Tuesday, October 24, 2017

त्या दोघी... ट्रीट फॉर फॅन्स!

त्या दोघी... ट्रीट फॉर फॅन्स!
     

      एका टेबलवर दोघीजणी समोरासमोर बसल्यात... त्यातली एक भारीतलं घड्याळ घातलेली, इंग्लिश पुस्तक वाचत 'मग' मधून कॉफी पिणारी ... तर दुसरी हिरव्या बांगड्या घालून, टिपिकल कप-बशीतून चहा पीत पीत लोकरीचा गोळा घेऊन वीणकाम करणारी.... दोन व्यक्ती पण एकदम भिन्न प्रवूत्ती... सचिन गुरवनी नेहमीप्रमाणेच कल्पकतेने तयार केलेलं .... कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्कंठा वाढवणारं हे पोस्टर आज  इंस्टाग्राम वर पाहिल...चित्रपटाचं नाव - आम्ही दोघी! इंटरेस्टिंग पिक्चर वाटतोय असं मनात म्हणेपर्यंत ...स्क्रोल डाऊन करता करता नजर पुन्हा त्याच पोस्टरवर गेली  आणि ती तिकडेच थांबली.... डोळे मोठे झाले आणि जोरात कंठ फुटला...  त्या दोघी मधल्या दोघी म्हणजे -मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट! आर यु किडींग मी??? मुक्ता आणि प्रिया एकत्र... कसला बाप प्रकार आहे हा आयुष्यातला...जेवढा आनंद आमीर आणि शाहरुखला एकत्र बघायला झाला असता त्यापेक्षा जास्त खुश झालो आपण ... आम्ही दोघीचं पोस्टर बघून!दिग्दर्शक,कास्टिंग हेड, प्रोड्युसर जे कोणी हे 'कास्टिंग' केलंय त्यांना शंभर पैकी शंभर मार्क्स मी देऊन टाकले!


        "मला ही खूप आवडते" किंवा "ती कसली क्युट आहे" वगैरे असं बायकोसमोरसुद्धा आत्मविश्वासानी कोणाबद्दल बोलता येत असेल तर त्या म्हणजे मुक्ता आणि प्रिया... 
तसं बघायला गेलं तर ह्या दोघी एकत्रच माझ्या आयुष्यात आल्या... म्हणजे त्या माझ्या आयुष्यात आल्या पण मी काही त्यांच्यापर्यंत पोचलो नाही.. असो मुद्दा असा की साधारण १२-१३ वर्षांपूर्वी, जेव्हा मी बीकॉम ह्या गोंडस नावाखाली आयुष्यात काहीही करत नव्हतो तेव्हाच मुक्ता आणि प्रिया दोघी इंडस्ट्रीमध्ये सेट होत होत्या. आभाळमाया,फायनल ड्राफ्ट, देहभान वगैरे क्वालिटी प्रॉडक्टसमधून मुक्ता समोर येत होती , तिची छाप पाडून जात होती .... तर २००३च्या आसपास डायरेक्ट राजू हिरानींच्या मुन्नाभाई सिरीजमध्ये प्रिया थोडी का होईना पण दिसली होती, आवडून गेली होती. आणि तेव्हाच वाटून गेलं होतं ही मुलगी पुढे जाणार...  

त्या दोन-तीन वर्षात आमच्यात हे 'इंट्रो' सेशन झाल्यावर खरी मैत्री झाली ती मात्र २००८-०९ च्या दरम्यान... स्त्री कलाकार सुद्धा प्रेक्षकांना खदखदून हसायला लावू शकतो ते ही काहीही पाचकळ चाळे न करता... हे ताकदीने दाखवून दिलं मुक्ताने - एक डाव धोबीपछाडमधून. तोपर्यंत बऱ्यापैकी सिरीयस किंवा मॅच्युअर्ड व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मुक्ताकडून ती 'सुलक्षणा' बघायला मिळणं म्हणजे एकचेहऱ्यावर खूप मोठं स्माईल आणणारं सरप्राईज होतं. सशक्त अभिनय म्हणजे फक्त प्रेक्षकांना सिरीयस करून त्याच्या डोळ्यात पाणी आणणं नव्हे... पण आपला तोच चेहरा घेऊन अभिनयाचं कौशल्य दाखवत लोकांना हसवणं देखील फार अवघड काम. मुक्ताने ते लीलया पेललं होतं ते सुद्धा विनोदाचे बादशाह अशोक सराफ समोर असताना! तेव्हाच आपली आणि तिची घट्ट मैत्री झाली... ! त्यानंतर मात्र तिनी पिक्चरला बोलवायचं आणि आम्ही पहिल्याच दिवशी जायचं हा अलिखित नियम होऊन गेला... 
नंतर नंतर तर ही इंडस्ट्रीची विराट कोहलीच होऊन गेलीय... टेस्ट, वन डे किंवा टी २० कुठल्या फॉरमॅटमध्ये कोहली फॉर्मात असतो अगदी तसच आमच्या मुक्ताचं ... भलतीच ऑलराऊंडर... टीव्ही , नाटक आणि सिनेमा सगळीकडे हिची जोरदार बॅटिंग आणि चौफेर फटकेबाजी!  जोगवा , आघात , मुंबई पुणे मुंबई, लग्न पाहावे करून , बदाम राणी गुलाम चोर ,डबल सीट , अलीकडेच आलेला गणवेश आणि हृदयांतर हे असे विविध प्लॅटफॉर्मवरचे सिनेमे, महाराष्ट्राच्या तरुण मुलांनासुद्धा डेली सोप बघायला लावणारी एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि कब्बडी -कब्बडी , छापा काटा , कोडमंत्र अशी तगडी नाटकं घेऊन ती नेहमीच भेटायला येते आणि सवयीप्रमाणे निशब्द करून जाते! 
मुक्ताची घरी ओळख करून द्यायची गरजच नाही लागली.... बघतो तर काय घरात आई,बायको अशा सगळ्यांची लाडकी अशी ही मुक्ता. एकदा, कोथरूडमध्ये पी एन जी दुकानाबाहेर आई आणि बायकोला मुक्ता बर्वे दिसल्यावर त्यांनी बिनधास्त हाक मारली; मुक्तापण ग्रेटच लगेच थांबून ५ मिनटं बोलूनच पुढे गेली.. काय खुश झाल्या होत्या तेव्हा माझ्या घरातल्या बायका... घरी येता येता त्यांनी समोरच्या जोशी स्वीट्समधून आंबा बर्फी वगैरे आणली! ही अशी आमची मैत्रीण... एकदम हुशार,अष्टपैलू अशी घरातल्या सगळ्यांची लाडकी!



         एकीकडे बर्वे आणि दुसरीकडे त्याच काळात मैत्री (अर्थातच एकतर्फी) केलेली प्रिया  बापट! 'मी शिवाजीराजे...' मध्ये तिला फुल्ल रोल मध्ये बघितल्यावर मुन्नाभाई बघितल्या नंतरची प्रतिक्रिया खरी होणार ही खात्री पटली. ही मुलगी नक्कीच पुढे जाणार. क्युट, ग्लॅमरस ,सुंदर,अल्लड ,बाप डान्स  आणि एव्हढ्या सगळ्या गोष्टी असून अंगात भिनलेला अभिनय... काय अजब कॉम्बिनेशन... तेव्हा आवडलेली प्रिया एकदम जवळची मैत्रीण झाली ती अर्थातच नवा गडी नवं राज्य मध्ये! साधारण ४ वेळा वगैरे ते नाटक बघितलं. मस्तपैकी कॉलेजच्या कट्ट्यावर बसून तिच्याबरोबर 'कल्ला' करतोय कि काय असाच फील नाटक बघताना यायचा... कितीही वेळा बघितलं तरी समाधान होईना.. एकदा प्रयोग संपल्यावर भेटायला म्हणून मागे गेलो तर ही मुलगी प्रेक्षकांमधून तिला भेटायला आलेल्या आजींना वाकून नमस्कार करत होती.. विषय कट.. मनात भरून गेली राव ही! सेलिब्रिटी भाव खातात, माज करतात वगैरे वाक्यांना जोरदार फुली मारली होती प्रियानी! इतके दिवस ती फक्त आवडायची आता आपण तिला फुल्ल रिस्पेकट द्यायला लागलो होतो! काकस्पर्श,टाइम प्लिज, वजनदार वगैरेमध्ये ती भेटून गेलीच पण निवडक कलाकृतीच करायच्या ह्या तिच्या सवयीचा लै त्रास होतो बाबा...तिची वर्षानुवर्षे वाट बघावी लागते... आणि त्यामुळेच हिची साधी जाहिरात जरी टीव्ही वर लागली तर सगळं सोडून मी ते पूर्ण ३० सेकंद टीव्हीत गुंग होऊन जातो...  समोर असलेलं जेवण, बायकोनी सांगितलेलं काम हे सगळं आपण तेव्हा विसरून जातो.. शेवटी हा रिश्ताच एवढा पक्का आहे काय करणार! एवढं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात दाखवलं असतं  तर तुमचा पोरगा डॉक्टरवगैरे झाला असता असे डायलॉगसुद्धा आमच्या घरात ऐकू येतात!  
महाराष्ट्रा मधल्या कित्येक कपल्स मध्ये एक क्रॉस कनेक्शन बघायला मिळतं असं मला वाटतं.. ते म्हणजेच नवरे प्रियासाठी  वेडे आणि बायका उमेशच्या फॅन्स.. आमच्या घरात पण तसंच आहे!त्यामुळेच मला माहितीये , बायको किती ही राग दाखवायचा प्रयत्न करत असली तरी तिची देखील प्रिया तेवढीच लाडकी आहे...
मागच्या वर्षी आलेला वजनदार तर तिनी मला बघूनच केला कि काय असं वाटलं... गुबगुबीत माणूस सुद्धा  किती गोड आणि क्युट असतो हेच तिनी दाखवलं आणि माझ्यासारख्यांच्या बाजूनी कोणीतरी उभं राहिलं असंच वाटलं.. पण हीच प्रिया तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून फिटनेस अवेअरनेस करत असते... आय एम शुअर कि ते बघून माझ्यासारखेच अनेक जण व्यायामाकडे वळत असणार! मैत्रीण असावी तर अशी!

तर अशा ह्या दोघी.. मुळातच भिन्न प्रवृत्तीच्या ह्या आता स्क्रिनवर पण भिन्न भूमिकेत. एक भन्नाट जुगलबंदी बघायला मिळेल असं एकूणच वाटतंय... म्हणजे पूर्वी स्टीव्ह वॉ आणि अँब्रोज ...किंवा स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेसची  मॅच सुरु असताना प्रेक्षक गुंग होऊन जायचे ... हा गेम असाच सुरु राहावा, संपूच नये  असं काहीसं प्रेक्षकांचं व्हायचं. इतका क्वालिटी - उच्च दर्जाचा खेळ बघायला मिळायचा की तो संपून जाऊच नये असं वाटायचं ... असंच काहीसं इंडस्ट्री मधल्या टॉप अशा ह्या 'दोघी' बघताना प्रेक्षकांचं होईल असं मला फार वाटतंय... दोघींचा स्क्रीन प्रेसेन्सच इतका जब्राट असेल कि ते बघतच राहावंसं वाटेल... संपूच नये असं वाटेल , पुन्हा पुन्हा बघावंसं वाटेल पण त्यासाठी अजून ४ महिने वाट बघायला लागणार... प्रतिमा जोशी ह्यांचं हे पाहिलंच दिग्दर्शन...  बर्वे आणि बापट अशा पॉवरफुल शस्त्र घेऊन पहिल्याच बॉलवर सिक्सर मारतील हीच प्रार्थना!

अशा ह्या दोघी... एकतर्फी का होईना पण माझ्या मैत्रिणीच त्या... नेहमीच भेटून निखळ आनंद देणाऱ्या ,रडवणाऱ्या,हसवणाऱ्या, खूप गप्पा मारणाऱ्या अशा ह्या दोघी... आता पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन वर दिसणार आहेत ... 23 फेब्रुवारीला बायकोबरोबर जाणार आपण ..चक्क मैत्रिणींना भेटायला! एक विशेष वॅलेंटाईन्स वीक (थोडासा लेट पण ग्रेट)असणार ए हा!  -
स्वागत पाटणकर 





       

Sunday, October 15, 2017

साखरेपेक्षा जास्त गोड़ ...अशी ही साखर खाल्लेली माणसं!!

साधारण ९४-९५ ची गोष्ट असेल... संगीतकार राहुल रानडेचे सासरे श्री गानू आणि आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो... एकदा असंच तो मोहन गोखलेना घेऊन त्यांच्याकडे आला होता. आमच्या मोठ्या बंधूना ही खबर लगेच लागली आणि अख्ख्या बिल्डिंगभर  "योगी आलाय - योगी आलाय" करत ओरडत सुटला ... मी सुद्धा लगेच हातातल्या सगळ्या गोष्टी टाकून खाली गेलो...मिस्टर योगी कुठे दिसले नाहीत, मग डायरेक्ट गानूंच्या घरात आम्ही शिरलो... (हो हो तेव्हा असं शेजारांकडे वगैरे लोकं जायची)!  गानूंच्या घरात घुसल्यावर, आमच्या एवढाश्या चेहऱ्याचा एवढा मोठा 'आ' झाला पण तरी त्यातून काहीही शब्द बाहेर पडत नव्हते...नुसतेच बघत बसलो.... समोर उभे होते मिस्टर योगी ! एकदम मोहन गोखल्यांसारखे...  नाही नाही समोर उभे होते मोहन गोखले... डिट्टो मिस्टर योगी!! अवाक झालो होतो, टीव्ही वर बघून ज्यांचा फॅन झालोय असं कोणाला तरी आयुष्यात पहिल्यांदाच  प्रत्यक्षात बघत होतो... गोखले माझ्या वडलांच्या वयाचे असतील तेव्हा पण कसले यंग आणि डॅशिंग दिसत होते ..त्यांचे ते चकाकदार डोळे माझ्याकडे फिरवून म्हणाले - काय रे, पकडू का तुला?? हाहा !! २ मिनटात भारी सुद्धा वाटलं आणि फाटलीसुद्धा! त्यांना लक्षात आलं ते ...लगेच केसांवरून हात फिरवून  एक मस्त स्माईल दिली मला आणि मग त्यांनी मोठ्या माणसांशी गप्पा सुरु ठेवल्या. काय काय कडक वाटत होतं त्या गप्पा ऐकायला.. कळत काहीच नव्हतं , पण ऐकायला भारी वाटत होत... स्पष्ट  उच्चार आणि एखाद्याने आजारी आईची काळजी घ्यावी अगदीच तशाच काळजीने, जबाब्दारीनी प्रत्येक शब्द उच्चारला जात होता! मुग्ध होणे म्हणजे काय ह्याच्या अनुभव १० मिनिटाच्या त्या भेटीत गोखले सरानी दिला! मिस्टर योगी, माफीचा साक्षीदार अशांमुळे मी त्यांचा फॅन होतोच, पण १० मिनिटाच्या भेटीमुळे अजून जास्त फॅन झालो....

तसंच अगदी त्यांची बायको, शुभांगी गोखलेंबद्दल....डेली सोप्स किंवा बाकीच्या सुद्धा मालिका बघायला कधीच इंटरेस्ट नसायचा... पण जेवायच्या वेळेला आई त्या सासू सुनेच्या अति कंटाळवाण्या सिरियल्स लावून ठेवायची ....नकोसं व्हायचं तेव्हा पण त्याला एक अपवाद होता ... अशी एक सिरीयल जी आठवणीनी मी स्वतःहून लावायचो... श्रीयुत गंगाधर टिपरे....  आणि त्यातल्या शुभांगी गोखले- कमाल.... केवळ कमाल!!! आपल्या मराठी आया कशा असतात, कशा वागतात, कशी काळजी करतात, धावपळ करतात, कसा घरातल्या सगळ्यांनाचा सारखा विचार करतात , सगळ्यांचं ऐकतात कोणालाही न दुखावता .... ते एगझॅक्ट टीव्हीवर आणलं शुभांगी गोखले ह्यांनी ... गोड चेहरा, बोलण्याची एक विशिष्ट स्टाईल आणि स्क्रिन्वरचा फ्रेश वावर ह्यामुळे त्या मनाला पटून गेल्या होत्या ... अक्खी टीमच चांगली होती पण समहाऊ शुभांगीताईंच जरा जास्तच आवडल्या ..आणि त्यामुळेच त्यांचं 'हीच तर प्रेमाची गम्मत आहे' ह्या नाटकाचा पहिला प्रयोग काय मी सोडला नाही....ह्या बाईचं विनोदाचं टायमिग सुद्धा अफलातून आहे हे लाईव्ह अनुभवायला मिळालं... .. आणि आता अगदी आईबाबांच्या पावलावर पाऊल ठेवणारी सखी.. अतिशय सुंदर अशी फोटोग्राफर असलेली, दिल दोस्ती मधून अगदी घराघरात पोचलेली , लोकांच्या मनात बसलेली सखी म्हणजे  कमालीची ऑल राउंडर ... स्वतः एका नाटकाची निर्मिती करून , त्यात दिल दोस्ती पेक्षा वेगळा रोल करून ..मराठी माणूस रिस्क घेत नाही असा कोणी म्हणलं तर त्याला सखी च उदाहरण द्यायला काहीच हरकत नाही. तिला इंस्टाग्राम फेसबुक वगैरे वर फॉलो करतोच आहे.. आणि आता माझं लग्न वगैरे झालाय नाहीतर मुंबईपर्यंत सुद्धा फॉलो करायला मागे पुढं पाहिलं नसतं.. सखी, शुभांगी आणि मोहन अशी ही मराठी इंडस्ट्रीमधली एक परिपूर्ण , गुणवान फॅमिली सदैव क्वांटिटीपेक्षा क्वालिटी कडे बघणारी ... माझ्यासारख्या प्रेक्षकांसाठी ही फॅमिली मनात कायमच घर करून राहिलीये......

एकीकडे अशी एक फॅमिली जिचा मी वेड्यासारखा फॅन आहे ....आणि दुसरीकडे साक्षात दामले सर ... ज्यांच्यासाठी माझी अक्खी फॅमिली ही ऍक्च्युली वेडी आहे! 


प्रशांत दामले.. काय बोलायचं ह्या माणसाबद्दल....  ह्या माणसामुळे किती गोड क्षण आम्हाला आठवणींच्या कप्प्यात साठवता आले आहेत.
जनरली शाळकरी मुलांना थोडी अक्कल यायला लागली कि त्यांना शिंग फुटायला लागतात. आमच्या घरीपण तसंच होतं..आम्ही दोन भाऊ शिंग फुटलेले... त्यामुळेच हॉटेल, लग्न ,मुंजीवगैरे अशा कुठल्याही कौटुंबिक ठिकाणी आईबाबांबरोबर जायचं म्हणलं कि आमची तोंडं वाकडी व्हायची...वाट्टेल ती कारणं देऊन आम्ही त्यांच्याबरोबर जायचं टाळायचो. पण अशा ह्या आमच्या घरातल्या ४ लोकांना एकत्र कोणी आणत असेल तर ते म्हणजे फक्त प्रशांत दामलेच नाटक... त्यांच्या नाटकाच्या रिपीट ऑडियन्समध्ये आम्ही ४घे नेहमीच असायचो...   आय थिंक 'लेकुरे उदंड झाली' ह्या नाटकापासून आमची सुरुवात झाली होती, मी अगदीच ८-९ वर्षाचा असल्यामुळे मला नाटकाबद्दल फ़ारस काही आठवत नाही पण दामलेंचा तो हसरा चेहरा लक्षात राहिला....  आणि हा हसरा चेहरा आपल्या चेहऱ्यावर हास्य अनु शकतो ह्याचा अनुभव आला तो 'बे दुणे पाच' ह्या नाटकात! दामले आणि परचुरे अशी एक विशेष जोडी आणि त्यात दामल्यांची अनलिमिटेड एनर्जी... माझ्या अंदाजे साधारण १००च्या आसपास 'एन्ट्रीज' असतील त्यांच्या त्या नाटकात ... कसं काय लक्षात ठेवून ते सगळं मॅनेज करायचे देव जाणे! असो, सांगायचं मुद्दा असा कि तिथपासून सुरु झाली त्यांच्या नाटकाची वाट बघायला सुरवात... मग "गेला माधव कुणीकडे', 'एका लग्नाची गोष्ट', ' ४ दिवस प्रेमाचे'वगैरे नाटकांची पारायणं केली आम्ही चौघांनी एकत्र.... 

दामल्यांमुळेच खूप सोनेरी क्षण एक फॅमिली म्हणून आम्हाला एन्जॉय करता आले. तो  आईबाबांबरोबर एकत्रितपणे घालवलेला वेळ हा किती सुखकारक आणि महत्वाचा होता हे आता मला फॅमिलीपासून लांब राहून कळतंय! 

दामलेंची नाटकं म्हणजे कधी नाटक वाटलीच नाहीत.. हा माणूस स्टेजवर उभा राहून आपल्याशी गप्पा मारतोय कि काय असाच वाटायचं... आणि ते तसं प्रुव्ह पण करायचे त्यांचा प्रेझेन्स ऑफ माईंड दाखवून ... एका लग्नाची गोष्टचा प्रयोग सुरु होता.  प्रशांत सर बायकोवर भांडण होतं म्हणून १ -२ -३ आकडे म्हणत विंगेत निघून जातात असा सीन होता.. ते ६ म्हणून विंगेत जाणार तेवढ्यात माझा भाऊ प्रेक्षागृहातून जोरात ७ असं ओरडला... आमच्या पुढे बसलेली लोकं जरा चिडली.. पण दामले...त्यांचं असं नाही ..प्रेक्षक म्हणजे मित्रच त्यांचा... विंगेत घुसत घुसत ते थांबले... अतिशय मार्मिक अशी एक्सप्रेसशन्स देऊन प्रेक्षकांडे बघून क्षणाचाही विलंब "तुमच्याकडे पण हे असंच घडतं का" ही एडिशन टाकली... स्टेजवर असलेल्या कविता लाड सकट अक्खा प्रेक्षागृह तुफान हसत होतं .. नंतर मग आम्हाला हा इंटरऍक्टिव्ह प्रयोग करायचा छंदच लागला... असंच एकदा गेला माधव कोणीकडे नाटकात प्रशांत सर "हो -हो - हो" असं म्हणायची ऍक्टिंग करत असतात पण तोंडातून शब्द न फुटता नुसती हवा बाहेर येत असते ..तेव्हा आम्ही बाहेरून जोरात 'हो' ओरडलो होतो.... त्यांनी लगेच ... "कोणीतरी २-२ बायकावालं आलंय  वाटतं असं उत्तर दिलं.. त्यांच्या ह्या अचूक टायमिंगचा  डाय-हार्ट फॅन झालो होतो कि जिथे तिथे तशी नक्कल करायला जायचो... मी बऱ्याच वेळा गमतीत म्हणतो माझं अभिनयातील करियर सुरु व्हायच्या आधीच बंद होण्यामागे प्रशांत दामले हेच आहेत! कॉलेजमध्ये एका सस्पेन्स नाटकाची प्रॅक्टिस सुरु असताना मी एका लग्नाची गोष्टींमधल्या स्टाईलने काही काही डायलॉग्स म्हणले होते! माझे ते 'प्रयोग' बघून त्यानंतर आजपर्यत मला कधी कोणीही ऑनस्टेज बोलावलं नाही!

शु कुठं बोलायचं नाही , जादू 'तेरी नजर अशी नाटकं आणि आमच्यासारखे आम्हीच सारख्या सिरियल्स ने नेहमीच आपल्याला हसवत राहिले.... मायबोली चॅनल वर शु कुठं बोलायचं नाही जितका वेळा दाखवलं जायचं ते तितक्याच वेळा बघितलं जायचं.... आमच्यासारख्या आम्हीच सीरियलमध्ये तर दामले आणि विजय चव्हाण ह्यांना स्क्रिप्ट देतच नसावेत , फक्त सीन चा आढावा देऊन कॅमेरा सुरु करत असावेत असं वाटायचं. ह्या सगळ्या हास्यगोष्टी असताना आम्ही दोघे राजाराणी , सुंदर मी होणार वगैरे नाटकांमधून त्यांनी आपल्या डोळ्यात पाणी सुद्धा आणलय... कपिल देव सारखेच आलराउंडर हे! ह्याच ऑलराऊंडरनी एकाच दिवसात ५ प्रयोगांची टेस्ट मॅच खेळली! एका दिवसात पाच प्रयोग!!!! आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी बालगंधर्व निवडून आम्हा पुण्याच्या प्रेक्षकांचाच गौरव केला अशी भावना आमच्या मनात निर्माण झाली.. काय-काय नाही केलं त्या दिवशीची तिकिट्स मिळवण्यासाठी ... पहिला प्रयोग मिस झालाच पण शेवटी ज्या मित्राशी वाद आहेत त्याच्याकडे तिकिट्स आहेत समजल्यावर त्याला सॉरी वगैरे गोडगोड बोलून उरलेले ४ प्रयोग बघितले! अविस्मरणीय अनुभव होता तो ...विश्वविक्रमाचा साक्षीदार होता आलं!! त्यादिवशी त्यांनी गंधर्व चा प्रेक्षक हा खरा रसिक असतो, त्यांच्या रिअक्शन ह्या अभिनेत्याला शिकवून जातात वगैरे बोलल्यावर तर मी सगळ्यांना दामले माझं कौतुक करत होते वगैरे सांगत सुटलो होतो ... आई बाबानी कपाळावर हात मारून घेतला!     

बाप्पा आणि आमच्या कॉलेज च्या कृपेने त्यांना भेटायचा योग आला... सतरा अठरा वर्षांपूर्वी आमच्या बीएमसीसीच्या  ऍन्युअल फंक्शनला पाहुणे म्हणून प्रशांत दामलेंना बोलवायचं ठरलं आणि माझ्या ३-४ मित्रांबरोबर आम्ही सगळे भरत नाट्य मंदिरामध्ये गेलो.. प्रशांत सर मेक-अप रूम मध्ये बसले होते ....हिरवा रंगाचा कुर्ता आणि  लख्ख गोरापान चेहरा.... हे मेकअप रूम मध्ये केवळ जायचं म्हणून जात असतील असं तेव्हा वाटलं ... त्या फ्रेश चेहऱ्याला गरजच नाही हो मेकअप वगैरेची...  आम्हाला मेक अप  रूम बाहेर बघून लगेच आत बोलावलं , टेन्शनमय आमचे चेहरे बघून आमच्या पोटातला गोळा त्यांनी ओळखलाच  ..लगेच स्वतःच वय कमी करून एकदम कॉलेज मित्रासारखं बोलायला लागले.... फंक्शनची तारीख विचारली,  डायरी काढली आणि लगेच 'मी येतो, अव्हेलेबल आहे' सांगून टाकलं ...उगाच आढेवेढे नाहीत, नंतर सांगतो वगैरे फालतुगिरी नाही ... ते लगेच हो म्हणल्यावर त्यांना घेऊन यायची जबाबदारी घेण्यावरून आम्ही सगळे त्यांच्यासमोरच प्रेमळ संवाद घालायला लागलो... हो ना , प्रशांत दामले ना आपल्या गाडीतून कॉलेजमध्ये आणायचं म्हणजे फुल्ल हवा होणार हे माहित होतं ... पण दामले सर ते..त्यांना अशी आणणं सोडणं वगैरे स्पेशल ट्रीटमेंट नको होती..."मी माझा माझा येतो, त्या दिवशी वेळेवर पोचतो..." एवढंच सांगून माणूस मोठा झालाय तरी पाय जमिनीवर कसे ठेवावेत ह्याचाच उदाहरण दाखवलं.  

पुण्यात, आम्हा पुरुषोत्तम करंडक वाल्यांसाठी भरत नाट्य मंदिर म्हणजे खरोकरचंच एक मंदिर ...आणि त्यामुळेच एखाद्या वारकऱ्याला पंढरपूरमध्ये विठोबाचं दर्शन गेहटल्यावर जसा आनंद होईल , अगदी सेम तसंच मला भरत मध्ये प्रशांतसरांना भेटून झालं!!

आणि आता इतक्या वर्षांनी .. एक दिवस अचानक कोलोरॅडो मराठी मंडळानी दिवाळीमध्ये "साखर खाल्लेला माणूस" चा  डेनवरमध्ये प्रयोग होणार हे लास्ट वीक अनाऊन्स केलं... आणि शुभांगी गोखले जिच्या अख्ख्या फॅमिलीचा मी वेड्यासारखा फॅन आहे आणि दुसरीकडे प्रशांत दामलेंसारखा अवलिया ज्यांच्यासाठी माझी अक्खी फॅमिली ही ऍक्च्युली वेडी आहे अशा दोघांना प्रत्यक्ष बघायला मिळणार ह्या सध्या विचारानीच मला दिवाळी लै हॅपी होणार ह्याची प्रचिती आली....आणि लेखणीतून सगळी एकसाइटमेन्ट लिहून काढली... 

आमच्यासारख्या पुणेकरांना कोथरूडवरून आलेले बेसन लाडू आणि चितळ्यांची आंबा बर्फी खाल्ल्याशिवाय कुठलाही सण सेलिब्रेट होत नाही पण ह्यावर्षी ती चिंता नाही .. ही दिवाळी ह्या गोड सेलिब्रिटींनी आणलेल्या साखरेनी अजून गोड होणार हे मात्र नक्की!! 

Saturday, September 30, 2017

कासव बघा. कासव व्हा - ट्रेलर रिव्ह्यू

कासव बघा. कासव व्हा.

खरं तर नॅशनल अवॉर्ड - सुवर्ण कमळ विजेत्या चित्रपटाचा ट्रेलर-रिव्यू वगैरे लिहिणं म्हणजे पीएचडी मिळालेला मुलगा "हा खूप हुशार आहे हां" वगैरे लोकांना सांगणं.... पण काय करू, आज सकाळपासून ते अतिशय सुंदर असं ट्रेलर बघितल्यावर काहीतरी लिहायला हात फारच शिवशिवत होते, खूप लोकांना ट्रेलर लिंक पाठवली पण समाधान होतं नव्हतं शेवटी लिहायचं ठरवलंच...३ मिनिटांचं ट्रेलर ...सिनेमाचं नाव कासव.... पण अजिबात वेळ न दडवता, चित्त्याच्या वेगात ते मनात घुसलं आणि खोलवर रुजलं... 
 देवगडच्या रम्य समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळेस पाण्याच्या दिशेनी जाणारी २ कासवं ... त्यांच्यावर आदळणारी लाट आणि दुसऱ्याच सीनमध्ये सकाळच्या साडेसहाच्या स्वप्नात आलेल्या लाटेच्या आवाजांनी दचकून उठणाऱ्या इरावती हर्षे....! वाह! अक्षरशः तीन सेकंदाच्या ह्या २ सीन्समध्ये हे ट्रेलर आपल्या मनावर गारुड करतं... समोर काहीतरी उच्च दर्जाचं सुरु आहे ह्याची प्रचिती देतं...आणि आपण त्या कासवांमध्ये गुंतून जातो...

सुमित्राताई भावे आणि सुनील सुकथनकर ... ह्या दिग्गज दिग्दर्शक जोडगोळीचा हा सिनेमा... आणि ट्रेलरमधल्या प्रत्यके फ्रेममध्ये ते वेगळेपण- तो ग्रेटनेस जाणवत राहतो. अस्तूनंतर पुन्हा एकदा ह्या दोघांचा चित्रपट बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच. 'इरावतीच्या खोलीत ठेवलेली २ मूर्तीरुपी कासवं ', 'आलोक किनाऱ्यावर चालत असताना मागे फिरणाऱ्या पवनचक्क्या' अशा फ्रेम्समधून ही दिग्दर्शक जोडी का दिग्गज आहे ह्याचा प्रत्यय आपल्याला येतो! प्रत्येक गोष्टीचा डिटेल अभ्यास करणाऱ्या सुमित्रा ताईंनी लिहिलेली ही कथा, अक्षरशः ३ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये मनाची पकड घेते... पॅनिक, डिप्रेशनसारख्या मानसिक 'आजारातुन' जात असलेल्या एखाद्याला अशा स्थितीतून बाहेर काढण्यासाठी दगड बनून प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून मदत करण्यापेक्षा, त्या माणसाला आधी नीट समजून घायची गरज असते... सामान्य माणसाला हे मानसिक विकार पटकन समजत नाही...पण बाहेरहून सुखासुखी दिसणाऱ्या गोष्टींना आतून तडा गेलेला असू शकतो.... त्यामुळे त्यात डोकावून बघायची गरज असते...ओल्या मनानी! कुठल्यातरी मानसिक गुंत्यामध्ये त्रस्त झालेला अलोक राजवाडे..आणि असाच काहीशा आजार पूर्वी अनुभवलेल्या इरावती हर्षे अशा दोन कासवांची गोष्ट म्हणजे हा सिनेमा.... असं म्हणतात -'Try to be like a turtle - at ease in your own shell' तुम्ही जसे आहात ...तसंच रहा ..त्याच स्वतः वर प्रेम करा . जाणूनबुजून पर्सनॅलिटी बदलायचा प्रयत्न करू नका... कासवाकडून शिका.... कदाचित ह्या सिनेमातून तेच सांगायचं असेल असा काहीसा अंदाज आपल्याला ट्रेलरमधून येतो..... 


    संपूर्ण ट्रेलरच खरं तर जबरदस्त आहे पण त्यातसुद्धा सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ह्यातले डायलॉग्स!!! मानसिक आजार, सायकॉलॉजिकल इश्यूवर कलाकृती करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यातले संवाद हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचवायला सर्वात महत्वाचे असतात. शब्द निवड ही चोख असावी लागते. नाहीतर चित्रपट खूप जड किंवा बालिश होण्याचा धोका असतो. पण सवांद लिहीणाऱ्या सुमित्रा ताईच त्या... सगळ्यांच्या गुरूच ...त्यांनी अत्यंत चपखल शब्द वापरून संवाद लिहिलेले आहेत . सामान्य प्रेक्षकाला समजतील... गोष्टीचं गांभीर्य कमी न होता आणि तरीसुद्धा मानसिक आजारसारखा नाजूक विषय लोकांच्या मनात अलगदपाने उतरेल ह्याची खात्री घेणारे असे संवाद.
   "सुखासुखी एकांत वाटतं?" "सुखाच्या व्याख्या वेगळ्या असतात ना", "मला मी आवडत नाही" "कुटुंबा हवंच  आधाराला ..पण मनाच्या नात्यांचं" असे एकसे एक डायलॉग्स ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात... आणि त्यात क्युट सरप्राईज देऊन जातो तो छोट्या ओंकारच्या तोंडून असलेला कोकणी भाषेतला चहा भजी वरचा डायलॉग... हे संवाद गोष्ट फार सोप्पी करून आपल्याला सांगतात आणि त्या व्यतिरिक्त "शेकडो कॉन्टॅक्ट आहेत एका बोटाच्या वर पण तरी एकटं वाटतं " अशा सवांदातून हा प्रॉब्लेम आजचा आहे हे सुद्धा दर्शवतं....अगदी सामान्य प्रेक्षक रिलेट करू शकेल अशा भाषेत! त्याबद्दल सुमित्रा ताईंना खरंच एक साष्टांग नमस्कार करावासा वाटतो....



आता बोलू कलाकारांबद्दल ...अभिनयातली देव माणसं सगळी ! काय बोलणार त्यांच्याबद्दल.... नवशिक्या अभिनेत्यांनी खरंतर हे असे चित्रपट अभ्यास म्हणून बघावेत.... काय टीम निवडलीये सुमित्राताई आणि सुनील सरानी!! शेन वॉर्नची ओव्हर कशी लेग स्पिन,गुगली असे ६ विविध पण ताकदवान शस्त्रांनी भरलेली असते ....एक्साक्टली तसंच आहे कासवमध्ये! मोहन सर , इरावती , देविका , किशोर सर ,छोटा ओंकार आणि आलोक! प्रत्येकाची स्टाईल वेगळीपण तेवढीच ताकदवान! 
इरावती हर्षे!!! नेहमी दर्शन देत नाहीत त्या पण जेव्हा स्क्रीनवर असतात त्यांचा प्रेझेन्स खूप प्रसन्न करणारा वाटतो ...वाक्य बोलताना विशिष्ट शब्दावर जोर द्यायची स्टाईल, त्यांचा तो भरीव आवाज नाजूक विषयाला फारच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो...आलोकचा गुंता सोडवाताना होणारी त्यांची घालमेल ही त्यांनी बरोबर दाखवली आहे. किशोर सर म्हणजे मानसिक आजाराकडे कोरड्या नजरेनी बघणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे ...त्याच्या स्पेशल स्टाईलनी त्यांची बाजू मांडतात आणि आलोक...तो तर आपला एकदम फेव्हरेट... मराठी शब्दांचे उच्चार कोणाकडून शिकावे तर ते आलोककडून ह्या ठाम मताचा मी आहे... त्याच्या रिऍक्शन्स सुद्धा खूप बोलक्या असतात ...उदाहरण द्यायचं झालं तर ओंकारकडून चहा भजी ची गोष्ट ऐकल्यावर ...आलोकनी दिलेली रिअक्शन निशःब्दपणे बरंच काही बोलून जाते...आणि तो आता ह्या गुंत्यातून कसा बाहेर येणार ह्याची उत्सुकता वाढवते! 

ह्या सर्व गोष्टींमुळेच कधी एकदा हे कासव बघतोय असं झालाय...फार महत्वाचा सिनेमा असणार आहे हा... 


नेहमीचा मसाला, धांगडधिंगा ह्या व्यतिरिक्त कासवसारख्या नाजूक विषयांवरच्या उत्तम कलाकृती निघणं हे समाजाच्या सुधृढ प्रकृतीसाठी फार गरजेचं आहे ...त्यामुळेच कासव फक्त भारतात नाही तर जगभरात प्रदर्शित व्हावा , खूप लोकांनी तो बघावा .... हीच इच्छा!!!                                                                                        
--स्वागत पाटणकर 

Friday, September 29, 2017

रामरक्षा आली धावून!

रामरक्षा आली धावून!

