Tuesday, January 8, 2019

आनंदी गोपाळ!

     आनंदी गोपाळ!

      तीन चार महिन्यांपूर्वी एका मोठ्या नेत्यानी पुणेरी पगडी घालायला नकार दिला त्यावरून वाद सुरु झाला होता... अक्षरशः वाद 'निर्माण' करण्यात आला होता.. त्यांचे समर्थक असो वा विरोधक ...सगळेच एक युध्य असल्यासारखं बोलायला लागले होते... खरं तर एक सामान्य नागरिक म्हणून या सगळ्याची लाज वाटू लागली होती... शिवाजी महाराज,गांधी,सावरकर,फुले या सगळ्या थोर लोकांना आपल्या राजकारण्यांनी 'वाटून' घेतलं आहेच पण आता त्यांनी पुढची पायरी गाठली होती... या थोर लोकांच्या 'टोप्या' सुद्धा आता विभागायला निघाले होते.  पुणेरी पगडी या जातीची ... अमुक एका पक्षाची , फुल्यांची अमुक जातीची  तर गांधी टोपी अमुक एका पक्षाची ..दुसऱ्या कोणाचा त्यावर अधिकार नाही हे असं काहीतरी बिंबवायला सुरुवात  झाली होती... सोशल मीडियावर सगळे पेटले होते.... टोप्यांवरून पोष्टी पडायला सुरुवात झाली होती. राजकारण हा आपला विषय नाही पण हे सगळं दूषित वातावरण बघून मन खिन्न झालं होतं ...
        पण..... सिनियर नेते, त्यांचे विरोधक आणि समर्थक अशा निरर्थक गोष्टीत .... टोप्यांच्या या राजकारणात बिझी असताना अचानक एक  'हॅट्स ऑफ' करायला लावणारी एक गोष्ट सोशल मीडियावर दिसली... गोष्ट तशी विचित्र पण अतिशय कौतुकास्पद ..प्रत्येक भारतीयाला आणि प्रत्येक मुलीला अभिमान वाटावा अशी गोष्ट... एक मराठी मुलगी... नाव अनुजा..  अमेरिकेत ग्रॅज्युएशन पूर्ण करते आणि कोनवकेशन म्हणजेच तिच्या विद्यापीठात होणाऱ्या पदवीदान समारंभाला ती जाते .... तेव्हा ती एकटी नसते... जणू काही महिला  सशक्तीकरणाचा इतिहासच तिच्या सोबतीला असतो... कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठात ही मुलगी आपल्या पदवीचा स्वीकार करते ती टिकली , नथ घालून.... ती केवळ यावरच थांबत नाही ...तर ग्रॅज्युएशन हॅट वर ती तिच्या मनातल्या भावना लोकांसमोर मांडते... त्या हॅटवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं "Thank You Mahatma Phule, Savitribai Phule & Dr Anandi Joshi.... people who fought for woman empowerment"... १०० वर्षांपूर्वी असलेल्या प्रॉब्लेम आणि त्यावर सोल्युशन शोधणाऱ्या या थोर माणसांचे आठवण ठेवते... त्यांना पुन्हा एकदा जगासमोर आणते. या थोर माणसांचा ..त्यांनी केलेल्या कामाचा विसर पडलेल्या लोकांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवते. आई-बापाचे उपकार देखील विसरणाऱ्या या फास्ट जगात ही मुलगी  १०० वर्षांपूर्वीची कृतज्ञता व्यक्त करते... सक्षम भारतीय स्त्रीची खूण असणारी टिकली आणि नथ ती सातासमुद्रापार पोचवते.

