५ मिनटं बोलूनच पुढे गेली.. काय खुश झाल्या होत्या तेव्हा माझ्या घरातल्या बायका... घरी येता येता त्यांनी समोरच्या जोशी स्वीट्समधून आंबा बर्फी वगैरे आणली! ही अशी आमची मैत्रीण... एकदम हुशार,अष्टपैलू अशी घरातल्या सगळ्यांची लाडकी!



         एकीकडे बर्वे आणि दुसरीकडे त्याच काळात मैत्री (अर्थातच एकतर्फी) केलेली प्रिया  बापट! 'मी शिवाजीराजे...' मध्ये तिला फुल्ल रोल मध्ये बघितल्यावर मुन्नाभाई बघितल्या नंतरची प्रतिक्रिया खरी होणार ही खात्री पटली. ही मुलगी नक्कीच पुढे जाणार. क्युट, ग्लॅमरस ,सुंदर,अल्लड ,बाप डान्स  आणि एव्हढ्या सगळ्या गोष्टी असून अंगात भिनलेला अभिनय... काय अजब कॉम्बिनेशन... तेव्हा आवडलेली प्रिया एकदम जवळची मैत्रीण झाली ती अर्थातच नवा गडी नवं राज्य मध्ये! साधारण ४ वेळा वगैरे ते नाटक बघितलं. मस्तपैकी कॉलेजच्या कट्ट्यावर बसून तिच्याबरोबर 'कल्ला' करतोय कि काय असाच फील नाटक बघताना यायचा... कितीही वेळा बघितलं तरी समाधान होईना.. एकदा प्रयोग संपल्यावर भेटायला म्हणून मागे गेलो तर ही मुलगी प्रेक्षकांमधून तिला भेटायला आलेल्या आजींना वाकून नमस्कार करत होती.. विषय कट.. मनात भरून गेली राव ही! सेलिब्रिटी भाव खातात, माज करतात वगैरे वाक्यांना जोरदार फुली मारली होती प्रियानी! इतके दिवस ती फक्त आवडायची आता आपण तिला फुल्ल रिस्पेकट द्यायला लागलो होतो! काकस्पर्श,टाइम प्लिज, वजनदार वगैरेमध्ये ती भेटून गेलीच पण निवडक कलाकृतीच करायच्या ह्या तिच्या सवयीचा लै त्रास होतो बाबा...तिची वर्षानुवर्षे वाट बघावी लागते... आणि त्यामुळेच हिची साधी जाहिरात जरी टीव्ही वर लागली तर सगळं सोडून मी ते पूर्ण ३० सेकंद टीव्हीत गुंग होऊन जातो...  समोर असलेलं जेवण, बायकोनी सांगितलेलं काम हे सगळं आपण तेव्हा विसरून जातो.. शेवटी हा रिश्ताच एवढा पक्का आहे काय करणार! एवढं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात दाखवलं असतं  तर तुमचा पोरगा डॉक्टरवगैरे झाला असता असे डायलॉगसुद्धा आमच्या घरात ऐकू येतात!  
महाराष्ट्रा मधल्या कित्येक कपल्स मध्ये एक क्रॉस कनेक्शन बघायला मिळतं असं मला वाटतं.. ते म्हणजेच नवरे प्रियासाठी  वेडे आणि बायका उमेशच्या फॅन्स.. आमच्या घरात पण तसंच आहे!त्यामुळेच मला माहितीये , बायको किती ही राग दाखवायचा प्रयत्न करत असली तरी तिची देखील प्रिया तेवढीच लाडकी आहे...
मागच्या वर्षी आलेला वजनदार तर तिनी मला बघूनच केला कि काय असं वाटलं... गुबगुबीत माणूस सुद्धा  किती गोड आणि क्युट असतो हेच तिनी दाखवलं आणि माझ्यासारख्यांच्या बाजूनी कोणीतरी उभं राहिलं असंच वाटलं.. पण हीच प्रिया तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून फिटनेस अवेअरनेस करत असते... आय एम शुअर कि ते बघून माझ्यासारखेच अनेक जण व्यायामाकडे वळत असणार! मैत्रीण असावी तर अशी!

तर अशा ह्या दोघी.. मुळातच भिन्न प्रवृत्तीच्या ह्या आता स्क्रिनवर पण भिन्न भूमिकेत. एक भन्नाट जुगलबंदी बघायला मिळेल असं एकूणच वाटतंय... म्हणजे पूर्वी स्टीव्ह वॉ आणि अँब्रोज ...किंवा स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेसची  मॅच सुरु असताना प्रेक्षक गुंग होऊन जायचे ... हा गेम असाच सुरु राहावा, संपूच नये  असं काहीसं प्रेक्षकांचं व्हायचं. इतका क्वालिटी - उच्च दर्जाचा खेळ बघायला मिळायचा की तो संपून जाऊच नये असं वाटायचं ... असंच काहीसं इंडस्ट्री मधल्या टॉप अशा ह्या 'दोघी' बघताना प्रेक्षकांचं होईल असं मला फार वाटतंय... दोघींचा स्क्रीन प्रेसेन्सच इतका जब्राट असेल कि ते बघतच राहावंसं वाटेल... संपूच नये असं वाटेल , पुन्हा पुन्हा बघावंसं वाटेल पण त्यासाठी अजून ४ महिने वाट बघायला लागणार... प्रतिमा जोशी ह्यांचं हे पाहिलंच दिग्दर्शन...  बर्वे आणि बापट अशा पॉवरफुल शस्त्र घेऊन पहिल्याच बॉलवर सिक्सर मारतील हीच प्रार्थना!

अशा ह्या दोघी... एकतर्फी का होईना पण माझ्या मैत्रिणीच त्या... नेहमीच भेटून निखळ आनंद देणाऱ्या ,रडवणाऱ्या,हसवणाऱ्या, खूप गप्पा मारणाऱ्या अशा ह्या दोघी... आता पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन वर दिसणार आहेत ... 23 फेब्रुवारीला बायकोबरोबर जाणार आपण ..चक्क मैत्रिणींना भेटायला! एक विशेष वॅलेंटाईन्स वीक (थोडासा लेट पण ग्रेट)असणार ए हा!  -
स्वागत पाटणकर 





       

Sunday, October 15, 2017

साखरेपेक्षा जास्त गोड़ ...अशी ही साखर खाल्लेली माणसं!!

साधारण ९४-९५ ची गोष्ट असेल... संगीतकार राहुल रानडेचे सासरे श्री गानू आणि आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो... एकदा असंच तो मोहन गोखलेना घेऊन त्यांच्याकडे आला होता. आमच्या मोठ्या बंधूना ही खबर लगेच लागली आणि अख्ख्या बिल्डिंगभर  "योगी आलाय - योगी आलाय" करत ओरडत सुटला ... मी सुद्धा लगेच हातातल्या सगळ्या गोष्टी टाकून खाली गेलो...मिस्टर योगी कुठे दिसले नाहीत, मग डायरेक्ट गानूंच्या घरात आम्ही शिरलो... (हो हो तेव्हा असं शेजारांकडे वगैरे लोकं जायची)!  गानूंच्या घरात घुसल्यावर, आमच्या एवढाश्या चेहऱ्याचा एवढा मोठा 'आ' झाला पण तरी त्यातून काहीही शब्द बाहेर पडत नव्हते...नुसतेच बघत बसलो.... समोर उभे होते मिस्टर योगी ! एकदम मोहन गोखल्यांसारखे...  नाही नाही समोर उभे होते मोहन गोखले... डिट्टो मिस्टर योगी!! अवाक झालो होतो, टीव्ही वर बघून ज्यांचा फॅन झालोय असं कोणाला तरी आयुष्यात पहिल्यांदाच  प्रत्यक्षात बघत होतो... गोखले माझ्या वडलांच्या वयाचे असतील तेव्हा पण कसले यंग आणि डॅशिंग दिसत होते ..त्यांचे ते चकाकदार डोळे माझ्याकडे फिरवून म्हणाले - काय रे, पकडू का तुला?? हाहा !! २ मिनटात भारी सुद्धा वाटलं आणि फाटलीसुद्धा! त्यांना लक्षात आलं ते ...लगेच केसांवरून हात फिरवून  एक मस्त स्माईल दिली मला आणि मग त्यांनी मोठ्या माणसांशी गप्पा सुरु ठेवल्या. काय काय कडक वाटत होतं त्या गप्पा ऐकायला.. कळत काहीच नव्हतं , पण ऐकायला भारी वाटत होत... स्पष्ट  उच्चार आणि एखाद्याने आजारी आईची काळजी घ्यावी अगदीच तशाच काळजीने, जबाब्दारीनी प्रत्येक शब्द उच्चारला जात होता! मुग्ध होणे म्हणजे काय ह्याच्या अनुभव १० मिनिटाच्या त्या भेटीत गोखले सरानी दिला! मिस्टर योगी, माफीचा साक्षीदार अशांमुळे मी त्यांचा फॅन होतोच, पण १० मिनिटाच्या भेटीमुळे अजून जास्त फॅन झालो....

तसंच अगदी त्यांची बायको, शुभांगी गोखलेंबद्दल....डेली सोप्स किंवा बाकीच्या सुद्धा मालिका बघायला कधीच इंटरेस्ट नसायचा... पण जेवायच्या वेळेला आई त्या सासू सुनेच्या अति कंटाळवाण्या सिरियल्स लावून ठेवायची ....नकोसं व्हायचं तेव्हा पण त्याला एक अपवाद होता ... अशी एक सिरीयल जी आठवणीनी मी स्वतःहून लावायचो... श्रीयुत गंगाधर टिपरे....  आणि त्यातल्या शुभांगी गोखले- कमाल.... केवळ कमाल!!! आपल्या मराठी आया कशा असतात, कशा वागतात, कशी काळजी करतात, धावपळ करतात, कसा घरातल्या सगळ्यांनाचा सारखा विचार करतात , सगळ्यांचं ऐकतात कोणालाही न दुखावता .... ते एगझॅक्ट टीव्हीवर आणलं शुभांगी गोखले ह्यांनी ... गोड चेहरा, बोलण्याची एक विशिष्ट स्टाईल आणि स्क्रिन्वरचा फ्रेश वावर ह्यामुळे त्या मनाला पटून गेल्या होत्या ... अक्खी टीमच चांगली होती पण समहाऊ शुभांगीताईंच जरा जास्तच आवडल्या ..आणि त्यामुळेच त्यांचं 'हीच तर प्रेमाची गम्मत आहे' ह्या नाटकाचा पहिला प्रयोग काय मी सोडला नाही....ह्या बाईचं विनोदाचं टायमिग सुद्धा अफलातून आहे हे लाईव्ह अनुभवायला मिळालं... .. आणि आता अगदी आईबाबांच्या पावलावर पाऊल ठेवणारी सखी.. अतिशय सुंदर अशी फोटोग्राफर असलेली, दिल दोस्ती मधून अगदी घराघरात पोचलेली , लोकांच्या मनात बसलेली सखी म्हणजे  कमालीची ऑल राउंडर ... स्वतः एका नाटकाची निर्मिती करून , त्यात दिल दोस्ती पेक्षा वेगळा रोल करून ..मराठी माणूस रिस्क घेत नाही असा कोणी म्हणलं तर त्याला सखी च उदाहरण द्यायला काहीच हरकत नाही. तिला इंस्टाग्राम फेसबुक वगैरे वर फॉलो करतोच आहे.. आणि आता माझं लग्न वगैरे झालाय नाहीतर मुंबईपर्यंत सुद्धा फॉलो करायला मागे पुढं पाहिलं नसतं.. सखी, शुभांगी आणि मोहन अशी ही मराठी इंडस्ट्रीमधली एक परिपूर्ण , गुणवान फॅमिली सदैव क्वांटिटीपेक्षा क्वालिटी कडे बघणारी ... माझ्यासारख्या प्रेक्षकांसाठी ही फॅमिली मनात कायमच घर करून राहिलीये......

एकीकडे अशी एक फॅमिली जिचा मी वेड्यासारखा फॅन आहे ....आणि दुसरीकडे साक्षात दामले सर ... ज्यांच्यासाठी माझी अक्खी फॅमिली ही ऍक्च्युली वेडी आहे! 


प्रशांत दामले.. काय बोलायचं ह्या माणसाबद्दल....  ह्या माणसामुळे किती गोड क्षण आम्हाला आठवणींच्या कप्प्यात साठवता आले आहेत.
जनरली शाळकरी मुलांना थोडी अक्कल यायला लागली कि त्यांना शिंग फुटायला लागतात. आमच्या घरीपण तसंच होतं..आम्ही दोन भाऊ शिंग फुटलेले... त्यामुळेच हॉटेल, लग्न ,मुंजीवगैरे अशा कुठल्याही कौटुंबिक ठिकाणी आईबाबांबरोबर जायचं म्हणलं कि आमची तोंडं वाकडी व्हायची...वाट्टेल ती कारणं देऊन आम्ही त्यांच्याबरोबर जायचं टाळायचो. पण अशा ह्या आमच्या घरातल्या ४ लोकांना एकत्र कोणी आणत असेल तर ते म्हणजे फक्त प्रशांत दामलेच नाटक... त्यांच्या नाटकाच्या रिपीट ऑडियन्समध्ये आम्ही ४घे नेहमीच असायचो...   आय थिंक 'लेकुरे उदंड झाली' ह्या नाटकापासून आमची सुरुवात झाली होती, मी अगदीच ८-९ वर्षाचा असल्यामुळे मला नाटकाबद्दल फ़ारस काही आठवत नाही पण दामलेंचा तो हसरा चेहरा लक्षात राहिला....  आणि हा हसरा चेहरा आपल्या चेहऱ्यावर हास्य अनु शकतो ह्याचा अनुभव आला तो 'बे दुणे पाच' ह्या नाटकात! दामले आणि परचुरे अशी एक विशेष जोडी आणि त्यात दामल्यांची अनलिमिटेड एनर्जी... माझ्या अंदाजे साधारण १००च्या आसपास 'एन्ट्रीज' असतील त्यांच्या त्या नाटकात ... कसं काय लक्षात ठेवून ते सगळं मॅनेज करायचे देव जाणे! असो, सांगायचं मुद्दा असा कि तिथपासून सुरु झाली त्यांच्या नाटकाची वाट बघायला सुरवात... मग "गेला माधव कुणीकडे', 'एका लग्नाची गोष्ट', ' ४ दिवस प्रेमाचे'वगैरे नाटकांची पारायणं केली आम्ही चौघांनी एकत्र.... 

दामल्यांमुळेच खूप सोनेरी क्षण एक फॅमिली म्हणून आम्हाला एन्जॉय करता आले. तो  आईबाबांबरोबर एकत्रितपणे घालवलेला वेळ हा किती सुखकारक आणि महत्वाचा होता हे आता मला फॅमिलीपासून लांब राहून कळतंय! 

दामलेंची नाटकं म्हणजे कधी नाटक वाटलीच नाहीत.. हा माणूस स्टेजवर उभा राहून आपल्याशी गप्पा मारतोय कि काय असाच वाटायचं... आणि ते तसं प्रुव्ह पण करायचे त्यांचा प्रेझेन्स ऑफ माईंड दाखवून ... एका लग्नाची गोष्टचा प्रयोग सुरु होता.  प्रशांत सर बायकोवर भांडण होतं म्हणून १ -२ -३ आकडे म्हणत विंगेत निघून जातात असा सीन होता.. ते ६ म्हणून विंगेत जाणार तेवढ्यात माझा भाऊ प्रेक्षागृहातून जोरात ७ असं ओरडला... आमच्या पुढे बसलेली लोकं जरा चिडली.. पण दामले...त्यांचं असं नाही ..प्रेक्षक म्हणजे मित्रच त्यांचा... विंगेत घुसत घुसत ते थांबले... अतिशय मार्मिक अशी एक्सप्रेसशन्स देऊन प्रेक्षकांडे बघून क्षणाचाही विलंब "तुमच्याकडे पण हे असंच घडतं का" ही एडिशन टाकली... स्टेजवर असलेल्या कविता लाड सकट अक्खा प्रेक्षागृह तुफान हसत होतं .. नंतर मग आम्हाला हा इंटरऍक्टिव्ह प्रयोग करायचा छंदच लागला... असंच एकदा गेला माधव कोणीकडे नाटकात प्रशांत सर "हो -हो - हो" असं म्हणायची ऍक्टिंग करत असतात पण तोंडातून शब्द न फुटता नुसती हवा बाहेर येत असते ..तेव्हा आम्ही बाहेरून जोरात 'हो' ओरडलो होतो.... त्यांनी लगेच ... "कोणीतरी २-२ बायकावालं आलंय  वाटतं असं उत्तर दिलं.. त्यांच्या ह्या अचूक टायमिंगचा  डाय-हार्ट फॅन झालो होतो कि जिथे तिथे तशी नक्कल करायला जायचो... मी बऱ्याच वेळा गमतीत म्हणतो माझं अभिनयातील करियर सुरु व्हायच्या आधीच बंद होण्यामागे प्रशांत दामले हेच आहेत! कॉलेजमध्ये एका सस्पेन्स नाटकाची प्रॅक्टिस सुरु असताना मी एका लग्नाची गोष्टींमधल्या स्टाईलने काही काही डायलॉग्स म्हणले होते! माझे ते 'प्रयोग' बघून त्यानंतर आजपर्यत मला कधी कोणीही ऑनस्टेज बोलावलं नाही!

शु कुठं बोलायचं नाही , जादू 'तेरी नजर अशी नाटकं आणि आमच्यासारखे आम्हीच सारख्या सिरियल्स ने नेहमीच आपल्याला हसवत राहिले.... मायबोली चॅनल वर शु कुठं बोलायचं नाही जितका वेळा दाखवलं जायचं ते तितक्याच वेळा बघितलं जायचं.... आमच्यासारख्या आम्हीच सीरियलमध्ये तर दामले आणि विजय चव्हाण ह्यांना स्क्रिप्ट देतच नसावेत , फक्त सीन चा आढावा देऊन कॅमेरा सुरु करत असावेत असं वाटायचं. ह्या सगळ्या हास्यगोष्टी असताना आम्ही दोघे राजाराणी , सुंदर मी होणार वगैरे नाटकांमधून त्यांनी आपल्या डोळ्यात पाणी सुद्धा आणलय... कपिल देव सारखेच आलराउंडर हे! ह्याच ऑलराऊंडरनी एकाच दिवसात ५ प्रयोगांची टेस्ट मॅच खेळली! एका दिवसात पाच प्रयोग!!!! आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी बालगंधर्व निवडून आम्हा पुण्याच्या प्रेक्षकांचाच गौरव केला अशी भावना आमच्या मनात निर्माण झाली.. काय-काय नाही केलं त्या दिवशीची तिकिट्स मिळवण्यासाठी ... पहिला प्रयोग मिस झालाच पण शेवटी ज्या मित्राशी वाद आहेत त्याच्याकडे तिकिट्स आहेत समजल्यावर त्याला सॉरी वगैरे गोडगोड बोलून उरलेले ४ प्रयोग बघितले! अविस्मरणीय अनुभव होता तो ...विश्वविक्रमाचा साक्षीदार होता आलं!! त्यादिवशी त्यांनी गंधर्व चा प्रेक्षक हा खरा रसिक असतो, त्यांच्या रिअक्शन ह्या अभिनेत्याला शिकवून जातात वगैरे बोलल्यावर तर मी सगळ्यांना दामले माझं कौतुक करत होते वगैरे सांगत सुटलो होतो ... आई बाबानी कपाळावर हात मारून घेतला!     

बाप्पा आणि आमच्या कॉलेज च्या कृपेने त्यांना भेटायचा योग आला... सतरा अठरा वर्षांपूर्वी आमच्या बीएमसीसीच्या  ऍन्युअल फंक्शनला पाहुणे म्हणून प्रशांत दामलेंना बोलवायचं ठरलं आणि माझ्या ३-४ मित्रांबरोबर आम्ही सगळे भरत नाट्य मंदिरामध्ये गेलो.. प्रशांत सर मेक-अप रूम मध्ये बसले होते ....हिरवा रंगाचा कुर्ता आणि  लख्ख गोरापान चेहरा.... हे मेकअप रूम मध्ये केवळ जायचं म्हणून जात असतील असं तेव्हा वाटलं ... त्या फ्रेश चेहऱ्याला गरजच नाही हो मेकअप वगैरेची...  आम्हाला मेक अप  रूम बाहेर बघून लगेच आत बोलावलं , टेन्शनमय आमचे चेहरे बघून आमच्या पोटातला गोळा त्यांनी ओळखलाच  ..लगेच स्वतःच वय कमी करून एकदम कॉलेज मित्रासारखं बोलायला लागले.... फंक्शनची तारीख विचारली,  डायरी काढली आणि लगेच 'मी येतो, अव्हेलेबल आहे' सांगून टाकलं ...उगाच आढेवेढे नाहीत, नंतर सांगतो वगैरे फालतुगिरी नाही ... ते लगेच हो म्हणल्यावर त्यांना घेऊन यायची जबाबदारी घेण्यावरून आम्ही सगळे त्यांच्यासमोरच प्रेमळ संवाद घालायला लागलो... हो ना , प्रशांत दामले ना आपल्या गाडीतून कॉलेजमध्ये आणायचं म्हणजे फुल्ल हवा होणार हे माहित होतं ... पण दामले सर ते..त्यांना अशी आणणं सोडणं वगैरे स्पेशल ट्रीटमेंट नको होती..."मी माझा माझा येतो, त्या दिवशी वेळेवर पोचतो..." एवढंच सांगून माणूस मोठा झालाय तरी पाय जमिनीवर कसे ठेवावेत ह्याचाच उदाहरण दाखवलं.  

पुण्यात, आम्हा पुरुषोत्तम करंडक वाल्यांसाठी भरत नाट्य मंदिर म्हणजे खरोकरचंच एक मंदिर ...आणि त्यामुळेच एखाद्या वारकऱ्याला पंढरपूरमध्ये विठोबाचं दर्शन गेहटल्यावर जसा आनंद होईल , अगदी सेम तसंच मला भरत मध्ये प्रशांतसरांना भेटून झालं!!

आणि आता इतक्या वर्षांनी .. एक दिवस अचानक कोलोरॅडो मराठी मंडळानी दिवाळीमध्ये "साखर खाल्लेला माणूस" चा  डेनवरमध्ये प्रयोग होणार हे लास्ट वीक अनाऊन्स केलं... आणि शुभांगी गोखले जिच्या अख्ख्या फॅमिलीचा मी वेड्यासारखा फॅन आहे आणि दुसरीकडे प्रशांत दामलेंसारखा अवलिया ज्यांच्यासाठी माझी अक्खी फॅमिली ही ऍक्च्युली वेडी आहे अशा दोघांना प्रत्यक्ष बघायला मिळणार ह्या सध्या विचारानीच मला दिवाळी लै हॅपी होणार ह्याची प्रचिती आली....आणि लेखणीतून सगळी एकसाइटमेन्ट लिहून काढली... 

आमच्यासारख्या पुणेकरांना कोथरूडवरून आलेले बेसन लाडू आणि चितळ्यांची आंबा बर्फी खाल्ल्याशिवाय कुठलाही सण सेलिब्रेट होत नाही पण ह्यावर्षी ती चिंता नाही .. ही दिवाळी ह्या गोड सेलिब्रिटींनी आणलेल्या साखरेनी अजून गोड होणार हे मात्र नक्की!! 

Saturday, September 30, 2017

कासव बघा. कासव व्हा - ट्रेलर रिव्ह्यू

कासव बघा. कासव व्हा.

खरं तर नॅशनल अवॉर्ड - सुवर्ण कमळ विजेत्या चित्रपटाचा ट्रेलर-रिव्यू वगैरे लिहिणं म्हणजे पीएचडी मिळालेला मुलगा "हा खूप हुशार आहे हां" वगैरे लोकांना सांगणं.... पण काय करू, आज सकाळपासून ते अतिशय सुंदर असं ट्रेलर बघितल्यावर काहीतरी लिहायला हात फारच शिवशिवत होते, खूप लोकांना ट्रेलर लिंक पाठवली पण समाधान होतं नव्हतं शेवटी लिहायचं ठरवलंच...३ मिनिटांचं ट्रेलर ...सिनेमाचं नाव कासव.... पण अजिबात वेळ न दडवता, चित्त्याच्या वेगात ते मनात घुसलं आणि खोलवर रुजलं... 
 देवगडच्या रम्य समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळेस पाण्याच्या दिशेनी जाणारी २ कासवं ... त्यांच्यावर आदळणारी लाट आणि दुसऱ्याच सीनमध्ये सकाळच्या साडेसहाच्या स्वप्नात आलेल्या लाटेच्या आवाजांनी दचकून उठणाऱ्या इरावती हर्षे....! वाह! अक्षरशः तीन सेकंदाच्या ह्या २ सीन्समध्ये हे ट्रेलर आपल्या मनावर गारुड करतं... समोर काहीतरी उच्च दर्जाचं सुरु आहे ह्याची प्रचिती देतं...आणि आपण त्या कासवांमध्ये गुंतून जातो...

सुमित्राताई भावे आणि सुनील सुकथनकर ... ह्या दिग्गज दिग्दर्शक जोडगोळीचा हा सिनेमा... आणि ट्रेलरमधल्या प्रत्यके फ्रेममध्ये ते वेगळेपण- तो ग्रेटनेस जाणवत राहतो. अस्तूनंतर पुन्हा एकदा ह्या दोघांचा चित्रपट बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच. 'इरावतीच्या खोलीत ठेवलेली २ मूर्तीरुपी कासवं ', 'आलोक किनाऱ्यावर चालत असताना मागे फिरणाऱ्या पवनचक्क्या' अशा फ्रेम्समधून ही दिग्दर्शक जोडी का दिग्गज आहे ह्याचा प्रत्यय आपल्याला येतो! प्रत्येक गोष्टीचा डिटेल अभ्यास करणाऱ्या सुमित्रा ताईंनी लिहिलेली ही कथा, अक्षरशः ३ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये मनाची पकड घेते... पॅनिक, डिप्रेशनसारख्या मानसिक 'आजारातुन' जात असलेल्या एखाद्याला अशा स्थितीतून बाहेर काढण्यासाठी दगड बनून प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून मदत करण्यापेक्षा, त्या माणसाला आधी नीट समजून घायची गरज असते... सामान्य माणसाला हे मानसिक विकार पटकन समजत नाही...पण बाहेरहून सुखासुखी दिसणाऱ्या गोष्टींना आतून तडा गेलेला असू शकतो.... त्यामुळे त्यात डोकावून बघायची गरज असते...ओल्या मनानी! कुठल्यातरी मानसिक गुंत्यामध्ये त्रस्त झालेला अलोक राजवाडे..आणि असाच काहीशा आजार पूर्वी अनुभवलेल्या इरावती हर्षे अशा दोन कासवांची गोष्ट म्हणजे हा सिनेमा.... असं म्हणतात -'Try to be like a turtle - at ease in your own shell' तुम्ही जसे आहात ...तसंच रहा ..त्याच स्वतः वर प्रेम करा . जाणूनबुजून पर्सनॅलिटी बदलायचा प्रयत्न करू नका... कासवाकडून शिका.... कदाचित ह्या सिनेमातून तेच सांगायचं असेल असा काहीसा अंदाज आपल्याला ट्रेलरमधून येतो..... 


    संपूर्ण ट्रेलरच खरं तर जबरदस्त आहे पण त्यातसुद्धा सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ह्यातले डायलॉग्स!!! मानसिक आजार, सायकॉलॉजिकल इश्यूवर कलाकृती करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यातले संवाद हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचवायला सर्वात महत्वाचे असतात. शब्द निवड ही चोख असावी लागते. नाहीतर चित्रपट खूप जड किंवा बालिश होण्याचा धोका असतो. पण सवांद लिहीणाऱ्या सुमित्रा ताईच त्या... सगळ्यांच्या गुरूच ...त्यांनी अत्यंत चपखल शब्द वापरून संवाद लिहिलेले आहेत . सामान्य प्रेक्षकाला समजतील... गोष्टीचं गांभीर्य कमी न होता आणि तरीसुद्धा मानसिक आजारसारखा नाजूक विषय लोकांच्या मनात अलगदपाने उतरेल ह्याची खात्री घेणारे असे संवाद.
   "सुखासुखी एकांत वाटतं?" "सुखाच्या व्याख्या वेगळ्या असतात ना", "मला मी आवडत नाही" "कुटुंबा हवंच  आधाराला ..पण मनाच्या नात्यांचं" असे एकसे एक डायलॉग्स ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात... आणि त्यात क्युट सरप्राईज देऊन जातो तो छोट्या ओंकारच्या तोंडून असलेला कोकणी भाषेतला चहा भजी वरचा डायलॉग... हे संवाद गोष्ट फार सोप्पी करून आपल्याला सांगतात आणि त्या व्यतिरिक्त "शेकडो कॉन्टॅक्ट आहेत एका बोटाच्या वर पण तरी एकटं वाटतं " अशा सवांदातून हा प्रॉब्लेम आजचा आहे हे सुद्धा दर्शवतं....अगदी सामान्य प्रेक्षक रिलेट करू शकेल अशा भाषेत! त्याबद्दल सुमित्रा ताईंना खरंच एक साष्टांग नमस्कार करावासा वाटतो....



आता बोलू कलाकारांबद्दल ...अभिनयातली देव माणसं सगळी ! काय बोलणार त्यांच्याबद्दल.... नवशिक्या अभिनेत्यांनी खरंतर हे असे चित्रपट अभ्यास म्हणून बघावेत.... काय टीम निवडलीये सुमित्राताई आणि सुनील सरानी!! शेन वॉर्नची ओव्हर कशी लेग स्पिन,गुगली असे ६ विविध पण ताकदवान शस्त्रांनी भरलेली असते ....एक्साक्टली तसंच आहे कासवमध्ये! मोहन सर , इरावती , देविका , किशोर सर ,छोटा ओंकार आणि आलोक! प्रत्येकाची स्टाईल वेगळीपण तेवढीच ताकदवान! 
इरावती हर्षे!!! नेहमी दर्शन देत नाहीत त्या पण जेव्हा स्क्रीनवर असतात त्यांचा प्रेझेन्स खूप प्रसन्न करणारा वाटतो ...वाक्य बोलताना विशिष्ट शब्दावर जोर द्यायची स्टाईल, त्यांचा तो भरीव आवाज नाजूक विषयाला फारच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो...आलोकचा गुंता सोडवाताना होणारी त्यांची घालमेल ही त्यांनी बरोबर दाखवली आहे. किशोर सर म्हणजे मानसिक आजाराकडे कोरड्या नजरेनी बघणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे ...त्याच्या स्पेशल स्टाईलनी त्यांची बाजू मांडतात आणि आलोक...तो तर आपला एकदम फेव्हरेट... मराठी शब्दांचे उच्चार कोणाकडून शिकावे तर ते आलोककडून ह्या ठाम मताचा मी आहे... त्याच्या रिऍक्शन्स सुद्धा खूप बोलक्या असतात ...उदाहरण द्यायचं झालं तर ओंकारकडून चहा भजी ची गोष्ट ऐकल्यावर ...आलोकनी दिलेली रिअक्शन निशःब्दपणे बरंच काही बोलून जाते...आणि तो आता ह्या गुंत्यातून कसा बाहेर येणार ह्याची उत्सुकता वाढवते! 

ह्या सर्व गोष्टींमुळेच कधी एकदा हे कासव बघतोय असं झालाय...फार महत्वाचा सिनेमा असणार आहे हा... 


नेहमीचा मसाला, धांगडधिंगा ह्या व्यतिरिक्त कासवसारख्या नाजूक विषयांवरच्या उत्तम कलाकृती निघणं हे समाजाच्या सुधृढ प्रकृतीसाठी फार गरजेचं आहे ...त्यामुळेच कासव फक्त भारतात नाही तर जगभरात प्रदर्शित व्हावा , खूप लोकांनी तो बघावा .... हीच इच्छा!!!                                                                                        
--स्वागत पाटणकर 

Friday, September 29, 2017

रामरक्षा आली धावून!

रामरक्षा आली धावून!

-- स्वागत पाटणकर 

  मागच्या आठवड्यात असंच मस्त जॉगिंगला गेलो होतो (हो हो मी आणि जॉगिंग)... पण आमच्या शरीरातल्या फॅट्स मोठे नशीबवान... पळायला लागल्या लागल्या १० मिनटात मोबाईलवर 'स्टॉर्म वॉर्निंग' आली... आणि  आकाशाकडे नजर टाकली, निळ्या आकाशावर काळ्याकुट्ट ढगांनी पांघरून घातलं होतं. डेन्वरची हवा म्हणजे फारच रोहित शर्माच्या बॅटिंग सारखी असते ... कधी लक्ख ऊन आणि दुसऱ्या क्षणाला धो धो पाऊस... त्यामुळे अचानक आलेल्या स्टॉर्म वॉर्निंगला मी सीरिअसली घेतलं, गाडी सुरु केली  आणि घरी जायला निघालो.. मस्त पावसाळी हवा होती... रहमानची गाणी लावून निघालो! वाह, सुख एकदम! पावसाची भुरभुर सुरु झाली होती ..काच खाली करून ..हात मस्त बाहेर काढलेला होता ... पावसाच्या संथ थेम्बाना मिठी मारायला एकदम तयार असा ..पण काही क्षणातच पावसानी रूप बदलायला सुरवात केली... भुरभुर, संततधार ,मुसळधार वगैरे टप्पे फॉलो न करता डायरेक्ट धो धो कोसळायला लागला .. जोरात.. सगळ्यात मॅक्सिमम स्पीड वर असलेले वायपर्स आणि तेवढ्याच जोरात कोसळणाऱ्या सरी ह्यांच्यात एक स्पर्धाच सुरु झाली. गाण्याचा आवाज वाढवला पण कोसळत्या मेघराजानी माझी आणि निसर्गाची डेट 'पॉज' केली होती... ती सुंदर गाणी ऐकावीशी वाटत नव्हती... खरं तर २०-२५ मिनीटावरच घर होतं पण तरी ते अंतर खूप मोठं वाटायला लागलं होतं.. जोरात कोसळणाऱ्या सरींनी आता वायपर्सवर आघाडी घेतली होती त्यामुळे समोरचं अगदीच दिसेनासं झालं होतं...ह्या अमेरिकेत रस्त्यात कुठेही थांबता येत नाई राव, त्यामुळे हळू हळू का होईना पण पुढे सरकत होतो....दिवाळीत पण घरी कमी पणत्या असतील,तेवढे गाडीतले पुढचे,मागचे, पार्किंग लाईट असे सगळ्या प्रकारचे दिवे लावून गाडी पुढे रेटत  होतो. पाऊस! रोमॅंटिक वाटणाऱ्या पावसाने क्षणात भयभयीत करून टाकलं होतं...



गाडीच्या टपावर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज मला कसली तरी आठवण करून देत होता ...खरं तर एवढ्या पावसात गाडी कधीच चालवली नव्हती ... पण अशा पावसातला प्रवासाचा अनुभव होता! ७-८ वर्षांपूर्वी भाऊ,वाहिनी,आई,बाबा आणि मी अशी एक (चक्क) कौटुंबिक कोकण सहलवगैरे आम्ही केली होती... पण ऑक्टोबर असूनसुद्धा कोकणात फारच विचित्र हवा पडली होती...अतिशय ढगाळ अशी... आणि  पण ढग सुद्धा रुसलेले  असावेत ... अजिबात पाऊस नव्हता ... दमट हवेनी वाऱ्याला यायला पूर्ण मज्जाव केला होता. पंखा लावूनसुद्धा उकडत होतं आणि दोन पावल चालून लगेच घामाच्या धारा वाहत होत्या... एकूणच सगळ्यांचा मूड बघता साधारण ३ वाजता आम्ही पुण्याला परत जायचं ठरवलं... 'बोअर' होऊन सगळे परत निघाले ... भाऊ गाडी चालवत होता. शिवाय गाडीत आई बाबा असल्यामुळे नव्या गाण्यांना गाडीत फारशी संधी नव्हती .. मग अशा वेळेस आपला एक छंद म्हणजे मस्तपैकी मागच्या खिडकीत बसून बाहेर पळणाऱ्या झाडांकडे बघत राहायचं...नारळाच्या उंच झाडांकडे बघत बघत मी बसलो होतो!  १-२ तास पुढे गेल्यावर पाऊस लागला..कोकणातला पाऊस तो ...डायरेक्ट कोसळतच होता...  पुण्याला न जात कुठेतरी थांबावं कि काय असं सगळ्यांना वाटलं.. थोडी विचारपूस केल्यावर कळलं ताम्हिणी घाटात पाऊस नाहीये...त्यामुळे थोडं पुढे गेल्यावर पाऊस थांबेल अशी अपेक्षा ठेऊन पुण्याला जायला निघालो.

पण जसं जसं आम्ही ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली....तर रियालिटी दिसायला लागली .. खरं तर अंधार पडल्यामुळे दिसत नव्हतीच... पण समजत होती. कधीही न बघितलेला असा तो पाऊस ऐकू येत होता ... त्यात तो ताम्हिणी घाट... घनदाट जंगल , विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट ...आणि ह्याशिवाय घाटातली स्मशान शांतता भंग करणारा तो कोसळता पाऊस...रस्त्यावर फक्त आमचीच गाडी! आई बाबांची  थोडी टरकली होती पण मी एन्जॉय करत होतो. थ्रिलिंग वगैरे वाटत होतं..सगळे जणं पुढे जावं कि नको अशी फक्त चर्चा करत होते ...गाडी पुढे पुढे जातंच होती, एकटी!  काही वेळानंतर मात्र समोर एक गाडी दिसली... थांबलेली होती... पुढे गेल्यावर कळलं कि तो ट्रक होता... एक माणूस आम्हाला पण थांबायचे इशारे करत होता. पावसामुळे त्याचा चेहरा काही दिसत नव्हता. अशा रात्रीच्या वेळेस , त्या घाटात ,निर्मनुष्य रस्त्यावर , भर पावसात .. कोणीतरी थांब म्हणतंय म्हणून थांबायलाही जीवावर येतं... आता माझी पण फाटायला लागली होती! पण फायनली आम्ही, बघू तर काय म्हणतोय तो, आपण पाच जण आहोत , काही नाही होणार वगैरे म्हणत एकमेकांना धीर देत थांबलो. त्यानी आम्हाला हेडलाईट सुरु ठेवून थांबायला सांगितलं... त्याचा पार्टनर एक मोठी काठी घेऊन पुढे चालत गेला... त्यांचा अनुभव त्याना असं करायला भाग पडत होता.. तो थांबलेला ती जागा म्हणजे एका पुलाची सुरवात होती .... काठी आपटत आपटत नेल्यामुळे ...त्याला पाण्याची खोली समजली.. गुडघा भर पाणी वाहत होतं त्या छोट्या पुलावरून! त्यांनी आम्हाला उलटं फिरायचा सल्ला दिला... आम्हीपण लगेच ते ऐकलं ...ज्याच्यावर संशय घेतला होता तोच देवासारखा मदतीला आला होता..

आम्ही यू टर्न घेतला....रात्रीचे ८ वगैरे वाजले असतील...अर्धा चढलेला घाट उतरून मग पनवेल मार्गे पुण्याला जावं लागणार होतं...म्हणजे अजून ५ तासाचा प्रवास! त्यात ह्या पावसाचा जोर काही कमी होत नव्हता ... रात्र गडद होत चालली होती... वीजा तर भिशी असल्यासारख्या एकत्र येऊन कडाडत होत्या . ताम्हिणीसारख्या घाटात तर रात्री विजा चमकल्या तर त्यापेक्षा हॉरर काहीही नसतं हि नवी माहिती मला कळली....अर्थातच माझी फाटली होती ! आता कधी एकदा मुंबई गोवा हायवे लागतो असं झालं होतं ...तिकडचं ट्रॅफिक जॅम चालेल पण हा भयभयीत करणारा एकाकीपणा नकोसा झाला होता... गाडीतली ५ माणसं मौनावस्थेत गेली होती ..सगळे फक्त काळजी करत होते ... बाहेरच्या शांततेबरोबर गाडीतली शांतता जास्त त्रासदायक होत होती...

अचानक आई गाणं म्हणायला लागली... अर्रे संस्कृत गाणं?? नाही... ती तर रामरक्षा म्हणत होती... खरं तर मी पण घाबरलोच होतो पण आईचं असं स्तोत्र वगैरे ऐकून मला हसू येत होतं.. तिला लक्षात आलं ते , पण तिनं जाणूनबुजून दुर्लक्ष केलं.. ती स्तोत्र म्हणतच राहिली.. आता बाहेरच्या पावसाची सवय झाली होती.. आईची रामरक्षा म्हणून संपली होती, मी गाणी लावणार तेवढ्यात आईनी पुन्हा सुरु केलं .. रामरक्षा राउंड २,३,४..एका मागे एक  सुरूच राहिला ... तिला आता माझी वाहिनी पण जॉईन झाली होती... मी मात्र कपाळावर हात ठेवून घेतला होता .. बाहेर त्याच वीजा , तोच पाऊस , तेच ढग तेवढाच गोंधळ घालत होते पण गाडीतले काळजीचे विचार आता लांब गेले होते, थोडा धीर वाटत होता ... पण माझ्या तरुण मनाला ते लक्षात येत नव्हतं! मग मी डोळे मिटून शांत बसलो ... आई आणि वाहिनीच्या रामरक्षेसमोर मला आता पाऊस ऐकू येत नव्हता...

राम रामेति रामेति,
रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं,
रामनाम वरानने ॥

हे शब्द कानात पडत होते,सकारात्मक लहरी मनात घुसवत होते .. पण आपण काही देवबीव मनात नाही त्यामुळे "हे ऐकायला छान वाटतंय , म्हणत रहा" एवढं सांगायलासुद्धा कमीपणा वाटला! गाडीतल्या त्या बदलेल्या वातावरणाची भावाला गाडी चालवताना मात्र खूप मदत झाली असावी ...सलग ४ तास तो गाडी चालवत होता आम्ही पेण मार्गे खंडाळा घाट ओलांडेपर्यंत पाऊस आमच्याबरोबरच होता.. लोणावळ्याला आम्ही थांबलो .. तिथे पाऊस होताच पण गाडीत १०० वेळा म्हणाल्या गेलेल्या रामरक्षे नी धीर दिला होता कदाचित त्यामुळेच तो पाऊस आता ओळखीचा वाटायला लागला होता . वडा पाव घेऊन आणि गाडी पुन्हा सुरु केली... गाणी न लावता, आईला इशारा केला ..तुझं सुरु ठेव.. आई एक स्मित हास्य देऊन पुन्हा 'अथ ध्यानम्‌' म्हणायला सुरु केलं... ते साधारण तासभरानी रात्री १ च्या सुमारास घरी पोचल्यावर थांबलं... डेंजर असा अनुभव घेऊन घरी पोचल्यावर मी जय श्रीराम बोललो...पण मनातल्या मनात!

          काल अशाच पावसात गाडी चालवताना , वायपर्स आणि पावसाच्या स्पर्धेमुळे धूसर झालेल्या काचेतून बघताना ती आक्खी कोकण ट्रिप स्पष्ट दिसत होती...हातावर शहारे आलं होतं..नकळत मोबाईल घेतला आणि युट्युबवर रामरक्षा सर्च केलं. आपल्याच अनुराधा पौडवालचे रामरक्षा विडिओ सापडले... तडीक प्ले केले! रहमानला म्हणलं आज जरा तू पण ऐक हे.... रामरक्षा सुरु झाली, अनुराधाच्या स्वरात...एकटेपणा गेल्याचा फील आला..मस्त वाटायला लागलं...काही जादू-टोणा वगैरे नाही ..आस्तिक असो व नास्तिक पण ते संस्कृत शब्द ,ते स्वर आणि ते शांत संगीत ह्याचा उत्तम परिणाम झाला हे नक्की ... ते कॉम्बिनेशनच छान  होतं.. प्रसन्न वाटायला लागलं .. समोर फिरणारे ते वायपर्स सुद्धा रामरक्षेच्या तालावर फिरल्याचा भास झाला...पाऊस त्याच आवेशात असूनसुद्धा, उरलेला तो २०-२५ मिनिटाचा छोटा प्रवास मी मस्त एन्जॉय करत पूर्ण केला.... रामरक्षा 'लूप' वर लावून!! घरी पोचल्यावर जोरात बोललो .... जय श्रीराम!!!

दरवर्षी, 'मन से रावन जो निकाले , राम उसके मनमें है' अशी टिपिकल लाईन पोस्ट करून  दसरा 'सेलिब्रेट' करण्यापेक्षा, ह्या वर्षी ही रामरक्षेची गोष्ट आपल्या सोबत शेअर करावीशी वाटली म्हणून एवढा सगळा प्रपंच!

आपलं वय जसं जसं वाढत असतं, अनेक आजूबाजूच्या गोष्टींचे कळत - नकळत आपल्यावर संस्कार होत असतात..रामरक्षेसारखी स्तोत्रं हा त्यातलाच एक प्रकार... आजी- आईनी आपल्याला शिकवलेल्या काही गोष्टी, तेव्हा आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी त्या मनात खोलवर रुतलेल्या असतात ... आपण मात्र सदैव 'कूल', 'सो कॉल्ड प्रॅक्टिकल' व्हायच्या प्रयत्नात त्या शिकवणींना बाजूला सारतो.... तुम्ही देवाला मानत असाल वा नसाल,  तुम्हाला स्तोत्र पाठ असतील वा नसतील.. जेव्हा जेव्हा आपण ती ऐकू , ती नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जातात...मी हे अनुभवलं ...आज तुम्हीसुद्धा आपट्याची पान वगैरे वाटण्यापेक्षा रामरक्षा ऐकून, मनात लपलेल्या रावणाला मारून  विजयादशमी च्या वेगळ्या सेलिब्रेशनचा अनुभव घेऊन तर बघा.......

-- स्वागत पाटणकर 

Saturday, September 23, 2017

फास्टर फेणे - डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ .....

फास्टर फेणे - डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ .......

फास्टर फेणेचं  काल आलेलं साधारण ९० सेकंदाच टिझर पाहिलं!!! ९० सेकंदात शाळेतले दिवस आठवायला भाग पाडणारं टिझर ! फास्टर फेणे - शालेय जीवनात मराठी मुलांना वाचनाची गोडी लावणारा, वाचनाची गोडी लागल्यावर कधी एकदा फेणेचा पुढचा भाग येतोय असं वाटायला लावणारा अवलिया  ...  भागवत सरांच्या कमालीच्या नजरेतून , ताकदवान शब्दांमधून तयार झालेला फेणे....

साधारण २५ वर्षांपूर्वी दूरदर्शननी फेणेवर सिरीयल केली होती पण त्यानंतर इंडस्ट्रीकडून फेणेकडे 'दुर्लक्ष' कसं काय झालं ह्याचंच आश्चर्य वाटतं... दुर्लक्ष नसावं ..पण कधी कधी आपल्याच मातीत वाढलेल्या गोष्टींवर , आपल्या घरातल्यांवरच आपला जास्त विश्वास नसतो, बऱ्याचदा आपल्याच 'व्यक्तिरेखांना' अंडरएस्टीमेट केलं जातं आणि त्यामुळेच त्यांच्यावर काही मोठी कलाकृती बनवायची 'रिस्क' वाटते मग अर्थातच आपण बाहेरच्या कॅरॅक्टर्सवर जीव लावून बसतो... पण ह्या ट्रॅडिशनल अँप्रोचला धुडकाडून लावून , आपल्या घरातल्या , मराठी मातीतल्या फेणेला मोठ्या पडद्यावर आणल्याबद्दल लेखक क्षितिज पटवर्धनचे अभिनंदन करायला हवं! ह्या विषयावर सिनेमा होऊ शकतो , लोकांना आवडू शकतो हा विश्वासच  मनात ठेवून त्यांनी हा सिनेमा लिहिला असणार . भागवत सरांच्या लेखनाला, त्यांच्या स्टाईलला धक्का ना लावता त्याच दर्जाचं लेखन करायचं म्हणजेअवघड चॅलेंजच... पण पटवर्धनांचा बायोडाटा बघता त्यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं असेल अशी खात्री वाटते... फेणेचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि पटवर्धन म्हणजे इंडस्ट्रीमधले एकदम गुणी क्लासमेट्सची जोडी...टिझर बघताना, सचिन - द्रविडसारखीच ह्यांची पार्टनरशिप शतकी असेल असं कुठेतरी वाटून जातं! ह्या दोघांच्या चतुराईचं उदाहरण म्हणजे 'टॉक्क'... मला आठवतंय, शालेय जीवनात जेव्हा हे 'टॉक' करायला शिकलो तेव्हापासून कोणालाही हाक मारायची गरज लागली नाही... नुसत्या 'टॉक्क'वर मित्रांना बोलावलं जायचं... आता ते फेणेकडून बघताना जाम धमाल येतीये.. दिग्दर्शकाला सलाम आहे!

पुस्तकातला फेणे , स्क्रिप्ट रूपात आल्यावर पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे कास्टिंग. मला स्वतःला वाटतं, ह्या अवघड  प्रोजेक्टमध्ये जी काही थोडी सोप्पी गोष्ट असेल ती म्हणजे फेणेचं कास्टिंग... ज्यांनी ज्यांनी फेणे वाचलेलं आहे त्यांना जर विचारलं तर ९९ टक्के लोकं एका सेकंदात 'अमेय वाघ' हे उत्तर देतील... अमेय अगदी तंतोतंत शोभतोय फेणेच्या रूपात ... त्याची हेअर स्टाईल, कपडे, उड्या, त्याची सायकल वगैरे अगदी पुस्तक वाचताना डोळ्यासमोर यायचं, तसंच सेम टू सेम पडद्यावर आलंय ..अमेय म्हणजेच फेणे हे शिक्कामोर्तब झालंय , एफ बी - युट्यूब वरती लोकांच्या कमेंट्स वाचल्यावर अगदीच ते लक्षात येतं ! 
अमेयला हा रोल सोप्पा नसावा... काही वर्षांपूर्वी आलेल्या सीरियलमध्ये सुमित राघवानसारख्या तगड्या कलाकाराने फेणे रंगवला होता. ज्यांनी ज्यांनी ती सिरीयल बघितली असेल त्यांच्या मनात फेणे म्हणजे राघवन हे फिट बसलं असणार... आय होप अमेयचा फेणेपण त्याच ताकदीने अवतरेल...आणि लोकांना आवडून जाईल. बाकी कास्टिंगबद्दल अजून गुपितच आहे पण सिनेमात पर्ण पेठे आहे असं कुठेतरी वाचायला मिळालं... वाह! वाघोबाच्या तीक्ष्ण नजर आणि फास्टर वेगाबरोबर पर्णरूपी गोडवा पण अनुभवायला मिळणार ... मुरंबा-रमा माधव अशा मधून आपला स्क्रिन प्रेझेन्स  किती  'कडक' आहे दाखवून देणाऱ्या ह्या दोघांना एकत्र स्क्रीनवर बघायला मजा येणार ए! ह्या व्यतिरिक्त मला  उत्सुकता लागून राहिलीये ती पोस्टर आणि टिझर ..दोन्हीमध्ये अमेयच्या मागेच दिसणारा हा चिमुकला शुभम मोरे आणि त्याच्या रोलबद्दल!


आता एवढ्या सगळ्या पुणेकरांबद्दल बोलल्यानंतर थोडंसं लातूर - मुंबईकडे वळावं. पार्श्वसंगीत!! ट्रॉय - अरिफ ह्यांना सलाम!! अतिशय साजेसं , उत्कंठा वाढवणारं असं पार्श्वसंगीत! अतिशय इम्प्रेसिव्ह! इवलास्या टीझरमध्येच अख्या पिक्चरचा फील कसा असेल हे म्युझिक उभं करतंय! काय कमाल एनर्जी त्या ट्युनमध्ये!
निर्मात्यांबद्दल काय बोलणार ... फेणेच्या मागे विश्वासाने,ताकदीने उभा राहून... त्याला मोठ्या पडद्यावर आणून, पहिल्या पोस्टरपासूनच बॉलिवूड दिग्गजांना आपल्या मराठमोळ्या फेणेकडे लक्ष देण्यास भाग पाडून, आत्तापासूनच फेणेची उत्सुकता देशभर पोचवल्याबद्दल झी आणि रितेश देशमुखला मनापासून धन्यवाद! रितेशसारखा मोठा स्टार आपल्या मागे आहे हे कळल्यावर आपसूकच त्या सिनेमाशी निगडित सर्वांचा आत्मविश्वास वाढतो आणि तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला मदतही होते. पण टिझरमध्ये रितेशचा आवाज ऐकताना, हा माणसाची इन्व्हॉल्वमेंट फक्त 'निर्माता' रोल पुरती लिमिटेड नसून त्याहून जास्त तो ह्या प्रोजेक्ट मध्ये इमोशनली इन्व्हॉल्व्हड आहे असं  जाणवलं ... त्याला स्वतःलाच फेणेचा लीड रोल करायची जाम इच्छा होती कि काय आणि फेणेच वय थोडं मोठं असतं तर कदाचित रितेशने ही संधी सोडली ही नसती असं काहीसं वाटून गेलं...पण त्यानी टीझरमध्ये मस्तपैकी व्हॉइस ओव्हर देऊन त्याच्या फॅन्सना मस्त सरप्राईज देऊन टाकलंच आहे! 
जेनेलियासारखच फेणेदेखील आजच्या प्रेक्षकांचा सर्वांचाच लाडका होईल....सर्वांचा आवडत्या पुस्तकरूपी फेणेचं  पडद्यावरचं रूप देखील सर्वाना आवडेल असंच ह्या पहिल्या ओव्हरनंतर वाटायला लागलंय... आणि इतक्यावर न थांबता विदेशी सिनेमासारखे फास्टर फेणेचे पण पुढचे भाग येतील , जेणेकरून आपल्याच मातीतल्या व्यक्तिरेखाना अंडरएस्टीमेट करायची चूक आपण पुन्हा करणार नाही.... हीच इच्छा!!!

Teaser - https://www.youtube.com/watch?v=4Bjv5nL-OK0

९० सेकंदच टिझर मधूनच एकसाईटमेन्टनी एवढं लिहायला भाग पाडलं.. पण सध्यातरी २७ ऑक्टोबरची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही !! फेणे, भेटूच पुढच्या महिन्यात...तोपर्यंत, टॉक्क!!

Friday, September 22, 2017

स्लो कूकर- हळूवारपणे शिजलेलं सुख!

स्लो कूकर- हळूवारपणे शिजलेलं सुख!
                                                                                                                                         

आजकाल ज्या गोष्टी बाहेर खातो त्याच घरी ट्राय करायचा नवीन छंद लागलाय... त्याच गडबडीत एक नवीन फॅड म्हणून परवा 'स्लो कुकर' आणला! वॉलमार्ट मध्ये गेलो आणि त्या किचन सेक्शनमध्ये सगळ्यात स्वस्त असा स्लो कुकर शोधला आणि लगेच घेऊन टाकला. आपलं नेहमी असंच असतं ..स्वस्त ते मस्त! हल्ली नवीन कपड्यांचं शॉपिंग झाला तरी  ते कधी एकदा घालतोय ह्याची फारशी उत्सुकता नसते (पोटाला वगैरे घट्ट होत असतात ना!)! पण स्लो कुकर मात्र घरी आल्या आल्या लगेच उत्साहात उघडला गेला , आतमध्ये पाहिलं तर रेसिपीजच पुस्तक होतं.... लगेच वाचायला घेतलं तर सगळ्याच इटालियन मेक्सिकन अशा इंग्लिश रेसिपीज! श्या! आपला भारतीय बाणा अपेक्षेप्रमाणे जागा झाला... बायकोला म्हणलं पाहिलं काही होणार तर बिर्याणीच होणार आज ह्याच्यात... साजूक तुपातली बिर्याणी!

ऑनलाईन  बघून, थोडा इकडे तिकडे वाचून बिर्याणी लावली ... एकदम टकाटक दिसत होती! स्लो कुकर मध्ये ३ तास शिजवायची असं तो यु ट्यूब वरचा शेफ म्हणाला... ती एवढी कडक दिसत होती...पण तीन तास वगैरे थांबायचं??
 "पाटणकर, 'स्लो कुकिंग'ची हौस आहे ना ....सो छान हवं असेल तर पेशन्स ठेवायला शिका ..".हे असं काहीतरी तो शेफ ओरडला बहुधा! कुकर सुरु केला ...3 एक तासांनी घरात वेलची,दालचिनी,केशर, पुदिनावगैरे गोष्टींचा एक अतिशय कडक वास अख्या घरात पसरला होता... मी तर 3 तासाचा गजर लावून ठेवला होता..वासामुळे भूक वाढली होतीच...गजर झाल्या झाल्या लगेच किचनकडे पळालो, कूकर उघडला...आयच्या गावात! काय जबरा दिसत होती ती ...तांदूळ पहिल्या पावसात भिजलेल्या झाडासारखे फ्रेश दिसत होते...पण मेन फोकस होता तो 'स्लो कुक्ड चिकनचा' ...चिकन कितपत आणि किती शिजलंय ह्यावर सगळं अवलंबून होतं ..टेस्ट करायला म्हणून एखादा पीस घेतला.....तोंडात ठेवल्या ठेवल्या माझं पुण्याच्या तिरंगामधून  एस पिज मग ब्लु नाईल हुन जॉर्ज वगैरे प्रवास करून आलं! इतक्या वर्षात जे फक्त बाहेरच खायला मिळालं होतं  एक्झॅक्ट सेम टेक्सचर चिकनला आलं होत ... परफेक्ट मॉइश्चर ठेऊन ते शिजलं होतं.. फुल्ल टेण्डर  ....कुकरमध्ये  निर्माण झालेल्या वाफेनीच बिर्याणीला शिजवलं होत. हळू हळू शिजल्यामुळे जेवढी बाहेरून सुंदर दिसत होती तेवढीच आतपर्यंत शिजली होती ... इतका वेळ इन्व्हेस्ट केल्यामुळे त्याचे रिटर्न्स सुद्धा 'इंटरेस्टिंग' होते ....तो मसाला, ती चव,ते रंग हे तांदूळ आणि चिकन ह्याच्या अगदी आत पर्यंत पोचलं होतं... 

हे असं काही खायचं असेल तेव्हा मला डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही...पटापटा डिशमध्ये बिर्याणी घेतली आणि एकटाच मस्त बाल्कनीत जाऊन बसलो ... 

खूप वेळ घेऊन... शांत... मनसोक्तपणे तयार झालेलं चिकन खात खात मी एकटाच हरवून गेलो होतो... एकदा पोट प्रसन्न झाल्यावर मग मात्र सुखावलेलं मन पुन्हा ऍक्टिवेट झालं...विचारांना किक बसायला लागली आणि अचानक वाटलं आपलं आयुष्यपण किती ह्या स्लो कुकरसारखंच असतं .... गोष्टी हळू हळू मिळत गेल्या कि त्याची गोडी वेगळीच लागते.. एकदम विरघळलेली! म्हणजे बोलायचंच झालं तर सक्सेस ...यश! झटपट मिळालेल्या यशापेक्षा खूप झटून कष्ट करून हळू हळू पायऱ्या चढत यशाच्या शिखरावर पोचलं कि त्याचं वेगळं सेलिब्रेशन करावंच लागत नाही... शिखरावर पोचण्याच्या त्या स्लो प्रोसेसमध्येच खरा आनंद मिळालेला असतो!
स्टॉक मार्केट मध्ये खरे 'पोचलेले' लोक डे -ट्रेडिंग करण्यापेक्षा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट वर भर देत असतात ... बऱ्याचदा आपल्या मनाला वाटत असत काहीच गोष्टी घडत नाहीयेत ..तेव्हा आपल्या नकळत त्या बदलत असतात...गरज असते ती फक्त पेशन्स ठेवायची.
आणि  कदाचित पेशन्स ह्याच गोष्टीमुळे एखाद्या बॅट्समनला वन डे मधल्या सेन्चुरीपेक्षा टेस्ट क्रिकेटमधले १०० जास्त मोलाचे वाटत असावेत... इतकंच कशाला ...रिलेशनशिप मध्ये सुद्धा ..पहिल्या नजरेत प्रेम होऊन दुसऱ्या दिवशी प्रपोज करून नातं सुरु होण्यापेक्षा.. आधी नुसती नजरानजर, मग त्याच मैत्रीत झालेलं रूपांतर हे असं टप्या टप्प्याने पुढे गेल्यावर 'आय लव्ह यू' म्हणायची गरजच लागत नाही ..एकमेकांच्या डोळ्यात डोळ्यामधेच ते नातं दिसून येतं .... इतक्या वर्षाच्या स्लो प्रोसेस मध्ये ते एकदम मुरून गेलेलं असतं .... अरेंज मॅरेज ची सुद्धा तीच गम्मत असते... लग्नाच्या पहिल्या रात्री अवघडलेली दोन्ही मनं काही वर्षांनी मात्र एकमेकात बुडून गेलेली असतात ..दोघांच्याही  नकळत... नातं उलगडत जाण्याची प्रक्रिया फार हळू हळू होते .. सोप्या अवघड वाटांमधून प्रवास करत पुढे जाते ... मागे वळून बघितल्यावर मात्र चेहऱ्यावर वेगळंच हास्य ठेऊन जाणारी असते!

आयला, ही स्लो कुक्ड बिर्याणी जिभेबरोबर पोट आणि मन ह्यांनापण एक प्रकारची चालना आणि ख़ुशी देऊन गेली होती!  अनेक प्रकारच्या गोष्टी मनात हळू हळू येत होत्या...आणि माझे विचार एका फांदीवरून दुसरीकडे टुणकन उड्या मारत होते .... नकळत बिर्याणी मात्र मस्तपैकी फस्त झाली होती! 
"बीइंग स्लो' रॉक्स" असं काहीतरी पुटपुटत... पुढच्या वेळेस काहीतरी इटालियन करूया असा काहीसा निर्धार करत पडदे लावून वामकुक्षी घ्यायला प्रस्थान केलं!!!            
---स्वागत पाटणकर 

Wednesday, September 6, 2017

आठवणीतला सीगल... उबुंटूच्या निमित्ताने!

आपल्याला फार वाईट सवय असते , लोकांना पहिल्या भेटीतच 'जज' करायची. फार पूर्वी.. म्हणजे १५-१६ वर्षांपूर्वी, आमची सगळी बीएमसीसीची नाटक मंडळी पित्ती हॉलवर जमला होती. पुढच्या स्पर्धेसाठी काय करावं वगैरे चर्चा सुरु होत्या. तेवढ्यात एक मुलगा आला.. अकरावीत कॉलेजमध्ये आल्या आल्या लोकं नाटक, क्रिकेट असे आपल्या इंटरेस्टचे ग्रुप्स जॉईन करतात... हा ही तसाच असावा असं वाटलं!  ओळख परेड सुरु झाली .... नाव 'सारंग साठ्ये....  अकरावी नव्हे तर एफ वाय- एस वायमध्ये होता, सीएचं एक वर्ष 'ट्राय' करून मग त्याला चक्क अभिनयात इंटरेस्ट जाणवायला लागला होता!'
निळा चेक्सचा शर्ट, आतमध्ये पंधरा टीशर्ट, डोळ्यावर चष्मा, अख्या दुनियेची वेट लॉसची जबाबदारी एकट्याने उचलल्यासारखा बारीक आणि मनातले विचार जितक्या वेगवेगळ्या दिशेने जाऊ शकतात तितक्याच वेगवेगळ्या दिशांना भरकटलेले त्याचे ते केस! . एकूणच त्याला पाहता, 'ह्याला अजूनही आपला इंटरेस्ट नक्की कशात आहे हेच कळलं नाहीये...सीएसारखच ही पण चुकीचीच दिशा ह्यानी निवडलीये... आता करायला काही नाहीये तर उरलेलं कॉलेज लाईफ एन्जॉय करायला इकडे आलाय' वगैरे मतं त्याच्याबद्दल झाली होती! 

पण कधी कधी शितावरून भाताची परीक्षा केल्यावर आपण सपशेल फेल होतो!! साठ्ये हा त्यातलाच प्रकार... पित्ती हॉल जॉईन केल्यावर काहीच दिवसात त्याने अक्षरशः त्याच्याकडे असलेल्या अफाट ऊर्जेने मला भारावून टाकलं! किती एनर्जी असावी एवढाश्या जीवात ... केवढ्या कल्पना असाव्यात त्या डोक्यात! बीएम गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषोत्तम मध्ये फारसं यशस्वी झालं नव्हतं... पण ह्या नवीन आलेल्या पाखराने पांढरा शुभ्र सीगल बनून आम्हा सगळ्यांना झेप घ्यायला शिकवलं! सगळं ग्रुप एक झाला ..खूप कष्ट, अपार मेहनत घेऊन जोनाथन सीगल एकांकिका उंच उंच उडाली आणि पारितोषिक घेऊनच पित्तीच्या फांदीवर खुशीत येऊन बसली. भरतमध्ये बीएम - बीएम च्या गजराची वाट बघत होतो तो शेवटी ऐकायला मिळाला! एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला! आणी त्यात साठयांच्या सीगलचा सिंहाचा वाटा होता! सारंगची दिशा चुकलेली नव्हती ... त्याची घेतलेला तो टर्न हा राईटच होता.. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान ते सांगून जात होतं! 

नटसम्राट!
पुढे, मी पोस्ट ग्रॅड्युएशन - नोकरी वगैरे असा ठराविक स्टॉप असलेला रस्ता निवडला आणि मग पित्ती हॉलवर जाणं बंद झालं... पण जेव्हा केव्हा सारंग भेटायचा तेव्हा तेव्हा त्याच्या डोक्यातला नवीन कल्पनांबद्दल भरभरून बोलायचा ... ह्या माणसाला खूप काही करायचं हे त्याच्या डोळ्यातच जाणवायचं... माझ्या पोटाचा साईझ आणि त्याची एनर्जी हे एकाच प्रमाणात वाढलं होतं!  नाटक, स्क्रिप्ट, तालीम,वाचन., संवाद ..अभिनयातले बारकावे ह्या सगळ्याबद्दल तो भरभरून बोलत होता! ऐकायला लै भारी वाटत होतं... पित्ती हॉलचा विषय निघाल्यावर  'अरे,दोन नवीन मुलं आली आहेत... भविष्य आहेत ती'  बोलला ... हा आता दुसऱ्यांची क्षमता ओळखायला लागला होता ... शिवाय आपल्या घरात बाळ जन्माला आलंय एगझॅक्ट तशाच आनंदात तो हे सांगत होता ! नाटक हा माझा श्वास आहे वगैरे बरेच लोकं मुलाखतीमध्ये वगैरे बोलताना ऐकलं होतं.. पण सारंगच्या बाबतीत मला ऍक्च्युअली ते दिसत होत ! हा माणूस फक्त अभिनयात बॅटिंग न करता ..तो मोठा ऑलराऊंडर होणार आहे असं काहीतरी मनात वाटून गेलं...

त्यानंतर मात्र भेट होणं फार कमी झालं... आम्ही ९-५ जॉब मध्ये बिझी झालो आणि सारंग 'स्ट्रगल' करायला पुण्याबाहेर गेला असं मित्रांकडून कळलं! कोणी गॉडफादर नसलेल्या साठ्येचा स्ट्रगल यशस्वी होवो एवढीच मनातल्या मनात प्रार्थना केली! मधेमधे गार्बो ,तू ,जंगलनामा अशा अनेक कलाकृतींमधून त्याच नाव वाचायला मिळायचं... स्वतःमधल्या एनर्जीला प्रायोगिक रंगभूमीकडे चॅनेलाईझ करून त्यांनी पुन्हा एकदा बरोबर निर्णय घेतला होता!  आमच्या हिऱ्याला पैलू पाडायचं काम प्रायोगिक रंगभूमी करत होती! ब्राईट डे, ब्रिन्ग ऑन द नाईट वगैरे मधून तर हा देशभर पोचला होता! नटसम्राट रिलीज झाल्यावर किंवा गुगल प्लेवर ब्राईट डे आल्यावर मी सगळीकडे आरडाओरडी करून अतिशय उत्साहात सगळ्यांना सांगत सुटलो होतो! आपला साठ्येच हे यश बघून खूपच मस्त वाटत होतं! मध्यंतरी एकदा कर्वे रोड वर दिसला...त्याचे पूर्वीचे ते भरकटलेले केस आता खूप मोठे झाले होते पण एकदम टापटीप.! आपसूक त्याला हाक मारली गेली ... मागे न बघता त्यांनी काय स्वागत कसा आहेस विचारलं! त्यानं इतक्या वर्षांनी सुद्धा फक्त आवाजावरून आपल्याला ओळखलंय! वाह! त्याच्याबद्दल प्रेम होतंच .. पण आदरही वाटायला लागला! 

सारंग मात्र एवढ्यावर थांबणाऱ्यातला नक्की नाही. त्याच्यातला दिग्दर्शक  त्याला स्वस्थ बसू देत नव्हता...,मनात असलेल्या अनेक कल्पनांना वाट करून देण्यासाठी भाडीपा - मराठी वेब चॅनेल सुरु केलं..आजकालच्या प्रेक्षकांना नक्की काय हवंय ह्याची उत्तम जाण असलेल्या साठ्येनी कास्टिंग काऊच लोकांसमोर आणलं तेसुद्धा अनेक वर्षांपूर्वी त्यानी पारखलेल्या 'त्या दोन' मुलांना घेऊन ... मराठीतील ह्या पहिल्या वेब सिरीजनी जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय ..  भाडीपाच्या सगळ्याच कलाकृतींवर लोकं मनापासून प्रेम करतायेत! पण मला मात्र ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याच्यातला दिग्दर्शक त्याच्यातल्या अभिनेत्यावर अन्याय करतोय कि असं वाटायला लागलं ... पण परवाच पाहिलेल्या उबुंटूच्या ट्रेलरनी मात्र सुखद धक्का दिला! लीड रोलमध्ये आपला साठ्ये! ट्रेलर तर आवडूनच गेलं पण एकसाईटमेन्ट मध्ये भराभरा १५ वर्षांपूर्वीच्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या आणि लेखणीतून उतरल्या! 

उबुंटूमध्ये त्याच्या तोंडी एक डायलॉग आहे. "ह्या वयात फार रग असते मुलांच्या अंगात".... 

इतक्या वर्षांनीसुद्धा सारंगनी तीच रग त्याच्यात अजूनही जिवंत ठेवली आहे ह्यापेक्षा सुखावणारी दुसरी गोष्ट नाही... त्याच्या फॅन्ससाठी..माझ्यासारख्या!

Friday, August 18, 2017

कोथरूडचा गोड आघात - पट्या!

साधारण ७-८ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. बापटांची प्रिया आणि कामतांचा उमेश हे दोघंही तसे नेहमीच आवडीचे.. त्या दोघांचं एक नाटक येतंय असा कुठेतरी वाचायला मिळालं होतं... भयंकर उत्सुकता होतीच पण त्यानंतर साधारण ६-७ महिन्यानंतर पुण्याला जाणं झालं. तोपर्यंत 'नवा गाडी नवं राज्य'नी  फुल्ल धुमाकूळ घातलेलाय असं कळलं! पुण्यात गेल्या गेल्या प्रयोग पहिला... ते दोघं आवडलेच... पण त्याएवढेच आवडले ते नाटकातले डायलॉग्स! माझा नुकतंच लग्न झालं होतं त्यामुळे नाटकातले सीन्स,  त्या दोघांमधले वाद - संवाद अगदी आमच्या घरातलंच प्रतिबिंब वाटत होतं.  नाटकाचा लेखक आपल्याच घरात लपून बसला होता कि काय अशी शंका आली.. दुसऱ्या अंकाआधी अनाउंसमेंट झाली तेव्हा लक्ष देऊन लेखक कोण आहे ऐकलं... क्षितिज पटवर्धन! 

आयला! हे नाव कुठेतरी ऐकलंय असं वाटत होतं ... पण काही केल्या आठवत नव्हतं... तो विचार बाजूला ठेवून पुन्हा नाटकात गुंतून गेलो. प्रयोग संपल्यावर प्रियाला भेटायला जायलाच हवं, नाही तर फाऊल होतो.  स्टेजच्या मागे  जाता जाता एक जुना मित्र भेटला... तसा १० एक वर्षानंतर वगैरे दिसला... आपसूक हाक मारली गेली 'ए पट्या, ओळखला का भाई' ..... लगेच उत्तर आलं "बोला पाटणकर".. वा ! पाटणकर लगेच खुश झाले... १०-१५ मिनिट गप्पा झाल्या असतील... त्यातला अर्धा वेळ पाटणकर अमेरिकेचं कौतुक आणि थोडासा माज करण्यातच बिझी होते.. पट्या मात्र दिलखुलास पणे गप्पा मारत होता... निघता निघता मी विचारलं आवडलं का नाटक....??  पट्यानी फक्त स्मितहास्य दिलं.. आणि निघून गेला. दोन मिनिट मी तसाच उभा होतो. ट्यूब पेटली...च्यायला पट्या म्हणजेच क्षितिज पटवर्धन! क्षणर्धात, मी माती खाल्लीये ह्याची जाणीव झाली आणि पण आश्चर्य देखील वाटलं ... पट्या! हा किती डाऊन टू अर्थ आहे! किती मोकळेपणाने गप्पा मारत होता... नाटक हिट झाल्याचा, स्वतः स्टार वगैरे झाल्याचा लवशेष ही  चेहऱ्यावर नव्हता...आणि बोलण्यात तर अजिबात नाही! 

कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तमच्या वेळेस भरतवर 'हाय-हॅलो' व्हायचं... आम्ही डहाणूकरच्या कट्ट्यावर शिट्ट्या मारत बसायचो, तेव्हा पट्या त्याच्या एम ८० वरून जाताना मस्त स्माईल देऊन हात करून जायचा.. दिवसभरात ३-४ वेळा व्हायचं असं... खरं तर ओळख म्हणावी तशी एवढीच पण तीसुद्धा तो विसरला नाही... थोडक्यात, त्याच्याशी ती छोटीशी भेटीनी मी खुश झालो होतो. मला खूप भारी वाटलं होतं! त्याच्यासाठी,माझ्यासाठी आणि कोथरूडसाठी ...! नेहमीच सेलिब्रिटींना ते सेलिब्रिटी झाल्यावर बघत आलोय ... पण त्यात आपल्या कोथरूडचा , आपल्यासारखाच मध्यमवर्गीय घरातला, एकदम साधा सरळ मुलगा आज मोठा होतोय.... मोठा स्टार सेलिब्रिटी होणार हेच भारी वाटत होतं! 


आज अचानक हे सगळं आठवायचं कारण म्हणजे सकाळीच रिलीज झालेलं 'बापजन्म' मधलं नवीन गाणं! 'बापजन्म - मन शेवंतीचे फुल! ' अर्थातच पट्यानी लिहिलेलं... मेंदीच्या गंधात भारले, भेटीचे सोहळे! वाह! काय शब्द ते...मनाला भिडूनच जातात डायरेक्ट! हेच काय, कुठलंही गाणं असो...पट्याचे शब्द म्हणजे जादूच...सहजता म्हणजे काय हे शिकावं...ते ह्याच्या कडून!  एखाद्या आजीनी नववारी मध्ये फुलं वेचून ठेवावीत तसा पट्या शब्द वेचतो आणि अलगदपणे ओळींवर वाहतो...! डबल सीट वगैरे सारख्या सिनेमात एकदम सरळ साधी वाटणारी गोष्ट मनात खोलवर ठेवून जातो!
आणि असं पण नाही हां किती फक्त भावनांना साद वगैरे घालणारच मी लिहिणार..असं कुठल्याही चौकटीमध्ये बांधून घेतलं नाही..साहेब एकदम ऑल राउंडर...  'किती सांगायचय' पासून डीजेला आईची शपथ वगैरे गाणी लिहितात! ...नवा गडी पासून डायरेक्ट दोन स्पेशल .... आणि वायझेड पासून ते क्लासमेट्स पर्यंत...परत नाटक सिनेमासाठी लिमिटेड न राहता इतर ही गोष्टी करतच असतो ... परवा तर कब्बड्डी टीम साठी पण गाणं लिहिलं ह्यानी.. 
हा  माणूस म्हणजे आता गाणी, संवाद, लेखक + दिग्दर्शन असं एक दर्जा पॅकेज झालाय! 

विक्रम गोखलेंच्या आघातचे संवाद लिहिण्यापासून सुरुवात केलेला पट्या... वेगवेगळे पैलू बाहेर काढत आता खूप मोठा झालाय... आता  तर त्याला पट्या म्हणणं थोडं ऑडच वाटतं, पण अजूनही तो तेवढाच जमिनीवर आहे. आजही त्याला भेटल्यावर ... तो इतक्या अदबीने तुमच्याशी बोलतो कि तुम्हीच सेलिब्रिटी वगैरे आहात कि काय असं तुम्हाला वाटून जातं! हा आमचा प्रतिभावान कोथरुडकर, आता महाराष्ट्र काय जगभरातल्या मराठी प्रेक्षकांचं  मनोरंजन करतोय... वर्षानुवर्षे करत राहील! मराठी सिनेमासाठी कथा ह्या हिरो असते , पण कथेला हिरो बनवणाऱ्या ह्या लेखक मंडळी मात्र कुठेतरी हरवून जातात... सगळ्या झगमगाटात ते बाजूला राहतात, लपले जातात... हे असं काही होऊ नये हीच इच्छा आणि दिवाळीमध्ये येणाऱ्या दर्यासाठी शुभेच्छा!