-- स्वागत पाटणकर 

  मागच्या आठवड्यात असंच मस्त जॉगिंगला गेलो होतो (हो हो मी आणि जॉगिंग)... पण आमच्या शरीरातल्या फॅट्स मोठे नशीबवान... पळायला लागल्या लागल्या १० मिनटात मोबाईलवर 'स्टॉर्म वॉर्निंग' आली... आणि  आकाशाकडे नजर टाकली, निळ्या आकाशावर काळ्याकुट्ट ढगांनी पांघरून घातलं होतं. डेन्वरची हवा म्हणजे फारच रोहित शर्माच्या बॅटिंग सारखी असते ... कधी लक्ख ऊन आणि दुसऱ्या क्षणाला धो धो पाऊस... त्यामुळे अचानक आलेल्या स्टॉर्म वॉर्निंगला मी सीरिअसली घेतलं, गाडी सुरु केली  आणि घरी जायला निघालो.. मस्त पावसाळी हवा होती... रहमानची गाणी लावून निघालो! वाह, सुख एकदम! पावसाची भुरभुर सुरु झाली होती ..काच खाली करून ..हात मस्त बाहेर काढलेला होता ... पावसाच्या संथ थेम्बाना मिठी मारायला एकदम तयार असा ..पण काही क्षणातच पावसानी रूप बदलायला सुरवात केली... भुरभुर, संततधार ,मुसळधार वगैरे टप्पे फॉलो न करता डायरेक्ट धो धो कोसळायला लागला .. जोरात.. सगळ्यात मॅक्सिमम स्पीड वर असलेले वायपर्स आणि तेवढ्याच जोरात कोसळणाऱ्या सरी ह्यांच्यात एक स्पर्धाच सुरु झाली. गाण्याचा आवाज वाढवला पण कोसळत्या मेघराजानी माझी आणि निसर्गाची डेट 'पॉज' केली होती... ती सुंदर गाणी ऐकावीशी वाटत नव्हती... खरं तर २०-२५ मिनीटावरच घर होतं पण तरी ते अंतर खूप मोठं वाटायला लागलं होतं.. जोरात कोसळणाऱ्या सरींनी आता वायपर्सवर आघाडी घेतली होती त्यामुळे समोरचं अगदीच दिसेनासं झालं होतं...ह्या अमेरिकेत रस्त्यात कुठेही थांबता येत नाई राव, त्यामुळे हळू हळू का होईना पण पुढे सरकत होतो....दिवाळीत पण घरी कमी पणत्या असतील,तेवढे गाडीतले पुढचे,मागचे, पार्किंग लाईट असे सगळ्या प्रकारचे दिवे लावून गाडी पुढे रेटत  होतो. पाऊस! रोमॅंटिक वाटणाऱ्या पावसाने क्षणात भयभयीत करून टाकलं होतं...



गाडीच्या टपावर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज मला कसली तरी आठवण करून देत होता ...खरं तर एवढ्या पावसात गाडी कधीच चालवली नव्हती ... पण अशा पावसातला प्रवासाचा अनुभव होता! ७-८ वर्षांपूर्वी भाऊ,वाहिनी,आई,बाबा आणि मी अशी एक (चक्क) कौटुंबिक कोकण सहलवगैरे आम्ही केली होती... पण ऑक्टोबर असूनसुद्धा कोकणात फारच विचित्र हवा पडली होती...अतिशय ढगाळ अशी... आणि  पण ढग सुद्धा रुसलेले  असावेत ... अजिबात पाऊस नव्हता ... दमट हवेनी वाऱ्याला यायला पूर्ण मज्जाव केला होता. पंखा लावूनसुद्धा उकडत होतं आणि दोन पावल चालून लगेच घामाच्या धारा वाहत होत्या... एकूणच सगळ्यांचा मूड बघता साधारण ३ वाजता आम्ही पुण्याला परत जायचं ठरवलं... 'बोअर' होऊन सगळे परत निघाले ... भाऊ गाडी चालवत होता. शिवाय गाडीत आई बाबा असल्यामुळे नव्या गाण्यांना गाडीत फारशी संधी नव्हती .. मग अशा वेळेस आपला एक छंद म्हणजे मस्तपैकी मागच्या खिडकीत बसून बाहेर पळणाऱ्या झाडांकडे बघत राहायचं...नारळाच्या उंच झाडांकडे बघत बघत मी बसलो होतो!  १-२ तास पुढे गेल्यावर पाऊस लागला..कोकणातला पाऊस तो ...डायरेक्ट कोसळतच होता...  पुण्याला न जात कुठेतरी थांबावं कि काय असं सगळ्यांना वाटलं.. थोडी विचारपूस केल्यावर कळलं ताम्हिणी घाटात पाऊस नाहीये...त्यामुळे थोडं पुढे गेल्यावर पाऊस थांबेल अशी अपेक्षा ठेऊन पुण्याला जायला निघालो.

पण जसं जसं आम्ही ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली....तर रियालिटी दिसायला लागली .. खरं तर अंधार पडल्यामुळे दिसत नव्हतीच... पण समजत होती. कधीही न बघितलेला असा तो पाऊस ऐकू येत होता ... त्यात तो ताम्हिणी घाट... घनदाट जंगल , विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट ...आणि ह्याशिवाय घाटातली स्मशान शांतता भंग करणारा तो कोसळता पाऊस...रस्त्यावर फक्त आमचीच गाडी! आई बाबांची  थोडी टरकली होती पण मी एन्जॉय करत होतो. थ्रिलिंग वगैरे वाटत होतं..सगळे जणं पुढे जावं कि नको अशी फक्त चर्चा करत होते ...गाडी पुढे पुढे जातंच होती, एकटी!  काही वेळानंतर मात्र समोर एक गाडी दिसली... थांबलेली होती... पुढे गेल्यावर कळलं कि तो ट्रक होता... एक माणूस आम्हाला पण थांबायचे इशारे करत होता. पावसामुळे त्याचा चेहरा काही दिसत नव्हता. अशा रात्रीच्या वेळेस , त्या घाटात ,निर्मनुष्य रस्त्यावर , भर पावसात .. कोणीतरी थांब म्हणतंय म्हणून थांबायलाही जीवावर येतं... आता माझी पण फाटायला लागली होती! पण फायनली आम्ही, बघू तर काय म्हणतोय तो, आपण पाच जण आहोत , काही नाही होणार वगैरे म्हणत एकमेकांना धीर देत थांबलो. त्यानी आम्हाला हेडलाईट सुरु ठेवून थांबायला सांगितलं... त्याचा पार्टनर एक मोठी काठी घेऊन पुढे चालत गेला... त्यांचा अनुभव त्याना असं करायला भाग पडत होता.. तो थांबलेला ती जागा म्हणजे एका पुलाची सुरवात होती .... काठी आपटत आपटत नेल्यामुळे ...त्याला पाण्याची खोली समजली.. गुडघा भर पाणी वाहत होतं त्या छोट्या पुलावरून! त्यांनी आम्हाला उलटं फिरायचा सल्ला दिला... आम्हीपण लगेच ते ऐकलं ...ज्याच्यावर संशय घेतला होता तोच देवासारखा मदतीला आला होता..

आम्ही यू टर्न घेतला....रात्रीचे ८ वगैरे वाजले असतील...अर्धा चढलेला घाट उतरून मग पनवेल मार्गे पुण्याला जावं लागणार होतं...म्हणजे अजून ५ तासाचा प्रवास! त्यात ह्या पावसाचा जोर काही कमी होत नव्हता ... रात्र गडद होत चालली होती... वीजा तर भिशी असल्यासारख्या एकत्र येऊन कडाडत होत्या . ताम्हिणीसारख्या घाटात तर रात्री विजा चमकल्या तर त्यापेक्षा हॉरर काहीही नसतं हि नवी माहिती मला कळली....अर्थातच माझी फाटली होती ! आता कधी एकदा मुंबई गोवा हायवे लागतो असं झालं होतं ...तिकडचं ट्रॅफिक जॅम चालेल पण हा भयभयीत करणारा एकाकीपणा नकोसा झाला होता... गाडीतली ५ माणसं मौनावस्थेत गेली होती ..सगळे फक्त काळजी करत होते ... बाहेरच्या शांततेबरोबर गाडीतली शांतता जास्त त्रासदायक होत होती...

अचानक आई गाणं म्हणायला लागली... अर्रे संस्कृत गाणं?? नाही... ती तर रामरक्षा म्हणत होती... खरं तर मी पण घाबरलोच होतो पण आईचं असं स्तोत्र वगैरे ऐकून मला हसू येत होतं.. तिला लक्षात आलं ते , पण तिनं जाणूनबुजून दुर्लक्ष केलं.. ती स्तोत्र म्हणतच राहिली.. आता बाहेरच्या पावसाची सवय झाली होती.. आईची रामरक्षा म्हणून संपली होती, मी गाणी लावणार तेवढ्यात आईनी पुन्हा सुरु केलं .. रामरक्षा राउंड २,३,४..एका मागे एक  सुरूच राहिला ... तिला आता माझी वाहिनी पण जॉईन झाली होती... मी मात्र कपाळावर हात ठेवून घेतला होता .. बाहेर त्याच वीजा , तोच पाऊस , तेच ढग तेवढाच गोंधळ घालत होते पण गाडीतले काळजीचे विचार आता लांब गेले होते, थोडा धीर वाटत होता ... पण माझ्या तरुण मनाला ते लक्षात येत नव्हतं! मग मी डोळे मिटून शांत बसलो ... आई आणि वाहिनीच्या रामरक्षेसमोर मला आता पाऊस ऐकू येत नव्हता...

राम रामेति रामेति,
रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं,
रामनाम वरानने ॥

हे शब्द कानात पडत होते,सकारात्मक लहरी मनात घुसवत होते .. पण आपण काही देवबीव मनात नाही त्यामुळे "हे ऐकायला छान वाटतंय , म्हणत रहा" एवढं सांगायलासुद्धा कमीपणा वाटला! गाडीतल्या त्या बदलेल्या वातावरणाची भावाला गाडी चालवताना मात्र खूप मदत झाली असावी ...सलग ४ तास तो गाडी चालवत होता आम्ही पेण मार्गे खंडाळा घाट ओलांडेपर्यंत पाऊस आमच्याबरोबरच होता.. लोणावळ्याला आम्ही थांबलो .. तिथे पाऊस होताच पण गाडीत १०० वेळा म्हणाल्या गेलेल्या रामरक्षे नी धीर दिला होता कदाचित त्यामुळेच तो पाऊस आता ओळखीचा वाटायला लागला होता . वडा पाव घेऊन आणि गाडी पुन्हा सुरु केली... गाणी न लावता, आईला इशारा केला ..तुझं सुरु ठेव.. आई एक स्मित हास्य देऊन पुन्हा 'अथ ध्यानम्‌' म्हणायला सुरु केलं... ते साधारण तासभरानी रात्री १ च्या सुमारास घरी पोचल्यावर थांबलं... डेंजर असा अनुभव घेऊन घरी पोचल्यावर मी जय श्रीराम बोललो...पण मनातल्या मनात!

          काल अशाच पावसात गाडी चालवताना , वायपर्स आणि पावसाच्या स्पर्धेमुळे धूसर झालेल्या काचेतून बघताना ती आक्खी कोकण ट्रिप स्पष्ट दिसत होती...हातावर शहारे आलं होतं..नकळत मोबाईल घेतला आणि युट्युबवर रामरक्षा सर्च केलं. आपल्याच अनुराधा पौडवालचे रामरक्षा विडिओ सापडले... तडीक प्ले केले! रहमानला म्हणलं आज जरा तू पण ऐक हे.... रामरक्षा सुरु झाली, अनुराधाच्या स्वरात...एकटेपणा गेल्याचा फील आला..मस्त वाटायला लागलं...काही जादू-टोणा वगैरे नाही ..आस्तिक असो व नास्तिक पण ते संस्कृत शब्द ,ते स्वर आणि ते शांत संगीत ह्याचा उत्तम परिणाम झाला हे नक्की ... ते कॉम्बिनेशनच छान  होतं.. प्रसन्न वाटायला लागलं .. समोर फिरणारे ते वायपर्स सुद्धा रामरक्षेच्या तालावर फिरल्याचा भास झाला...पाऊस त्याच आवेशात असूनसुद्धा, उरलेला तो २०-२५ मिनिटाचा छोटा प्रवास मी मस्त एन्जॉय करत पूर्ण केला.... रामरक्षा 'लूप' वर लावून!! घरी पोचल्यावर जोरात बोललो .... जय श्रीराम!!!

दरवर्षी, 'मन से रावन जो निकाले , राम उसके मनमें है' अशी टिपिकल लाईन पोस्ट करून  दसरा 'सेलिब्रेट' करण्यापेक्षा, ह्या वर्षी ही रामरक्षेची गोष्ट आपल्या सोबत शेअर करावीशी वाटली म्हणून एवढा सगळा प्रपंच!

आपलं वय जसं जसं वाढत असतं, अनेक आजूबाजूच्या गोष्टींचे कळत - नकळत आपल्यावर संस्कार होत असतात..रामरक्षेसारखी स्तोत्रं हा त्यातलाच एक प्रकार... आजी- आईनी आपल्याला शिकवलेल्या काही गोष्टी, तेव्हा आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी त्या मनात खोलवर रुतलेल्या असतात ... आपण मात्र सदैव 'कूल', 'सो कॉल्ड प्रॅक्टिकल' व्हायच्या प्रयत्नात त्या शिकवणींना बाजूला सारतो.... तुम्ही देवाला मानत असाल वा नसाल,  तुम्हाला स्तोत्र पाठ असतील वा नसतील.. जेव्हा जेव्हा आपण ती ऐकू , ती नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जातात...मी हे अनुभवलं ...आज तुम्हीसुद्धा आपट्याची पान वगैरे वाटण्यापेक्षा रामरक्षा ऐकून, मनात लपलेल्या रावणाला मारून  विजयादशमी च्या वेगळ्या सेलिब्रेशनचा अनुभव घेऊन तर बघा.......

-- स्वागत पाटणकर 

Saturday, September 23, 2017

फास्टर फेणे - डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ .....

फास्टर फेणे - डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ .......

फास्टर फेणेचं  काल आलेलं साधारण ९० सेकंदाच टिझर पाहिलं!!! ९० सेकंदात शाळेतले दिवस आठवायला भाग पाडणारं टिझर ! फास्टर फेणे - शालेय जीवनात मराठी मुलांना वाचनाची गोडी लावणारा, वाचनाची गोडी लागल्यावर कधी एकदा फेणेचा पुढचा भाग येतोय असं वाटायला लावणारा अवलिया  ...  भागवत सरांच्या कमालीच्या नजरेतून , ताकदवान शब्दांमधून तयार झालेला फेणे....

साधारण २५ वर्षांपूर्वी दूरदर्शननी फेणेवर सिरीयल केली होती पण त्यानंतर इंडस्ट्रीकडून फेणेकडे 'दुर्लक्ष' कसं काय झालं ह्याचंच आश्चर्य वाटतं... दुर्लक्ष नसावं ..पण कधी कधी आपल्याच मातीत वाढलेल्या गोष्टींवर , आपल्या घरातल्यांवरच आपला जास्त विश्वास नसतो, बऱ्याचदा आपल्याच 'व्यक्तिरेखांना' अंडरएस्टीमेट केलं जातं आणि त्यामुळेच त्यांच्यावर काही मोठी कलाकृती बनवायची 'रिस्क' वाटते मग अर्थातच आपण बाहेरच्या कॅरॅक्टर्सवर जीव लावून बसतो... पण ह्या ट्रॅडिशनल अँप्रोचला धुडकाडून लावून , आपल्या घरातल्या , मराठी मातीतल्या फेणेला मोठ्या पडद्यावर आणल्याबद्दल लेखक क्षितिज पटवर्धनचे अभिनंदन करायला हवं! ह्या विषयावर सिनेमा होऊ शकतो , लोकांना आवडू शकतो हा विश्वासच  मनात ठेवून त्यांनी हा सिनेमा लिहिला असणार . भागवत सरांच्या लेखनाला, त्यांच्या स्टाईलला धक्का ना लावता त्याच दर्जाचं लेखन करायचं म्हणजेअवघड चॅलेंजच... पण पटवर्धनांचा बायोडाटा बघता त्यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं असेल अशी खात्री वाटते... फेणेचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि पटवर्धन म्हणजे इंडस्ट्रीमधले एकदम गुणी क्लासमेट्सची जोडी...टिझर बघताना, सचिन - द्रविडसारखीच ह्यांची पार्टनरशिप शतकी असेल असं कुठेतरी वाटून जातं! ह्या दोघांच्या चतुराईचं उदाहरण म्हणजे 'टॉक्क'... मला आठवतंय, शालेय जीवनात जेव्हा हे 'टॉक' करायला शिकलो तेव्हापासून कोणालाही हाक मारायची गरज लागली नाही... नुसत्या 'टॉक्क'वर मित्रांना बोलावलं जायचं... आता ते फेणेकडून बघताना जाम धमाल येतीये.. दिग्दर्शकाला सलाम आहे!

पुस्तकातला फेणे , स्क्रिप्ट रूपात आल्यावर पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे कास्टिंग. मला स्वतःला वाटतं, ह्या अवघड  प्रोजेक्टमध्ये जी काही थोडी सोप्पी गोष्ट असेल ती म्हणजे फेणेचं कास्टिंग... ज्यांनी ज्यांनी फेणे वाचलेलं आहे त्यांना जर विचारलं तर ९९ टक्के लोकं एका सेकंदात 'अमेय वाघ' हे उत्तर देतील... अमेय अगदी तंतोतंत शोभतोय फेणेच्या रूपात ... त्याची हेअर स्टाईल, कपडे, उड्या, त्याची सायकल वगैरे अगदी पुस्तक वाचताना डोळ्यासमोर यायचं, तसंच सेम टू सेम पडद्यावर आलंय ..अमेय म्हणजेच फेणे हे शिक्कामोर्तब झालंय , एफ बी - युट्यूब वरती लोकांच्या कमेंट्स वाचल्यावर अगदीच ते लक्षात येतं ! 
अमेयला हा रोल सोप्पा नसावा... काही वर्षांपूर्वी आलेल्या सीरियलमध्ये सुमित राघवानसारख्या तगड्या कलाकाराने फेणे रंगवला होता. ज्यांनी ज्यांनी ती सिरीयल बघितली असेल त्यांच्या मनात फेणे म्हणजे राघवन हे फिट बसलं असणार... आय होप अमेयचा फेणेपण त्याच ताकदीने अवतरेल...आणि लोकांना आवडून जाईल. बाकी कास्टिंगबद्दल अजून गुपितच आहे पण सिनेमात पर्ण पेठे आहे असं कुठेतरी वाचायला मिळालं... वाह! वाघोबाच्या तीक्ष्ण नजर आणि फास्टर वेगाबरोबर पर्णरूपी गोडवा पण अनुभवायला मिळणार ... मुरंबा-रमा माधव अशा मधून आपला स्क्रिन प्रेझेन्स  किती  'कडक' आहे दाखवून देणाऱ्या ह्या दोघांना एकत्र स्क्रीनवर बघायला मजा येणार ए! ह्या व्यतिरिक्त मला  उत्सुकता लागून राहिलीये ती पोस्टर आणि टिझर ..दोन्हीमध्ये अमेयच्या मागेच दिसणारा हा चिमुकला शुभम मोरे आणि त्याच्या रोलबद्दल!


आता एवढ्या सगळ्या पुणेकरांबद्दल बोलल्यानंतर थोडंसं लातूर - मुंबईकडे वळावं. पार्श्वसंगीत!! ट्रॉय - अरिफ ह्यांना सलाम!! अतिशय साजेसं , उत्कंठा वाढवणारं असं पार्श्वसंगीत! अतिशय इम्प्रेसिव्ह! इवलास्या टीझरमध्येच अख्या पिक्चरचा फील कसा असेल हे म्युझिक उभं करतंय! काय कमाल एनर्जी त्या ट्युनमध्ये!
निर्मात्यांबद्दल काय बोलणार ... फेणेच्या मागे विश्वासाने,ताकदीने उभा राहून... त्याला मोठ्या पडद्यावर आणून, पहिल्या पोस्टरपासूनच बॉलिवूड दिग्गजांना आपल्या मराठमोळ्या फेणेकडे लक्ष देण्यास भाग पाडून, आत्तापासूनच फेणेची उत्सुकता देशभर पोचवल्याबद्दल झी आणि रितेश देशमुखला मनापासून धन्यवाद! रितेशसारखा मोठा स्टार आपल्या मागे आहे हे कळल्यावर आपसूकच त्या सिनेमाशी निगडित सर्वांचा आत्मविश्वास वाढतो आणि तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला मदतही होते. पण टिझरमध्ये रितेशचा आवाज ऐकताना, हा माणसाची इन्व्हॉल्वमेंट फक्त 'निर्माता' रोल पुरती लिमिटेड नसून त्याहून जास्त तो ह्या प्रोजेक्ट मध्ये इमोशनली इन्व्हॉल्व्हड आहे असं  जाणवलं ... त्याला स्वतःलाच फेणेचा लीड रोल करायची जाम इच्छा होती कि काय आणि फेणेच वय थोडं मोठं असतं तर कदाचित रितेशने ही संधी सोडली ही नसती असं काहीसं वाटून गेलं...पण त्यानी टीझरमध्ये मस्तपैकी व्हॉइस ओव्हर देऊन त्याच्या फॅन्सना मस्त सरप्राईज देऊन टाकलंच आहे! 
जेनेलियासारखच फेणेदेखील आजच्या प्रेक्षकांचा सर्वांचाच लाडका होईल....सर्वांचा आवडत्या पुस्तकरूपी फेणेचं  पडद्यावरचं रूप देखील सर्वाना आवडेल असंच ह्या पहिल्या ओव्हरनंतर वाटायला लागलंय... आणि इतक्यावर न थांबता विदेशी सिनेमासारखे फास्टर फेणेचे पण पुढचे भाग येतील , जेणेकरून आपल्याच मातीतल्या व्यक्तिरेखाना अंडरएस्टीमेट करायची चूक आपण पुन्हा करणार नाही.... हीच इच्छा!!!

Teaser - https://www.youtube.com/watch?v=4Bjv5nL-OK0

९० सेकंदच टिझर मधूनच एकसाईटमेन्टनी एवढं लिहायला भाग पाडलं.. पण सध्यातरी २७ ऑक्टोबरची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही !! फेणे, भेटूच पुढच्या महिन्यात...तोपर्यंत, टॉक्क!!

Friday, September 22, 2017

स्लो कूकर- हळूवारपणे शिजलेलं सुख!

स्लो कूकर- हळूवारपणे शिजलेलं सुख!
                                                                                                                                         

आजकाल ज्या गोष्टी बाहेर खातो त्याच घरी ट्राय करायचा नवीन छंद लागलाय... त्याच गडबडीत एक नवीन फॅड म्हणून परवा 'स्लो कुकर' आणला! वॉलमार्ट मध्ये गेलो आणि त्या किचन सेक्शनमध्ये सगळ्यात स्वस्त असा स्लो कुकर शोधला आणि लगेच घेऊन टाकला. आपलं नेहमी असंच असतं ..स्वस्त ते मस्त! हल्ली नवीन कपड्यांचं शॉपिंग झाला तरी  ते कधी एकदा घालतोय ह्याची फारशी उत्सुकता नसते (पोटाला वगैरे घट्ट होत असतात ना!)! पण स्लो कुकर मात्र घरी आल्या आल्या लगेच उत्साहात उघडला गेला , आतमध्ये पाहिलं तर रेसिपीजच पुस्तक होतं.... लगेच वाचायला घेतलं तर सगळ्याच इटालियन मेक्सिकन अशा इंग्लिश रेसिपीज! श्या! आपला भारतीय बाणा अपेक्षेप्रमाणे जागा झाला... बायकोला म्हणलं पाहिलं काही होणार तर बिर्याणीच होणार आज ह्याच्यात... साजूक तुपातली बिर्याणी!

ऑनलाईन  बघून, थोडा इकडे तिकडे वाचून बिर्याणी लावली ... एकदम टकाटक दिसत होती! स्लो कुकर मध्ये ३ तास शिजवायची असं तो यु ट्यूब वरचा शेफ म्हणाला... ती एवढी कडक दिसत होती...पण तीन तास वगैरे थांबायचं??
 "पाटणकर, 'स्लो कुकिंग'ची हौस आहे ना ....सो छान हवं असेल तर पेशन्स ठेवायला शिका ..".हे असं काहीतरी तो शेफ ओरडला बहुधा! कुकर सुरु केला ...3 एक तासांनी घरात वेलची,दालचिनी,केशर, पुदिनावगैरे गोष्टींचा एक अतिशय कडक वास अख्या घरात पसरला होता... मी तर 3 तासाचा गजर लावून ठेवला होता..वासामुळे भूक वाढली होतीच...गजर झाल्या झाल्या लगेच किचनकडे पळालो, कूकर उघडला...आयच्या गावात! काय जबरा दिसत होती ती ...तांदूळ पहिल्या पावसात भिजलेल्या झाडासारखे फ्रेश दिसत होते...पण मेन फोकस होता तो 'स्लो कुक्ड चिकनचा' ...चिकन कितपत आणि किती शिजलंय ह्यावर सगळं अवलंबून होतं ..टेस्ट करायला म्हणून एखादा पीस घेतला.....तोंडात ठेवल्या ठेवल्या माझं पुण्याच्या तिरंगामधून  एस पिज मग ब्लु नाईल हुन जॉर्ज वगैरे प्रवास करून आलं! इतक्या वर्षात जे फक्त बाहेरच खायला मिळालं होतं  एक्झॅक्ट सेम टेक्सचर चिकनला आलं होत ... परफेक्ट मॉइश्चर ठेऊन ते शिजलं होतं.. फुल्ल टेण्डर  ....कुकरमध्ये  निर्माण झालेल्या वाफेनीच बिर्याणीला शिजवलं होत. हळू हळू शिजल्यामुळे जेवढी बाहेरून सुंदर दिसत होती तेवढीच आतपर्यंत शिजली होती ... इतका वेळ इन्व्हेस्ट केल्यामुळे त्याचे रिटर्न्स सुद्धा 'इंटरेस्टिंग' होते ....तो मसाला, ती चव,ते रंग हे तांदूळ आणि चिकन ह्याच्या अगदी आत पर्यंत पोचलं होतं... 

हे असं काही खायचं असेल तेव्हा मला डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही...पटापटा डिशमध्ये बिर्याणी घेतली आणि एकटाच मस्त बाल्कनीत जाऊन बसलो ... 

खूप वेळ घेऊन... शांत... मनसोक्तपणे तयार झालेलं चिकन खात खात मी एकटाच हरवून गेलो होतो... एकदा पोट प्रसन्न झाल्यावर मग मात्र सुखावलेलं मन पुन्हा ऍक्टिवेट झालं...विचारांना किक बसायला लागली आणि अचानक वाटलं आपलं आयुष्यपण किती ह्या स्लो कुकरसारखंच असतं .... गोष्टी हळू हळू मिळत गेल्या कि त्याची गोडी वेगळीच लागते.. एकदम विरघळलेली! म्हणजे बोलायचंच झालं तर सक्सेस ...यश! झटपट मिळालेल्या यशापेक्षा खूप झटून कष्ट करून हळू हळू पायऱ्या चढत यशाच्या शिखरावर पोचलं कि त्याचं वेगळं सेलिब्रेशन करावंच लागत नाही... शिखरावर पोचण्याच्या त्या स्लो प्रोसेसमध्येच खरा आनंद मिळालेला असतो!
स्टॉक मार्केट मध्ये खरे 'पोचलेले' लोक डे -ट्रेडिंग करण्यापेक्षा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट वर भर देत असतात ... बऱ्याचदा आपल्या मनाला वाटत असत काहीच गोष्टी घडत नाहीयेत ..तेव्हा आपल्या नकळत त्या बदलत असतात...गरज असते ती फक्त पेशन्स ठेवायची.
आणि  कदाचित पेशन्स ह्याच गोष्टीमुळे एखाद्या बॅट्समनला वन डे मधल्या सेन्चुरीपेक्षा टेस्ट क्रिकेटमधले १०० जास्त मोलाचे वाटत असावेत... इतकंच कशाला ...रिलेशनशिप मध्ये सुद्धा ..पहिल्या नजरेत प्रेम होऊन दुसऱ्या दिवशी प्रपोज करून नातं सुरु होण्यापेक्षा.. आधी नुसती नजरानजर, मग त्याच मैत्रीत झालेलं रूपांतर हे असं टप्या टप्प्याने पुढे गेल्यावर 'आय लव्ह यू' म्हणायची गरजच लागत नाही ..एकमेकांच्या डोळ्यात डोळ्यामधेच ते नातं दिसून येतं .... इतक्या वर्षाच्या स्लो प्रोसेस मध्ये ते एकदम मुरून गेलेलं असतं .... अरेंज मॅरेज ची सुद्धा तीच गम्मत असते... लग्नाच्या पहिल्या रात्री अवघडलेली दोन्ही मनं काही वर्षांनी मात्र एकमेकात बुडून गेलेली असतात ..दोघांच्याही  नकळत... नातं उलगडत जाण्याची प्रक्रिया फार हळू हळू होते .. सोप्या अवघड वाटांमधून प्रवास करत पुढे जाते ... मागे वळून बघितल्यावर मात्र चेहऱ्यावर वेगळंच हास्य ठेऊन जाणारी असते!

आयला, ही स्लो कुक्ड बिर्याणी जिभेबरोबर पोट आणि मन ह्यांनापण एक प्रकारची चालना आणि ख़ुशी देऊन गेली होती!  अनेक प्रकारच्या गोष्टी मनात हळू हळू येत होत्या...आणि माझे विचार एका फांदीवरून दुसरीकडे टुणकन उड्या मारत होते .... नकळत बिर्याणी मात्र मस्तपैकी फस्त झाली होती! 
"बीइंग स्लो' रॉक्स" असं काहीतरी पुटपुटत... पुढच्या वेळेस काहीतरी इटालियन करूया असा काहीसा निर्धार करत पडदे लावून वामकुक्षी घ्यायला प्रस्थान केलं!!!            
---स्वागत पाटणकर 

Wednesday, September 6, 2017

आठवणीतला सीगल... उबुंटूच्या निमित्ताने!

आपल्याला फार वाईट सवय असते , लोकांना पहिल्या भेटीतच 'जज' करायची. फार पूर्वी.. म्हणजे १५-१६ वर्षांपूर्वी, आमची सगळी बीएमसीसीची नाटक मंडळी पित्ती हॉलवर जमला होती. पुढच्या स्पर्धेसाठी काय करावं वगैरे चर्चा सुरु होत्या. तेवढ्यात एक मुलगा आला.. अकरावीत कॉलेजमध्ये आल्या आल्या लोकं नाटक, क्रिकेट असे आपल्या इंटरेस्टचे ग्रुप्स जॉईन करतात... हा ही तसाच असावा असं वाटलं!  ओळख परेड सुरु झाली .... नाव 'सारंग साठ्ये....  अकरावी नव्हे तर एफ वाय- एस वायमध्ये होता, सीएचं एक वर्ष 'ट्राय' करून मग त्याला चक्क अभिनयात इंटरेस्ट जाणवायला लागला होता!'
निळा चेक्सचा शर्ट, आतमध्ये पंधरा टीशर्ट, डोळ्यावर चष्मा, अख्या दुनियेची वेट लॉसची जबाबदारी एकट्याने उचलल्यासारखा बारीक आणि मनातले विचार जितक्या वेगवेगळ्या दिशेने जाऊ शकतात तितक्याच वेगवेगळ्या दिशांना भरकटलेले त्याचे ते केस! . एकूणच त्याला पाहता, 'ह्याला अजूनही आपला इंटरेस्ट नक्की कशात आहे हेच कळलं नाहीये...सीएसारखच ही पण चुकीचीच दिशा ह्यानी निवडलीये... आता करायला काही नाहीये तर उरलेलं कॉलेज लाईफ एन्जॉय करायला इकडे आलाय' वगैरे मतं त्याच्याबद्दल झाली होती! 

पण कधी कधी शितावरून भाताची परीक्षा केल्यावर आपण सपशेल फेल होतो!! साठ्ये हा त्यातलाच प्रकार... पित्ती हॉल जॉईन केल्यावर काहीच दिवसात त्याने अक्षरशः त्याच्याकडे असलेल्या अफाट ऊर्जेने मला भारावून टाकलं! किती एनर्जी असावी एवढाश्या जीवात ... केवढ्या कल्पना असाव्यात त्या डोक्यात! बीएम गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषोत्तम मध्ये फारसं यशस्वी झालं नव्हतं... पण ह्या नवीन आलेल्या पाखराने पांढरा शुभ्र सीगल बनून आम्हा सगळ्यांना झेप घ्यायला शिकवलं! सगळं ग्रुप एक झाला ..खूप कष्ट, अपार मेहनत घेऊन जोनाथन सीगल एकांकिका उंच उंच उडाली आणि पारितोषिक घेऊनच पित्तीच्या फांदीवर खुशीत येऊन बसली. भरतमध्ये बीएम - बीएम च्या गजराची वाट बघत होतो तो शेवटी ऐकायला मिळाला! एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला! आणी त्यात साठयांच्या सीगलचा सिंहाचा वाटा होता! सारंगची दिशा चुकलेली नव्हती ... त्याची घेतलेला तो टर्न हा राईटच होता.. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान ते सांगून जात होतं! 

नटसम्राट!
पुढे, मी पोस्ट ग्रॅड्युएशन - नोकरी वगैरे असा ठराविक स्टॉप असलेला रस्ता निवडला आणि मग पित्ती हॉलवर जाणं बंद झालं... पण जेव्हा केव्हा सारंग भेटायचा तेव्हा तेव्हा त्याच्या डोक्यातला नवीन कल्पनांबद्दल भरभरून बोलायचा ... ह्या माणसाला खूप काही करायचं हे त्याच्या डोळ्यातच जाणवायचं... माझ्या पोटाचा साईझ आणि त्याची एनर्जी हे एकाच प्रमाणात वाढलं होतं!  नाटक, स्क्रिप्ट, तालीम,वाचन., संवाद ..अभिनयातले बारकावे ह्या सगळ्याबद्दल तो भरभरून बोलत होता! ऐकायला लै भारी वाटत होतं... पित्ती हॉलचा विषय निघाल्यावर  'अरे,दोन नवीन मुलं आली आहेत... भविष्य आहेत ती'  बोलला ... हा आता दुसऱ्यांची क्षमता ओळखायला लागला होता ... शिवाय आपल्या घरात बाळ जन्माला आलंय एगझॅक्ट तशाच आनंदात तो हे सांगत होता ! नाटक हा माझा श्वास आहे वगैरे बरेच लोकं मुलाखतीमध्ये वगैरे बोलताना ऐकलं होतं.. पण सारंगच्या बाबतीत मला ऍक्च्युअली ते दिसत होत ! हा माणूस फक्त अभिनयात बॅटिंग न करता ..तो मोठा ऑलराऊंडर होणार आहे असं काहीतरी मनात वाटून गेलं...

त्यानंतर मात्र भेट होणं फार कमी झालं... आम्ही ९-५ जॉब मध्ये बिझी झालो आणि सारंग 'स्ट्रगल' करायला पुण्याबाहेर गेला असं मित्रांकडून कळलं! कोणी गॉडफादर नसलेल्या साठ्येचा स्ट्रगल यशस्वी होवो एवढीच मनातल्या मनात प्रार्थना केली! मधेमधे गार्बो ,तू ,जंगलनामा अशा अनेक कलाकृतींमधून त्याच नाव वाचायला मिळायचं... स्वतःमधल्या एनर्जीला प्रायोगिक रंगभूमीकडे चॅनेलाईझ करून त्यांनी पुन्हा एकदा बरोबर निर्णय घेतला होता!  आमच्या हिऱ्याला पैलू पाडायचं काम प्रायोगिक रंगभूमी करत होती! ब्राईट डे, ब्रिन्ग ऑन द नाईट वगैरे मधून तर हा देशभर पोचला होता! नटसम्राट रिलीज झाल्यावर किंवा गुगल प्लेवर ब्राईट डे आल्यावर मी सगळीकडे आरडाओरडी करून अतिशय उत्साहात सगळ्यांना सांगत सुटलो होतो! आपला साठ्येच हे यश बघून खूपच मस्त वाटत होतं! मध्यंतरी एकदा कर्वे रोड वर दिसला...त्याचे पूर्वीचे ते भरकटलेले केस आता खूप मोठे झाले होते पण एकदम टापटीप.! आपसूक त्याला हाक मारली गेली ... मागे न बघता त्यांनी काय स्वागत कसा आहेस विचारलं! त्यानं इतक्या वर्षांनी सुद्धा फक्त आवाजावरून आपल्याला ओळखलंय! वाह! त्याच्याबद्दल प्रेम होतंच .. पण आदरही वाटायला लागला! 

सारंग मात्र एवढ्यावर थांबणाऱ्यातला नक्की नाही. त्याच्यातला दिग्दर्शक  त्याला स्वस्थ बसू देत नव्हता...,मनात असलेल्या अनेक कल्पनांना वाट करून देण्यासाठी भाडीपा - मराठी वेब चॅनेल सुरु केलं..आजकालच्या प्रेक्षकांना नक्की काय हवंय ह्याची उत्तम जाण असलेल्या साठ्येनी कास्टिंग काऊच लोकांसमोर आणलं तेसुद्धा अनेक वर्षांपूर्वी त्यानी पारखलेल्या 'त्या दोन' मुलांना घेऊन ... मराठीतील ह्या पहिल्या वेब सिरीजनी जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय ..  भाडीपाच्या सगळ्याच कलाकृतींवर लोकं मनापासून प्रेम करतायेत! पण मला मात्र ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याच्यातला दिग्दर्शक त्याच्यातल्या अभिनेत्यावर अन्याय करतोय कि असं वाटायला लागलं ... पण परवाच पाहिलेल्या उबुंटूच्या ट्रेलरनी मात्र सुखद धक्का दिला! लीड रोलमध्ये आपला साठ्ये! ट्रेलर तर आवडूनच गेलं पण एकसाईटमेन्ट मध्ये भराभरा १५ वर्षांपूर्वीच्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या आणि लेखणीतून उतरल्या! 

उबुंटूमध्ये त्याच्या तोंडी एक डायलॉग आहे. "ह्या वयात फार रग असते मुलांच्या अंगात".... 

इतक्या वर्षांनीसुद्धा सारंगनी तीच रग त्याच्यात अजूनही जिवंत ठेवली आहे ह्यापेक्षा सुखावणारी दुसरी गोष्ट नाही... त्याच्या फॅन्ससाठी..माझ्यासारख्या!