       या मुलीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे ... तिची ही कृती बघून, अत्यंत खुश होऊन मी तिच्याबद्दल माझ्या मित्र.....  कलिग्सना सांगत होतो तेव्हा त्यांच्याकडून "वा कौतुक आहे तिचं" अशा जनरलाइझ्ड रिऍक्शन मला ऐकू येत होत्या.. काहीसं विचित्र वाटलं... क्षणभर वाटलं या अनुजाबद्दल फक्त मलाच (विनाकारण ) खूप कौतुक आहे तेवढं  बाकीच्यांना फारसं विशेष वाटलं नाहीये.... काहीसा नाराज चेहरा घेऊनच मीं चाललो होतो तेवढ्यात एकीच्या लॅपटॉप स्क्रीनवर "डॉक्टर आनंदी" बद्दल गुगल सर्च रिझल्ट्स दिसले... जेवढं कौतुक अनुजाबद्दल वाटलं तेवढंच वाईट मला ती स्क्रीन बघून वाटलं ... ती कृतज्ञता वगैरे सोडा बाजूला .. इथं लोकांना डॉक्टर आनंदीबाईंबद्दल गुगलला विचारवं लागतंय ..हेच किती लाजिरवाणं आहे.. पुढे जायच्या स्पर्धेत आपण इतिहास इतक्या सहजपणे विसरून जावा??  किती त्रासदायक होतं ते ..आनंदीबाईंना गुगल करणारी ती मैत्रीण त्यांचं कार्य आता पूर्ण मन लावून वाचत होती.. त्यांचे कष्ट,त्यांची जिद्द आता हिला समजायला लागले होते... ते वाचून तिचे डोळे चमकायला लागले होते   त्या वेळेला वाटून गेलं हे असंच खरं तर आजच्या पिढीला, नवीन पिढीला आनंदीबाई कळायला हव्यात , समजायला हव्यात... आजकालची तरुणाई, पुढची पिढी ह्या सगळ्यांना पूर्वीची लोकं, त्यांनी पाहिलेली कठीण परिस्थिती आणि त्यातून त्यांना असणारी शिक्षणाची ओढ, ते मिळवण्याची जिद्द हे सगळं समजणं खूप महत्वाचं आहे ...  पण हे कसं ?? कसं पुन्हा जगासमोर आणणार हा प्रश्न सारखा पडत होता पण त्याच उत्तर काही सापडत नव्हतं...
       गेल्या काही दिवसात खेळाडू, रंगकर्मी किंवा साहित्यिक ह्यावरचे बायोपिक येऊन गेले, प्रेक्षकांनी देखील सर्व सिनेमे डोक्यावर घेतले ... एकदम ट्यूब पेटली... असाच एखादा सिनेमा डॉ आनंदी बाईंवर निघाला तर??? पण कोण काढणार... मराठी सिनेमात अशी रिस्क घेणार तरी कोण? ..असं वाटलं.. इंडस्ट्रीमधल्या काही मित्रांसमोर हा विषय काढला ... तेव्हा मला " समीर विद्वांस " एवढंच उत्तर मिळालं... तेव्हा काही समजलं नाही. पण परवा समीरनी त्याच्या नवीन सिनेमाची अनाउन्समेंट केली.... "आनंदी गोपाळ".... लै भारी वाटलं बघून लै...मनापासून आनंद झाला.  डबल सीट असो वा नवा गडी नवा राज्य ..त्याची नायिका नेहमीच वेगळी असते, काहीतरी मेसेज देणारी असते...सक्षम असते... त्यामुळे 'आनंदी गोपाळ'बद्दल जास्तच उत्सुकता लागलीये. पूर्वी हिंदी सिरीयल येऊन गेलीये या विषयावर , पण आता मराठी सिनेमा काढण्याचं धाडस केल्याबद्दल झी आणि मंगेश कुलकर्णीचे लै धन्यवाद.
       

       समीरच्या प्रेमाखातर "आनंदी-गोपाळ" प्रमोट करण्यासाठी बऱ्याच नायिकांनी नथ घालून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या. पण त्यावर "काय टप्पा दिसतीयेस तू" , "नथ डाव्या नाकपुडीत घालतात एवढं पण कळत नाही का" वगैरे कमेंट्स पब्लिककडून केल्या गेल्या ...  ते मनात टोचलं ....  नथ आणि आनंदीबाईंचा मूळ उद्देश बाजूलाच राहिला कि काय असं वाटलं.

त्यामुळेच अनुजासारखं आदर्श उदाहरण सर्वांच्या ठेवून समीर आणि झी ला 'आनंदी-गोपाळ'साठी शुभेच्छा देण्यासाठी हा सगळा खटाटोप. टोप्या घालणाऱ्या राजकारण्यांपासून ते पाहिलीत शिकणारा चिंटूला देखील हा सिनेमा काहीतरी शिकवून जाईल हे नक्की.
     १५ फेब्रुवारी म्हणजेच परीक्षेच्या १-२ महिने आधी 'आनंदी-गोपाळ' रिलीज होतोय... मुलांना नक्क्की दाखवा...

         काय सांगा, 'शिक्षण-परीक्षा' ह्या सगळ्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला असेल!

- स्वागत पाटणकर 




  
           

3 comments: